"७००-८०० ऑडिशन दिल्या पण...", 'सुख म्हणजे...' फेम मंदार जाधवचं संघर्षकाळावर भाष्य, 'अशी' मिळालेली पहिली मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:48 IST2026-05-06T11:36:42+5:302026-05-06T11:48:51+5:30
७००-८०० ऑडिशन दिल्या पण मिळालं रिजेक्शन! टीव्हीवरील लोकप्रिय नायकानं सांगितला संघर्षकाळ

"७००-८०० ऑडिशन दिल्या पण...", 'सुख म्हणजे...' फेम मंदार जाधवचं संघर्षकाळावर भाष्य, 'अशी' मिळालेली पहिली मालिका
Television: छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रसारित होत असतात. मात्र, त्यातील काहीच मोजक्याच मालिका या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं'. जवळपास साडे चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.या मालिकेतील गौरी, जयदीप व्यतिरिक्त प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. त्याचबरोबर मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं होतं. दरम्यान, या मालिकेतून अभिनेता मंदार जाधवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही प्रेक्षक आजही मंदारला त्याच्या जयदीप या भूमिकेमुळे ओळखतात. सध्या मंदार त्याने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने मालिकाविश्वात त्याची एन्ट्री कशी झाली, तसेच त्याच्या संपूर्ण प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच मंदार जाधवने 'सर्व काही' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याला करिअरमधील पहिली मालिका कशी मिळाली? याविषयी सांगितलं. त्याचबरोबर त्याच्या करिअरमधील संघर्षकाळावर भाष्य केलं. या मुलाखतीत मंदार म्हणाला," मी शाळेत असतानाच मला क्रिकेटबद्दल प्रचंड आवड होती. त्यामुळे मी क्रिकेटर व्हायचं ठरवलं होतं. नंतर कॉलेजमध्ये मी एनसीसी जॉईन केलं आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण आर्मीमध्ये जाऊया. पण, कदाचित नशीबात काही वेगळंच होतं.
माझा लहान मेघन हा सुद्धा एक कलाकार आहे. त्याने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याच्यासोबत मी एका ऑडिशनला गेलेलो, त्याला पाठिंबा देण्यासाठी. पण, तिथे मलाच विचारणा झाली. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही या भूमिकेसाठी जशा मुलाच्या शोधात आहोत त्यासाठी तू परफेक्ट वाटतोस. तर तू काम करशील का? त्यावर मीसुद्धा 'हो मी पण करेन' असं म्हणालो. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. तेव्हा मला पहिली अलादिन ही मालिका मिळाली. तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे माझी पहिली मालिका मिळवण्यासाठी मला स्ट्रगल करावा लागला नाही."
अभिनेता संघर्षकाळावर भाष्य करत म्हणाला...
दरम्यान, मुलाखतीत पुढे मंदारने सांगितलं, "हो संघर्ष आहे. पण, कलाकार म्हणून प्रोफेशनली काम करणं कठीण असतं. माझी पहिली मालिका संपली तेव्हा मला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. दोन अडीच वर्षे ती मालिका सुरू होती, ती एक हिंदी मालिका होती. त्या मालिकेमुळे मी घरोघरी पोहोचलो. पण ती मालिका संपल्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. जरी मला अभिनेता व्हायचं नव्हतं तरी माझ्या नशिबात ते लिहिलं होतं त्यामुळे ती मालिका करत असताना मला अभिनय आवडतो याची जाणीव झाली. ती मालिका संपली त्यावेळी मी खूप बारीक होतो. त्यामुळे मी जेव्हा ऑडिशनला जायचो तेव्हा तू खूप बारीक आहेस, जरा बॉडी बनव, चांगलं खा आणि हिरोसारखं बन आधी, असं सांगितलं जायचं. तेव्हा मी हिंदी मालिकांमध्ये काम करायचो. त्यामुळे सुरुवातीचा जो संघर्। आहे जो हिंदी इंडस्ट्रीत केला. तेव्हा मला जाणवलं की, जर तुम्हाला अभिनेता व्हायचा असेल तर तसं तुम्हाला राहावं लागेल."
७०० ते ८०० ऑडिशन दिल्या पण...
"मग मी स्वत:वर काम केलं. त्यावेळी मी हिंदीमध्ये जवळपास ७०० ते ८०० ऑडिशन दिल्या आहेत. चार-पाच वर्षे हे सुरू होतं आणि बऱ्याचदा मला रिजेक्शन मिळालं. संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या मालिकेनंतर मला दुसरं काम मिळवण्यासाठी जवळपास चार वर्ष लागली. जिथे जायचो तिथे नकार मिळत होता. तेव्हा मी ठरवलेलं की मी एक चांगली मालिका केली आहे. त्यात छान काम केलंय त्यामुळे आपण या क्षेत्रातच राहायला हवं. आई-बाबांचा पाठिंबा होता, त्यामुळे मी त्यातून बाहेर आलो.माझे बाबासुद्धा अभिनेते, दिग्दर्शक, लेखक असल्यानं त्यांना याची जाणीव होती. त्यामुळे, या क्षेत्रातील संघर्ष त्यांना माहीत होता." असा खुलासा अभिनेत्याने यावेळी केला.