लागवडीसाठी १६ लाख रोपटे उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:01:27+5:30
राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.

लागवडीसाठी १६ लाख रोपटे उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवडीसाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शासनाचे विविध विभाग व सामान्य नागरिकांना रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. या दोन विभागामार्फत नागरिक व प्रशासकीय यंत्रणांना यावर्षी सुमारे १५ लाख ७९ हजार रोपटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.
गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या पाचही वन विभागांनी रोपटे लावले आहेत. सद्य:स्थितीत आलापल्ली वन विभागाकडे १७.२१ लाख, भामरागड वन विभागात ६७ हजार, गडचिरोली वन विभागात ३.४८ लाख, सिरोंचा ४.३५ लाख, देसाईगंज १.७९ लाख असे एकूण २७ लाख ५० हजार रोपटे उपलब्ध आहेत. त्यापैकी वन विभाग १४ लाख २१ हजार वृक्ष लागवड करणार आहे. यातून शिल्लक असलेले १३ लाख २९ हजार रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाकडेही ३ लाख ५० हजार रोपटे आहेत. त्यापैकी सामाजिक वनीकरण विभाग स्वत: १ लाख रोपटे लावणार आहेत. तर अडीच लाख रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.
नाममात्र किंमत आकारणार
नागरिक, सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवड करून ते जगवावे हा मुख्य उद्देश वृक्ष लागवडीमागे आहे. त्यामुळे नागरिकांना नाममात्र किंमतीत रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्ष लागवड योजनेची जागृती व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. तरीही नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे.
जुन्या मृत रोपट्यांच्या जागी नवीन लावणार
जिल्ह्यात नव्याने रोपटे लावण्यासाठी आता पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे जुने रोपटे जिवंत नसल्यास त्याच जागी नवीन रोपट्यांची लावगड करण्यावर भर दिला जाणार आहे.