महिनाभरात १३५ पाणी नमूने दूषित
By Admin | Updated: August 18, 2016 01:28 IST2016-08-18T01:28:27+5:302016-08-18T01:28:27+5:30
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे.

महिनाभरात १३५ पाणी नमूने दूषित
आरोग्य धोक्यात : उपाययोजना करण्याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष
दिलीप दहेलकर गडचिरोली
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय हातपंप, विहीर, नळ व इतर पाणी स्त्रोताच्या सभोवताल स्वच्छता राखणे गरजेचे आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग, तालुका व जिल्हा प्रशासन वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगत आहे. मात्र असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील तब्बल १३५ पाणी नमूने तपासणीअंती दूषित आढळल्याने संबंधित गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असलेल्या जलसुरक्षकामार्फत गावातील पाणी नमूने तपासणीसाठी पंचायत समितीस्तरावरून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. जुलै महिन्यात बाराही तालुक्यातील गावांमधून एकूण ३ हजार ९०५ पाणी नमूने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात आले. तपासणीअंती यापैकी १३५ पाणी नमूने दूषित आढळले असून याचे प्रमाण ३.४६ आहे. विशेष म्हणजे कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक ४६ व अहेरी तालुक्यातील ४३ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे. या तालुक्यातील गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जि. प. च्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालात नमूद आहे.
१ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत बाराही तालुक्याच्या गावांमधून एकूण १८ हजार १२ पाणी नमूने तपासणीसाठी जिल्हास्तरावर प्राप्त झाले. या पाणी नमून्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी ८०४ पाणी नमूने दूषित आढळून आले असून यातील दूषित पाण्याचे प्रमाण ४.४६ आहे. सात महिन्यांच्या कालावधीत अहेरी तालुक्यातील सर्वाधिक २४०, चामोर्शी तालुक्यातील १३३, धानोरा तालुक्यातील ११३, कुरखेडा तालुक्यातील १२० व आरमोरी तालुक्याच्या गावातून १०१ पाणी नमूने दूषित आढळून आले आहे.
गेल्या महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू असून गावागावात अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, उलटी, अतिसार व इतर जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही संख्या सध्या जिल्ह्यात मोठी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा जलजन्य आजारातून नागरिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी गुणवत्ता कार्यशाळा आयोजित करून जिल्हाभर पाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.