साऊथ सिनेमांमधून 'अशुभ' अभिनेत्रीचा लागला टॅग, नंतर तीच झाली बॉलिवूडची 'एंटरटेनमेंट क्वीन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 02:48 PM2024-02-06T14:48:04+5:302024-02-06T14:56:14+5:30

टीव्ही मालिकांमधून सुरु झाला प्रवास, साऊथमध्ये आला वाईट अनुभव, कोण आहे ती अभिनेत्री?

मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे मोठा स्ट्रगल करुन पुढे आले आहेत. काहींना सगळं आयतं समोर मिळालं आहे तर काहींना बऱ्याच रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. त्यातही बॉडी शेमिंगवरुन तर अभिनेत्रींना अनेकदा टोमणे ऐकायला मिळाले आहेत.

टीव्ही ते सिनेमा असा प्रवास करणाऱ्या कलाकारांचा स्ट्रगल फारच वेगळा असतो. त्यांच्यावर टीव्ही कलाकार म्हणूनच एक लेबल चिकटलेलं असतं. त्यामुळे त्यांना लवकर मोठ्या पडद्यावर घेतलं जात नाही. बॉलिवूडची अशीच एक अभिनेत्री आहे जी छोट्या पडद्यावर काम करुन आली आहे. आज ती एंटरटेनमेंट क्वीन म्हणून ओळखली जाते.

ही अभिनेत्री आहे विद्या बालन (Vidya Balan). बॉलिवूडच्या प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या. जशी ऑनस्क्रीन तितकीच दिलखुलास ती ऑफस्क्रीनही असते. विद्या आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असली तरी तिच्या वाट्यालाही बराच स्ट्रगल आला आहे. इतकंच नाही तर तिच्यावर 'अशुभ'असा टॅगही लागला होता. यामागचं काय कारण होतं वाचा.

विद्याने 1995 साली एकता कपूरच्या 'हम पांच' मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. यातही तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. तसंच तिने 'युफोरिया' च्या म्युझिक व्हिडिओतही काम केले.

माध्यम रिपोर्टनुसार, टीव्ही मालिकांमध्ये काम करत असताना विद्या मास्टर्स शिकत होती. शेवटच्या वर्षात असताना तिला मल्याळम सिनेमा 'चक्रम'ची ऑफर आली. यामध्ये सुपरस्टार मोहनलालही होते. विद्याला साईन केल्यानंतर प्रोडक्शनमध्ये काही अडचणी आल्या.

त्यावेळी सिनेमाचं शूट थांबलं आणि विद्यावर काही आरोप झाले. निर्मात्यांनी तिला अशुभ मानत सिनेमातून काढलं. यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन सिनेमा बनवण्यात आला. विद्याला आलेला हा सर्वात वाईट अनुभव होता. यानंतक तिला रन हा तमिळ सिनेमा मिळाला. मात्र यामधूनही तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

तिला तिसरा सिनेमा मल्याळमच मिळाला ज्याचं नाव 'कलारी विक्रमन' होतं. सिनेमा बनला पण रिलीजच होऊ शकला नाही. ती ज्या सिनेमात असेल त्यात काही ना काही गडबड होत असल्याने तिला अशुभच समजलं गेलं.

अखेर 2003 साली तिने बंगाली सिनेमा 'भालो ठेको' मध्ये काम केले. यातील अभिनयासाठी तिला आनंदलोक पुरस्कारही मिळाला. 'परिणीता'या हिंदी सिनेमात विद्याला कास्ट करणारे विधु विनोद चोप्रा यांनी तिला याच बंगाली सिनेमात पाहून घेतलं होतं.

'परिणीता' सिनेमा सुपरहिट झाला. यासाठी विद्याला बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिचं बॉलिवूड करिअर सुरु झालं आणि तिने अनेक हिट सिनेमे दिले.

'द डर्टी पिक्चर', 'कहानी', 'हे बेबी', 'भुलभुलैय्या', 'सलाम ए इश्क', 'लगे रहो मुन्नाभाई', 'नो वन किल्ड जेसिका' यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारली.