१६ तास २०० गावे अंधारात
By Admin | Updated: June 12, 2017 00:55 IST2017-06-12T00:55:09+5:302017-06-12T00:55:09+5:30
धानोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. वादळी पावसाने धानोरा-गडचिरोली

१६ तास २०० गावे अंधारात
वीज तारांवर झाडे कोसळली : ३३ केव्ही वीज वाहिणीवरून पुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. वादळी पावसाने धानोरा-गडचिरोली मार्गावरील ३३ केव्हीच्या वीज वाहिणीच्या तारांवर झाडे कोसळली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजतापासून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत २०० गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. धानोरा तालुक्यातील तब्बल २०० गावे १६ तास अंधारात होती.
धानोरा तालुक्यात जवळपास अडीचशेवर गावे आहेत. चातगाव, धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, कोटगूल आदी भागातील सर्व गावे १६ तास अंधारात होती. गडचिरोलीवरून येणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिणीवरून धानोरा तालुक्यातील अडीचशेवर गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने वीज तारांवर झाडे कोसळली. परिणामी ६ वाजतापासून वीज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून रविवारी सकाळी १० वाजता धानोरा मुख्यालयासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र त्यानंतरही रविवारी ४ वाजतानंतर तालुक्यात वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरूच होता. शनिवारी रात्री दुधमाळाजवळ इन्सुलेटर लिक झाल्याने तसेच तारांवर झाडे पडल्याने २०० गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला.