१४ गावांचा सिंचन प्रश्न सुटणार
By Admin | Updated: September 24, 2014 23:34 IST2014-09-24T23:34:03+5:302014-09-24T23:34:03+5:30
रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता.

१४ गावांचा सिंचन प्रश्न सुटणार
गावकऱ्यांनी दिली चावी परत : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे आश्वासन
घोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त १४ गावातील नागरिकांनी मंगळवारी दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. यासंदर्भात बुधवारी चापलवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात सभा झाली. या सभेत १४ गावाच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी दिना कालव्याच्या कुलूपाची चावी अभियंत्याकडे सोपविली.
बुधवारी चापलवाडा येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीला पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन विभाग चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता बारापात्रे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी १४ गावातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. जि. प. सदस्य सोनटक्के यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून १४ गावाच्या शेतीला दिना प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पोहोचते किंवा नाही, याची शहानिशा करण्याची मागणी केली. यावर यासंदर्भात सर्व्हेक्षण करून याबाबतची माहिती १४ गावातील शेतकऱ्यांना देण्याची कबुली अभियंता सिंचाई उपविभाग चामोर्शी यांनी स्वीकारली. तसेच सर्व्हेक्षण पूर्ण करून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
सर्व्हेक्षणाअंती दिना प्रकल्पाचे पाणी १४ गावाच्या शेतीला खरीप हंगामाला देण्याचे मान्य करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अभियंता बांदे उपस्थित होते. तसेच सुरेश मोहुर्ले, गिरमा मोहंदा, रेवनाथ ठाकूर, गोपिनाथ बांकवार, गुरूदास पालकवार, सुधाकर मेकलवार, वसंत आत्राम, विलास ठाकूर, नानाजी पदा, केशव खोब्रागडे, नितेश कोहपरे, विलास चौधरी, चैतू हिचामी, काशिनाथ वैरागडे, विजय वाकडे, संजय वाकडे, केशव पोटावी आदी १४ गावातील शेतकरी उपस्थित होते. यापूर्वीही दोन ते तिनदा १४ गावातील शेतकऱ्यांनी आलटून पालटून दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. (वार्ताहर)