कॅन्सरशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:15 IST2026-04-18T11:12:55+5:302026-04-18T11:15:23+5:30
कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन, चाहते शोकमग्न

कॅन्सरशी झुंज अपयशी! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मळ्यालम अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल याचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्यावर कर्करोगासंदर्भात उपचार सुरु होते. मात्र, त्याची कॅन्सरशी ही झुंज अपयशी ठरली. वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्री सीमा जी नायरने त्याच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली. सिद्धार्थ जवळपास दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता आणि या कठीण काळात सीमा त्याच्या सोबत होती.आपलं दुःख व्यक्त करत अभिनेत्री सीमा जी नायरने सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, सगळी आशा संपली आहे. लोकप्रिय मालिका अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल आता अशा जगात गेला आहे जिथे त्याला या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून मी तुझ्यासाठी लढत राहिले, माझे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले असतानाही, तुझा जीव वाचवण्यासाठी मी धावपळ करत राहिले.आज देवानं ठरवलं आहे की तुला आता आणखी त्रास होऊ नये... सिद्धार्थ, मी हे सहन करू शकत नाही, मी पूर्णपणे खचले आहे."अशी भावुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने लिहीली आहे. त्याचबरोबर अभिनेता किशोर सत्या याने देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
सिद्धार्थ वेणुगोपाळ हा मल्याळम टीव्ही क्षेत्रात एक प्रसिद्ध चेहरा होता. त्रिशूरमधील चालकुडीचा रहिवासी असलेल्या सिद्धार्थला अभिनयाची प्रचंड आवड होती. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. सिद्धार्थने आपल्या कारकिर्दीची सुरुवात निवेदक म्हणून केली आणि त्यानंतर, निर्माते अरुण घोष यांच्या मदतीने त्याने टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केलं. 'कस्तुरीमन' आणि 'भाग्यजातकम' सारख्या मालिकांमधून त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि धाकटा भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला.