शाळा लावणार २० हजार झाडे
By Admin | Updated: June 10, 2016 01:24 IST2016-06-10T01:24:47+5:302016-06-10T01:24:47+5:30
१ ते ७ जुलैदरम्यान राज्यभरात वनमहोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. या महोत्सवाअंतर्गत राज्यात २ कोटी, गडचिरोली जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे.

शाळा लावणार २० हजार झाडे
वनमहोत्सवादरम्यान लागवड : प्रत्येक शाळेला दिले आहे उद्दिष्ट; प्रशासन लागले कामाला
गडचिरोली : १ ते ७ जुलैदरम्यान राज्यभरात वनमहोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. या महोत्सवाअंतर्गत राज्यात २ कोटी, गडचिरोली जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. शाळांनाही वृक्ष लागवड सक्तीची करण्यात आली असून जिल्हाभरातील शाळांना २० हजार ९८१ वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये माध्यमिक विभागाला ४ हजार ५८० व प्राथमिक विभागाला १५ हजार ४०१ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीसाठी शाळा व शिक्षण विभाग कामाला लागले आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे निर्देश प्रत्येक विभागाला देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के जंगल असले तरी गडचिरोली जिल्ह्यालाही ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी लागणारे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग मागील दोन महिन्यांपासूनच कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी नर्सऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ५५३ माध्यमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेजवळ प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. बहुतांश शाळांच्या मैदानाला संरक्षण भिंत सुद्धा बांधण्यात आली आहे. त्यामुळे मैदानाच्या सभोवताल व शाळेच्या मागे वृक्ष लागवडीस जागा उपलब्ध आहे. माध्यमिक विभागाने प्रत्येक शाळेला किमान २० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
प्राथमिक शाळांची स्थिती मात्र भिन्न आहे. काही शाळांजवळ प्रशस्त क्रिडांगण उपलब्ध आहे. तर काही शाळांकडे मात्र क्रीडांगण नाही. काही शाळांच्या क्रीडांगणाला संरक्षण भिंतसुद्धा बांधण्यात आली नाही. त्यामुळे प्राथमिक विभागाने सरसकट उद्दिष्ट न देता संबंधित शाळेकडे उपलब्ध असलेले क्रीडांगण, संरक्षण भिंत लक्षात घेऊन उद्दिष्ट दिले आहे. काही शाळांना ५ तर काही शाळांना २० पेक्षा अधिक वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. लावलेले वृक्ष जगविण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार आता शाळा कामाला लागल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, ज्येष्ठ नागरिक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करता येणार आहे. शाळांनी किती झाडे लावली व किती झाडे जगविली, याचीही माहिती वृक्ष लागवडीनंतर घेतली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)