१८ गावांमध्ये पाणी टंचाई
By Admin | Updated: April 25, 2017 00:32 IST2017-04-25T00:32:30+5:302017-04-25T00:32:30+5:30
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हाभरात केलेल्या निरिक्षणात ...

१८ गावांमध्ये पाणी टंचाई
सरासरी पाणी पातळी ०.२९ मीटरने वाढली : भूजल सर्वेक्षण विभागाचे निरिक्षण
गडचिरोली : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हाभरात केलेल्या निरिक्षणात मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजलाची पातळी ०.२९ मीटरने वाढली असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. मात्र जिल्ह्यातील १८ गावांमधील विहिरीच्या पाण्याची पातळी घटली असल्याने या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची भिती भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने वर्षातून चारवेळा म्हणजेच दर तीन महिन्याला भूजलाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. भूजलाच्या पातळीचा आढावा घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने बाराही तालुक्यातील ११२ विहिरींची निवड केली आहे. या विहिरींमधील पाण्याच्या पातळीवरून भूजलाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. मार्च महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये एकूण ११२ विहिरींपैकी ३५ विहिरींची पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.३५ मीटरने घटली असल्याचे आढळून आले. तर ७७ विहिरींची पाण्याची पातळी सरासरी ०.६० मीटरने वाढली असल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षातील पाण्याची सरासरी पातळी ६.४३ मीटर आहे. तर मार्च महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये पाण्याची पातळी ६.१४ मीटर असल्याचे आढळून आले आहे. यावरून सरासरी ०.२९ मीटरने पाण्याची पातळी वाढली असल्याचे निरिक्षण सर्वेक्षण विभागाने नोंदविले आहे. गडचिरोली तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आलेल्या एकूण १० विहिरींपैकी पाच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तर पाच विहिरींची पाणी पातळी घटली आहे. आरमोरी तालुक्यातील चार विहिरींची पाणी पातळी घटली आहे. देसाईगंज तालुक्यातील दोन विहिरींची पातळी घटली. तर पाच विहिरींची वाढली आहे. कुरखेडातील तीन विहिरींची पातळी घटली तर १२ विहिरींची पातळी वाढली आहे. कोरचीतील एका विहिरीची पाणी पातळी घटली तर पाचची वाढली आहे. धानोरातील तिनची घटली तर नऊ विहिरींची वाढली आहे. चामोर्शी तालुक्यातील पाच विहिरींची पातळी घटली तर सहा विहिरींची वाढली आहे. मुलचेरा तालुक्यातील पाचही विहिरींच्या पाणी पातळीत वाढली आहे. अहेरी तालुक्यातील दोन विहिरीत घट तर नऊ विहिरीत वाढ झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील सहा विहिरीत घट तर सहा विहिरीत वाढ झाली आहे. भामरागडात सहाही विहिरीत वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील चार विहिरींच्या पाणी पातळीत घट तर पाच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
या गावांमध्ये भासणार पाणी टंचाई
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये धानोरा तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतमधील गोटे विहीर व जांभळी येथे पाणी टंचाईची भिती व्यक्त केली जात आहे. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, रानभूमी, रानमूल, मसेली, विहिरगाव चक, विहिरगाव मो., मुडझा तुकूम, वाकडी, कनेरी, मुरखळा, नवेगाव, पुलखल, इंदाळा, कोटगल, पारडी कुपी या गावांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पाणी टंचाईची भिती भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
मागील वर्षी सरासरी ११५ टक्के पाऊस
गडचिरोली जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३५४.७८ मीमी एवढे आहे. जून ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १५५९.४३ मीमी पाऊस झाला. सरासरीच्या २०४.६५ मीमी अधिकचे पाऊस झाले. सरासरी टक्केवारीच्या ११५.११ मीमी पर्जन्यमान झाले आहे. पाऊस अधिक पडल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रूपांतरीत खडक आहे. ८० टक्के भूभागावर जंगल आहे. विघटीत रूपांतरीत खडकाची खोली २० ते ३० मीटर एवढी आहे.