तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पुराण! कुठे पुचका, कुठे गोलगप्पा तर कुठे पानीपुरी; 'सहिष्णू' पदार्थाची रसरशीत स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:55 IST2025-01-08T17:32:30+5:302025-01-08T17:55:10+5:30
टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही.

तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पुराण! कुठे पुचका, कुठे गोलगप्पा तर कुठे पानीपुरी; 'सहिष्णू' पदार्थाची रसरशीत स्टोरी
>> शुभा प्रभू-साटम
मनुष्य प्राण्याचा आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाहिला तर त्यातून खाद्यसंस्कृतीला वेगळं काढता येत नाही. मानवाची ही खाद्ययात्रा रंजक आहे. तिला इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. या सदरातून त्याचा पाक्षिक वेध घेतला जाईल...
....
आज खाण्यापिण्याचे जे करोडो प्रकार आहेत त्यांचा पूर्वज कोण? म्हंजे आता पाणीपुरी घ्या.. उगा पुरणपोळी आणि मोदक अशा पदार्थांचे शिवधनुष्य नको हा दिसायला टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही. भले जगातील अद्वितीय पदार्थांचे स्टॉल असोत या पदार्थांचा ठसका कमी होत नाही. लोक प्रथम तिची काही आवर्तने करून मग मुख्य यज्ञकर्माला सुरुवात करतात. नवे सदर आहे आणि त्याची बोहोनी पाणीपुरी या पदार्थाने करतेय.
पु.ल. यांचे चिरोट्यांबद्दल मत माहीत नसेल असा मध्यमवयीन मराठी माणूस नसावा. खारी बिस्कीट फसले. त्यावर साखर घालून चतुर गृहिणीने नवऱ्याला बनवले... तसे काही पुरीबाबत झाले असावे, असा माझा चवदार अंदाज आहे. म्हंजे पुरी बेत ठरला असावा, पण काही पुऱ्या स्वतंत्र कणखर व्यक्तिमत्त्वाच्या निघून मोडेन; पण वाकणार नाही या भावनेने फुगून राहिल्या असाव्यात. पुरी कोडे इथे थोडे सुटले, पण मग त्याची जोडी भूतलावरील त्या अमृततुल्य पाण्याशी कशी कोणी जुळवली? मुळात असे पाणी करायचे हे कसे सुचले?
जगातील अनेक चविष्ट पदार्थांचे उगम किंवा जन्म अपघाताने झाले असे मानले जाते. हे काहीअंशी खरे आहे, पण पाणीपुरी हा अपघाती पदार्थ नसावा. कोणीतरी इरसाल, आंबटशौकीन व्यक्तीने याची निर्मिती केली असावी... आणि तो माणूस अनिकेत मुसाफिर असणार. कारण या पदार्थाचा बेस किंवा मूळ अगदी सुटसुटीत आहे. परत मागणीनुसार बदल होतो. तिखा जादा चाहिए... मिळेल! तिखा मिठा बराबर... मिळेला खट्टा बढाओ... वाढतो। पाणी ज्यादा, रगडा कम... होते. स्वयंपाकघरात शिजलेला कोणताही पदार्थ इतका सहिष्णू नसतो. आमटी जरा अधिक पातळ हवी, मिळेल का विचारून बघा... लंघन करण्याचा अनुभव न मागता मिळेल.
मुद्दा असा की पूर्ण भारतात हा पदार्थ जबरदस्त लोकप्रिय; पण इतिहास मात्र अस्पष्ट. अर्थात त्याने काही फरक पडत नाही म्हणा. तशी मी कट्टर मुंबईकर. पण पाणीपुरी खावी ती कोलकात्यात या मताची. भेळ मुंबईची, विषय संपला, पण पुचका/पाणीपुरीबाबतीत कोलकाता अनभिषिक्त सम्राट. एकतर पुन्या अगडबंब... डेंटिस्टने त्या आपल्याकडे ठेवाव्यात... पार टॉन्सिल दिसतील असे तोंड उघडावे लागते, ते पण राजीखुशीने. आणि ते पाणी... सागर मंथनातून आलेले अमृत आणि सुरा यात दानवांनी सुरा का निवडली हे उमगते. प्रथम थोडे आंबट, मग हलके गोड आणि पुरी गिळता गिळता सणसणीत तिखट.. काय अद्भुत मिश्रण असते राव! दिल्लीमधील गोलगप्पे पुन्हा वेगळे.... इथे मध्यम मार्ग नाही. अगदी साउथ दिल्लीतील अथवा खान मार्केट गैंगपण तिखट आंबटगोड या क्रमाने असणारे पाणी ओरपत असते. मुंबईमधील पाणीपुरी तशी मवाळ. मुंबईसारखी सहिष्णू... मागणी तसा पुरवठा. बाकी भारतात पण पाणीपुरी मिळते; पण ही तीन शहरे बिनीचे शिलेदार.
तर मूळ मुद्दा काय होता? पदार्थांचा उगम कसा, कुठे कधी झाला? मी उत्तर शोधतेय... तोपर्यंत तुम्ही खायची आवर्तन सुरू ठेवा. आणि हो... यज्ञयाग संपला की सुकी पुरी विसरू नका... अलिखित हक्क असतो तो आपला!