"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:26 IST2026-04-25T14:25:38+5:302026-04-25T14:26:11+5:30
घटस्फोटाची पोस्ट केल्यानंतर अनेक फोन आले, पण..., काय म्हणाला राहुल देशपांडे?

"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडेने गेल्या वर्षी सोशल मीडियावरघटस्फोटची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. असं का झालं? नक्की काय घडलं असेल? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात होते. आता नुकतंच राहुलने पहिल्यांदाच त्या पोस्टवर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर ही घोषणा करण्याची गरज का वाटली? याचं उत्तर त्याने दिलं. 'हा अध्याय संपला...' असं तो यावेळी म्हणाला.
'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल देशपांडे म्हणाला, "मला वाटतं मी एक कलाकार आणि माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक आहे. मी याआधी रेणुका आणि नेहासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे मला फॉलो करणारे, माझे चाहते यांना सांगणं ही माझी जबाबदारी आहे. हा अध्याय संपला एवढंच सांगायचा त्यामागे हेतू होता. नाहीतर आम्ही कुठेही बाहेर गेलो की आमच्या तिघांचे फोटो असायचे. मोजके फोटो मी सोशल मीडियावर पोस्ट करायचो. मग जर हा अध्याय संपलाय तर ते सोशल मीडियावर सांगणं मला गरजेचं वाटतं. त्यामागे दुसरा काहीही हेतू नव्हता."
आम्ही आजही चांगले मित्र
राहुल पुढे म्हणाला, "आमचे संबंध आजही चांगलेच आहेत. आम्ही रेणुकाचे आईवडील आहोत आणि कायम राहू. आताही मी रेणुकाची पोस्ट टाकली होती त्यात नेहाही होती. नेहानेही पोस्ट केली त्यात मी होतो. आम्ही कोलॅबोरेट केलं. एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, माझी नव्हती असं आपण म्हणतो असं काही नाही. आपण ते नातं मागे सोडून आयुष्यात एक व्यक्ती म्हणून पुढे जाऊच शकतो. हे काही मुद्दामून होत नाही. त्याला विविध कारणं असतात. यात तुमचीही चूक असते. तुम्हाला वाटतं समोरच्याची तर त्याचीही चूक असते. कायम याच्या दोन बाजू असतात. आपण उगाचच याचा बाऊ करतो."
सोशल मीडियावर जाहीर केल्याचा नेहाचा त्रास झाला
"या पोस्टनंतर मला अनेक फोन आले. पण मी एकही फोन घेतला नाही. मला कोणाशी बोलायचंच नव्हतं. हा माझा वैयक्तिक विषय होता. मी कसा बरोबर होतो किंवा माझ्यावर कसा अन्याय झाला हे मी का सांगायचं? कारण हे झालेलंच नाही. मग बाकी सगळं स्पष्ट करण्यात कशाला वेळ घालवायचा. पण याचा त्रास नेहाला झाला का? तर हो, १०० टक्के. नेहाला त्रास झाला. रेणुकाला तर खूप जास्त त्रास झाला. पण ही माझी खाजगी गोष्ट असली तरी हे कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत. कोणाची चूक आहे आहे, हा असाच आहे, याला अक्कलच नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल या असल्या गोष्टींना काही अंत नाही."