२०४ मामा तलावांना मिळाली नवसंजीवनी

By Admin | Updated: February 23, 2016 01:34 IST2016-02-23T01:34:29+5:302016-02-23T01:34:29+5:30

जिल्ह्यात एकूण १ हजार ६०० मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलाव जुने असल्याने त्यांच्या पाळी फुटल्या

204 Mata Talao got Navsanjivani | २०४ मामा तलावांना मिळाली नवसंजीवनी

२०४ मामा तलावांना मिळाली नवसंजीवनी

गडचिरोली : जिल्ह्यात एकूण १ हजार ६०० मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलाव जुने असल्याने त्यांच्या पाळी फुटल्या आहेत. त्याचबरोबर गाळ साचला असल्याने त्यांच्या दुरूस्तीचे काम रोहयोच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. २००६ ते २०१५ या नऊ वर्षांच्या कालावधीत ४९६ मामा तलावांच्या दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २०४ तलावांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून ९२ तलावांचे काम प्रगतीपथावर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात किमान दोन ते तीन मामा तलाव बांधण्यात आले आहेत. ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या तलावांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही तलावांच्या पाळी फुटण्यास सुरुवात झाली. तर सातत्याने गाळ साचून मामा तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली. त्यामुळे या तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेणे आवश्यक होते.
गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. रोहयो विभागाच्या पुढाकारातून या मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. २००६ ते २०१५ या कालावधीत रोहयो विभागाने सुमारे ४९६ मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. तर २९६ कामे सुरू आहेत. तलाव दुरूस्तीमुळे हजारो हेक्टरवरील धानपिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
३७० शेततळे बांधकामास मंजुरी
४आकस्मिक स्थितीत शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे खोदून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रोहयो विभागाने जिल्हाभरात ३७० शेततळे बांधकामास मंजुरी दिली. त्यापैकी १४३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ७६ शेततळे अपूर्ण आहेत. तर १५० शेततळ्यांचे काम सेल्फवर घेण्यात आले आहे. शेततळ्यांमुळेही शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग शेततळे खोदण्यास स्वत:हून तयार होत आहे.
१ हजार ८२८ बोड्यांची झाली दुरूस्ती
४धानाच्या पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात बोडींचाही सिंहाचा वाटा आहे. रोहयो विभागाच्या वतीने सुमारे ३ हजार ४०६ बोड्यांची दुरूस्ती करण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यापैकी १ हजार ८२८ बोड्यांची दुरूस्ती पूर्णपणे झाली आहे. ७२१ कामे अपूर्ण आहेत. तर ८५७ बोड्यांच्या दुरूस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बोड्यांची संख्या १० हजारपेक्षा अधिक आहे. या सर्वच बोड्यांची पाणी साठवण क्षमता वाढल्यास येथील शेती सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.

Web Title: 204 Mata Talao got Navsanjivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.