'ठरलं तर मग' मालिका संपणार? जुई गडकरीने खरं काय ते सांगितलं, म्हणाली- "प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:18 IST2026-04-29T10:18:22+5:302026-04-29T10:18:47+5:30
प्रिया कोण हे कळल्यानंतर मालिकेत काय होणार? मालिका बंद होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावर आता जुईने उत्तर दिलं आहे.

'ठरलं तर मग' मालिका संपणार? जुई गडकरीने खरं काय ते सांगितलं, म्हणाली- "प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर..."
'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत प्रियाचा खरा चेहरा लवकरच सर्वांसमोर येणार आहे. प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठी स्टार प्रवाहच्या १३ नायिका एकत्र आल्या आहेत. प्रियाविरोधातील पुरावे लवकरच सायली आणि अर्जुनच्या हाती लागणार आहेत. पण, प्रिया कोण हे कळल्यानंतर मालिकेत काय होणार? मालिका बंद होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावर आता जुईने उत्तर दिलं आहे.
जुईने अल्ट्रा बझ मराठीशी बोलताना मालिका संपणार नसल्याचं म्हटलं आहे. "सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर मालिका संपेल असं नाही. अजून एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. आता काहीच ट्विस्ट नाहीये. प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही १३ जणी एकत्र आलो आहोत. आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की प्रिया काय आहे, तिने आजवर काय केलंय. आता मी सांगू शकते, प्रतीक्षा संपलीये. मालिका संपून जाईल असं काहीच नाही. यात अजूनही अनेक भाग आहेत. प्रियाचं सत्य समोर येणं हा त्यातलाच एक भाग आहे", असं जुई म्हणाली.
पुढे तिने सांगितलं की "मालिका संपणार नाही कारण प्रियाचा खरा चेहरा समोर आला तरी मी तन्वी आहे, हे अजून घरात कोणालाच माहीत नाहीये. त्यामुळे मालिका संपणार नाही. मधूभाऊ निर्दोष आहेत, तसेच प्रियाचं खरं रूप समोर येणं हा मालिकेचा एक भाग आहे. त्यानंतर सायली तन्वी आहे हा खूप महत्त्वाचा भाग देखील समोर येणार आहे".