निवडणूक निकालापूर्वी थलपति विजय शिर्डीला पोहोचला, साईबाबांचा आशीर्वाद घेतला; चाहत्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:53 IST2026-04-29T15:50:56+5:302026-04-29T15:53:17+5:30
अभिनय करिअरमधील कमालीच्या लोकप्रियतेनंतर आता राजकारणातील करिअरमध्येही यश मिळावं असं मागणं त्याने मागितलं आहे.

निवडणूक निकालापूर्वी थलपति विजय शिर्डीला पोहोचला, साईबाबांचा आशीर्वाद घेतला; चाहत्यांची गर्दी
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजयने तमिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ४ मे रोजी लागणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लागले आहे. निकालापूर्वी थलपति विजय शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आला. मनाला शांती मिळावी आणि विजयासाठी आशीर्वाद मिळावेत, यासाठी तो सध्या विविध मंदिरांना भेटी देत आहे. अभिनय करिअरमधील कमालीच्या लोकप्रियतेनंतर आता राजकारणातील करिअरमध्येही यश मिळावं असं मागणं त्याने मागितलं आहे.
बुधवारी थलापती विजयने शिर्डीत जाऊन साईबाबांच्या चरणी डोकं टेकलं. साईबाबांच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेल्या विजयच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांत भाव पाहायला मिळाला. शिर्डीत पोहोचल्यानंतर आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यापूर्वी मंगळवारी विजयने तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. चेन्नईहून खाजगी विमानाने मदुराईला पोहोचल्यानंतर त्याने पारंपारिक वेशभूषा परिधान करून देवाची पूजा-अर्चना केली होती.
#WATCH | Ahilyanagar, Maharashtra: TVK chief Vijay arrives at Shirdi Sai Baba temple. https://t.co/8Le4g0OQDZpic.twitter.com/6U33ZqaFDQ
— ANI (@ANI) April 29, 2026
राजकीय प्रवासासोबतच विजयच्या चित्रपटसृष्टीतील शेवटच्या प्रवासाचीही चर्चा रंगली आहे. त्याचा 'जन नायकन' हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. जानेवारीमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डासोबतच्या वादामुळे रखडला होता. दरम्यान, हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याच्या बातम्यांनी खळबळ उडाली होती. मात्र, आता निर्मात्यांनी यावर तोडगा काढल्याचे समजते.
ताज्या माहितीनुसार, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ८ मे रोजी 'जन नायकन' चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेसृष्टीतील आपल्या या शेवटच्या चित्रपटाद्वारे विजय चाहत्यांची काय दाद मिळवतो आणि ४ मे च्या निकालातून तो राजकारणात 'जन नायक' ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.