अंगारातील २७ वीज खांब जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:38+5:30
४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंगारातील २७ वीज खांब जीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : ४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव फाये, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी गावातील वीज खांबांची तपासणी केली असता, सुमारे २७ वीज खांब जीर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे. सदर वीज खांब खालच्या बाजूस गंजले आहेत. खांबाच्या मधला भाग गंजून नष्ट झाला आहे. केवळ दोन बाजू शिल्लक असून त्यावर खांब उभा आहे. सदर खांब गावात आहे. वादळवाºयामुळे यातील काही खांब कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेले वीज खांब बदलवावे, यासाठी गावकरी व ग्रामपंचायतींनी महावितरणला अनेकवेळा निवेदन सादर केले. मात्र जीर्ण खांब बदलविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.
अंगारा हे कुरखेडा तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावात जवळपास १ हजार कुटुंब आहेत. प्रत्येक घरी वीज जोडणी आहे. विद्युत बिलाच्या माध्यमातून महावितरणला महिन्याचा लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, डॉ.मनोहर आत्राम, सुलक्षण नंदनवार, देवदत्त हाडगे, दादाजी सुकारे, देवराव उईके, दिगांबर बाळबुद्धे, किसन लांजेवार, भजन कापगते, भूपेंद्र गहाणे, महिपाल कुमरे यांच्यासह अंगारातील नागरिकांनी केली आहे.