१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित
By Admin | Updated: January 31, 2016 01:18 IST2016-01-31T01:18:51+5:302016-01-31T01:18:51+5:30
राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित
महाविद्यालयस्तरावर : जिल्हयात यंदा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया मंदावली
दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव, कनेक्टिव्हीटीची समस्या, समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रचंड मंदावली. महाविद्यालयस्तरावरूनही शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज व हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अद्यापही सादर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे सन २०१५-१६ या चालू वर्षात जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एकूण १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरले. मात्र यापैकी एकही अर्ज समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. हे सारेच अर्ज महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असल्याने शिष्यवृत्ती मंजुरीसाठी प्रचंड विलंब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
सन २०१५-१६ या चालू सत्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मिळून एस.सी., ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास १८ हजार ५०० आहे. यापैकी यंदा १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी समाजकल्याणच्या वेबसाईडवर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची हार्डकॉपी महाविद्यालयाकडे सादर करावयाची होती. सदर हार्डकॉपी व कागदपत्रांची तपासणी करून महाविद्यालय प्रशासनाने जिल्हास्तरावर असलेल्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावयाचे होते. तसेच सदर अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन करणे आवश्यक होते. त्यानंतर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची हार्डकॉपी व जुन्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची अशी पद्धत आहे. मात्र शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत महाविद्यालयस्तरावर प्रचंड दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर करण्यास विलंब होणार आहे.
राज्याच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती योजनेची अर्धीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्ती योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.