४० केंद्रावरून १३ हजार ३८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By Admin | Updated: February 13, 2015 01:42 IST2015-02-13T01:42:18+5:302015-02-13T01:42:18+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.

४० केंद्रावरून १३ हजार ३८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात ४० केंद्रावरून नियमित १२ हजार २७६ व १ हजार ५ पुनर्रपरीक्षार्थी असे मिळून एकूण १३ हजार ३८१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ओळखपत्रे कनिष्ठ महाविद्यालयात पाठविण्यात आली आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या १० तारखेपासून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गैरमार्गाविरूद्ध लढा कृती कार्यक्रमांतर्गत कॉपीमुक्त अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश दिले आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असून गैरप्रकाराबाबत कुणाचीही गय करणार नाही.
-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. गडचिरोली
सहा भरारी पथकांची राहणार नजर
जिल्ह्यात बारावीची परीक्षा निकोप व शांततेच्या वातावरणात शिस्तीत पार पडावी, तसेच कापी प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट व एका स्वतंत्र महिला पथकाचा समावेश आहे.