Bharti Singh : "इतकी गरिबी होती की कचऱ्यात फेकलेलं सफरचंद खावसं वाटायचं"; भारती सिंगचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:28 PM2023-12-08T13:28:26+5:302023-12-08T14:10:23+5:30

Bharti Singh : नेहमीच हसतमुख असणाऱ्या भारतीचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं आहे.

कॉमेडियन भारती सिंगने आपलं टॅलेन्ट आणि ह्यूमरने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र नेहमीच हसतमुख असणाऱ्या भारतीचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं आहे.

स्वत: भारतीने ब्रूट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. भारतीने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यांच्याकडे ना खायला पुरेसे अन्न होते ना सण साजरे करण्यासाठी पैसे होते. गरिबी इतकी होती की तिला कचऱ्यामध्ये फेकलेलं सफरचंद उचलून खावसं वाटलं.

लोक अर्ध सफरचंद खायचे आणि ते कचऱ्यात टाकायचे, त्यामुळे मला त्यांना पाप लागेल असं वाटायचं. ते कचऱ्यामध्ये टाकायचे, म्हणून मी ते सफरचंद बाहेर काढून खाण्याचा विचार केला होता. खूप गरिबी होती असं भारतीने म्हटलं आहे.

भारती सांगते की, तिची आई घरोघरी जाऊन झाडू मारण्याचं, लादी पुसायचं काम करायची. आई जिथे काम करायची ते लोक तिला उरलेली भाजी द्यायचे आणि ती शिळी भाजी सुद्धा भारती आणि तिच्या कुटुंबाना ताजी वाटायची..

गरिबीच्या काळात भारतीला सणांचाही तिटकारा होता. कारण सण-उत्सव साजरे करण्यासाठी तिच्याकडे पैसेच नव्हते. तिची आई जेव्हा काम करून मिठाई आणायची तेव्हा तिच्या घरी दिवाळीत पूजा केली जायची.

जेव्हा इतर लहान मुलं रस्त्यावर फटाके फोडायची तेव्हा ती त्यांच्यासोबत जायची आणि टाळ्या वाजवायची. जेणे करून सर्वांना वाटेल की तिनेच हे फटाके फोडले आहेत.

भारती सिंगला कॉमेडी शो ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय ती कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्येही दिसली होती. इतकंच नाही तर भारतीने अनेक रिएलिटी शोही होस्ट केले आहेत.

आपल्या करिअरच्या शिखरावर पोहोचलेल्या भारती सिंगची भेट हर्ष लिंबाचियाशी झाली, त्यानंतर 2017 मध्ये तिने तिच्याशी लग्न केले. या जोडप्याला आता एक गोड मुलगा देखील आहे.