४० किमीची मर्यादा रूग्णवाहिकेसाठी अडचणीची
By Admin | Updated: June 7, 2015 02:07 IST2015-06-07T02:07:03+5:302015-06-07T02:07:03+5:30
टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांची केवळ ४० किमी अंतरावरच वाहतूक करावी, असे बंधन घालण्यात आले आहे.

४० किमीची मर्यादा रूग्णवाहिकेसाठी अडचणीची
देसाईगंज : टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांची केवळ ४० किमी अंतरावरच वाहतूक करावी, असे बंधन घालण्यात आले आहे. याचा फटका देसाईगंजमधील रूग्णांना बसत आहे.
संपूर्ण राज्यातील रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका राज्यभरात वितरित करण्यात आल्या आहेत. सदर रूग्णवाहिकेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र सदर रूग्णवाहिका देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयाला देण्यात आली नाही. मात्र नजिकच्या लाखांदूर येथील रूग्णालयात सदर रूग्णवाहिका उपलब्ध आहे. यामुळे देसाईगंज येथील एखाद्या रूग्णाला दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असल्यास लाखांदूर येथीलच रूग्णवाहिका बोलविल्या जाते. लाखांदूर ते देसाईगंजचे अंतर १८ किमी आहे. त्यामुळे सदर रूग्णवाहिका देसाईगंज येथे येते. रूग्णाला गडचिरोली येथे भरती करायचे असल्यास ४० किमी पेक्षा अंतर जास्त असल्याने गडचिरोली येथे रूग्णाला भरती करण्यास वाहकाकडून स्पष्ट नकार देण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश रूग्णांना ४० किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी येथीलच रूग्णालयात भरती करावे लागत आहे. याचा त्रास रूग्णांना होत असून वेळप्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४० किमीची दिलेली मर्यादा रूग्णांच्या जीवावर बेतत असल्याने ही मर्यादा काढून टाकण्यात यावी, अशी मागणी रूग्णांकडून करण्यात येत आहे.
कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना लाखांदूर येथीलच रूग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र ४० किमीच्या मर्यादेमुळे या रूग्णवाहिकेच्या वापरावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर अशी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)