आणखी मिळणार १२५ सौर कृषिपंप

By Admin | Updated: July 22, 2015 02:23 IST2015-07-22T02:23:18+5:302015-07-22T02:23:18+5:30

केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले ...

125 solar power plants will get more | आणखी मिळणार १२५ सौर कृषिपंप

आणखी मिळणार १२५ सौर कृषिपंप

केंद्र शासनाची योजना : वीज कंपनी करणार सहकार्य
गडचिरोली : केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले असून त्यासाठी लवकरच अर्जांची मागणी केली जाणार आहे. यापूर्वीही नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ सौर कृषिपंप बसविण्यात आले असून सदर कृषीपंप सुरू सुध्दा झाले आहेत.
औष्णीक वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदुषण होत असून याचे परिणाम संपूर्ण सजीव जातीला भोगावे लागत आहे. त्याचबरोबर भविष्यात कोळशाची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र शासनाने संपूर्ण अपांरपरिक ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाने एक लाख सौर कृषिपंप मंजूर केले असून त्यासाठी सुमारे ४०० कोटी रूपये आरक्षित केले आहेत. महाराष्ट्र राज्याला ७ हजार ५४० नग सौर कृषीपंप मंजूर केले आहेत.
योजनेच्या निकषानुसार या योजनेचा लाभ देण्यासाठी अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली व वर्धा या आत्महत्याग्रस्त व आदिवासी बहूल जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी १२५ सौर कृषिपंप मंजूर झाले आहेत. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून अर्जांची मागणी लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर असणे गरजेचे आहे. शेतकरी हा अतिदुर्गम भागातील असावा, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण झालेले नसावे, वन विभागाचा अडथळा नसावा, पाच एकर पेक्षा अधिक शेती असू नये, लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषिपंप आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. (नगर प्रतिनिधी)
महावितरण भरणार कर्ज
कृषिपंपासाठी केंद्र शासन ३० टक्के अनुदान देणार आहे. पाच टक्के अनुदान राज्य शासन भरणार आहे. पाच टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरायचा आहे. तर उर्वरित ६० टक्के रक्कम लाभार्थ्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार आहे. महावितरण टप्प्याटप्प्याने कर्जाची परतफेड करणार आहे.
३ ते ७.५ अश्वशक्तीचे मिळणार पंप
या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती एसी, तीन अश्वशक्ती डीसी, पाच अश्वशक्ती एसी, पाच अश्वशक्ती डीसी, ७.५ अश्वशक्ती एसी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे.

Web Title: 125 solar power plants will get more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.