१४७ दलित वस्त्या प्रकाशमान
By Admin | Updated: February 3, 2015 22:54 IST2015-02-03T22:54:16+5:302015-02-03T22:54:16+5:30
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांमध्ये एलएडी बेस सौर पथदिवे स्थापित करण्याची योजना

१४७ दलित वस्त्या प्रकाशमान
सौर पथदिव्यांद्वारे : उर्वरित ४२५ वस्त्या २०१७ पर्यंत
दिलीप दहेलकर - गडचिरोली
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांमध्ये एलएडी बेस सौर पथदिवे स्थापित करण्याची योजना सन २०१३-१४ या वर्षांपासून जिल्ह्यात राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुक्यात ग्रामीण भागात एकूण ५७२ दलित वस्त्या आहेत. यापैकी दोन वर्षात जि.प.च्या समाज कल्याण विभागातर्फे १४७ रस्त्यांमध्ये सौरदिवे स्थापित करण्यात आले. यामुळे या वस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत.
दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधींचा निधी खर्च केल्या जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यातून दलित वस्तीत नाली, रस्ता व समाज मंदिराचे बांधकाम केल्या जाते. या विकास कामासोबतच शहरी भागातील दलित वस्ती वगळता आता ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाने ३० जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयान्वये २०१३-१४ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्याची योजना कार्यान्वित केली. सदर योजनेला दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. आतापर्यंत जि.प. समाज कल्याण विभागातर्फे एकूण ५७२ दलित वस्त्यांपैकी १४७ वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. उर्वरित ४२५ दलित वस्त्यांमध्ये २०१७ मार्च अखेरपर्यंत सौर पथदिवे स्थापित करण्यात येणार आहेत.
असे उजाडले सौर पथदिवे
सन २०१३-१४ मध्ये ५० दलित वस्त्यांमध्ये ५४४ सौर पथदिवे लावण्यात आले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील चार गावातील वस्त्यांमध्ये ४०, अहेरी तालुक्यातील सहा गावातील दलित वस्त्यांमध्ये ६०, चामोर्शी तालुक्यातील १० गावातील दलित वस्त्यांमध्ये १०८, कुरखेडा तालुक्यातील तीन गावातील दलित वस्त्यांमध्ये ३४, देसाईगंज तालुक्यातील आठ गावातील दलित वस्त्यांमध्ये ९२, मुलचेरा तालुक्यातील चार गावातील दलित वस्त्यांमध्ये ९२, आरमोरी तालुक्यातील तीन गावातील रस्त्यांमध्ये ३८ व सिरोंचा तालुक्यातील १२ गावातील दलित वस्त्यांमध्ये १२६ सौर पथदिवे लावण्यात आले.
सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे पाच तालुक्यातील ९७ गावातील दलित वस्त्यांमध्ये ६९९ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. यामध्ये भामरागड तालुक्यातील चार गावातील दलित वस्त्यांमध्ये ३४, एटापल्ली तालुक्यातील १४ गावातील दलित वस्त्यांमध्ये ८४, कोरची तालुक्यातील २५ गावातील दलित वस्त्यांमध्ये १३६, अहेरी तालुक्यातील २६ गावातील दलित वस्त्यांमध्ये २१६, सिरोंचा तालुक्यातील २८ गावातील दलित वस्त्यांमध्ये २२९ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.