दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या ११६६ जागांसाठी २८८४ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST2021-01-08T05:59:16+5:302021-01-08T05:59:16+5:30
दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत ...

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या ११६६ जागांसाठी २८८४ उमेदवार
दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.६) अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. २३० जागांवर एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे त्यांची अविरोध निवड होत आहे. याशिवाय ५८ जागांसाठी कोणीही अर्ज केला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात ११६६ जागांसाठीच मतदान होणार आहे. त्यासाठी २८८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
(बॉक्स)
आठ ग्रामपंचायतींना मिळणार दोन कोटींचा निधी
दुसऱ्या टप्प्यातील भामरागड वगळता इतर पाचही तालुक्यात काही ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्या. त्यात चामोर्शी तालुक्यातील दोन आहेत. इतर चार तालुक्यातील ८ ग्रामपंचायती अहेरी विधानसभा मतदार संघातील असल्यामुळे त्यांना आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २५ लाखांचा निधी मिळेल. त्या ग्रामपंचायतींमध्ये अहेरी तालुक्यातील मांडरा, मूलचेरा तालुक्यातील देवदा आणि वेंगलूर, एटापल्ली तालुक्यातील मानेवाडा आणि वाघेझरी, तसेच सिरोंचा तालुक्यातील रामंजपूर (वेस्टलँड), कोरलामाल आणि कोपेला या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक सदस्य अविरोध
अविरोध निवडल्या जात असलेल्या २३० उमेदवारांमध्ये सर्वाधिक ११४ सदस्य चामोर्शी तालुक्यातील आहेत. याशिवाय अहेरी १०, मूलचेरा २६, एटापल्ली ४० आणि सिरोंचा तालुक्यातील ४० आहेत. याशिवाय रिक्त राहणाऱ्या जागांमध्ये चामोर्शी तालुक्यातील २७, मुलचेरा २०, एटापल्ली १०, भामरागड तालुक्यातील १ आहे.