सुनेत्रा पवारांसाठी विवेक ओबेरॉयची मराठीतून पोस्ट, म्हणाला "दादांच्या योग्य वारसदार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:00 IST2026-05-10T15:58:14+5:302026-05-10T16:00:17+5:30
विवेकने इन्स्टाग्रामवर सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या विजयाचे कौतुक केले.

सुनेत्रा पवारांसाठी विवेक ओबेरॉयची मराठीतून पोस्ट, म्हणाला "दादांच्या योग्य वारसदार..."
Vivek Oberoi Post For Sunetra Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सुनेत्रा पवार यांनी २.१४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून, बारामतीमध्ये अजितदादांचा वारसा आणि आपला राजकीय दबदबा सिद्ध केला. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं भावुक पोस्ट शेअर केली आहे.
विवेकने सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "सुनेत्रा वहिनी, अजित दादांनी उभारलेला भक्कम वारसा आज बारामतीकरांच्या प्रेमातून पुन्हा एकदा दिसून आला. तुमचा हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अभिमानास्पद नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि हे यश फक्त तुम्हीच मिळवू शकत होतात"
पुढे विवेकनं लिहलं, "दादांची जनतेसाठीची कामं, लोकांवरील प्रेम आणि कठीण प्रसंगातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद यामुळेच ते खरे जननेते ठरले. आज जनतेनं त्यांच्या अर्धांगिनीवर दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्या वारशाच्या योग्य वारसदार तुम्हीच आहात. तुमच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी हा काळ निश्चितच सुवर्णयुग ठरेल, असा विश्वास आहे". विवेकने आपल्या पोस्टच्या शेवटी "सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!" ही ओळ मराठीत लिहली.
@SunetraA_Pawar Vahini, Ajit Dada’s presence remains through the incredible legacy he built, now beautifully reflected in the outpouring of love from Baramati. This historic win marks a proud new chapter for Maharashtra’s first woman Deputy Chief Minister, a feat only you could… pic.twitter.com/K7G78GaoEN
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 9, 2026
"ही दादांना खरी आदरांजली"
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या मतदारांचे आभार मानताना भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,"अजित पवार यांच्या निधनानंतरची ही माझी पहिलीच निवडणूक आहे. मला ही निवडणूक लढवावी लागेल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. बारामतीच्या जनतेने दिलेली ही मते अजित दादांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. बारामती हे माझे कुटुंब आहे आणि विकासाचा हा वारसा मी पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन".