१० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:20 IST2018-02-16T00:20:05+5:302018-02-16T00:20:33+5:30
चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

१० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
प्रकाश बोदलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याबाबीची दखल घेऊन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या पुढाकाराने हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आले आहे व आता या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. सदर सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ २० गावातील शेतकºयांना मिळणार आहे.
चामोर्शी तालुक्यातील महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या कामासाठी निधी प्राप्त होताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. या सिंचन प्रकल्पामुळे २० गावातील १० ते १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.
गणपूर, जैरामपूर परिसरातील गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मंजुरी दिली. सन २०१५ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. विदर्भ पाटबंधारे उपसा सिंचन विभाग नागपूर या यंत्रणेमार्फत या योजनेचे काम सुरू आहे. वैनगंगा नदीवर या सिंचन योजनेचे काम सुरू असून पावसाळ्यात नदीला पाणी असल्यामुळे या योजनेचे काम थंडबस्त्यात होते. मात्र आता या योजनेच्या कामाने वेग घेतला आहे.
सदर कामासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत असल्याने या योजनेचे काम २०२० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता संबंधित यंत्रणेने व्यक्त केली आहे. या परिसरातील जमीन सुपीक आहे. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने याभागातील शेतकºयांना वर्षभरात केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागते. मात्र आता सदर उपसा सिंचन योजनेमुळे या भागात शेतकºयांच्या हरीतक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या कामाला भेट देऊन स्थिती जाणून घेत आहेत.
उत्पन्न दुपटीने वाढणार
सद्य:स्थितीत गणपूर, जैरापूर या भागातील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या भरवशावर येथील शेतकरी वर्षातून केवळ एकच पीक घेतात. मात्र सदर उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आल्यानंतर दुबार पिके घेणे या भागातील शेतकºयांना शक्य होणार आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न दुपटीने वाढणार आहे.
या गावांना होणार सुविधा
हलदी पुराणी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यावर चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर, किष्टापूर, येणापूर, सगणापूर, मुधोली रिठ, मुधोली चेक, अड्याळ, सेलूर, चित्तरंजनपूर, उमरी, सोमनपल्ली, गुंडापल्ली, अनखोडा, हळदी माल, हळदी पुराणी व वायगाव आदी २० गावातील शेतजमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.