अमिताभ बच्चनमुळे राजेश खन्ना गेले होते दारुच्या आहारी, अपयश पचवणं अभिनेत्यासाठी झालेलं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:31 IST2026-04-16T09:30:27+5:302026-04-16T09:31:00+5:30
Rajesh khanna: यशाच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्ना यांनी प्रसिद्धीसह वाईट काळही पाहिला.

अमिताभ बच्चनमुळे राजेश खन्ना गेले होते दारुच्या आहारी, अपयश पचवणं अभिनेत्यासाठी झालेलं कठीण
इंडस्ट्रीचा पहिला सुपरस्टार म्हणून आजही दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्याकडे पाहिलं जातं. आराधना, आनंद, कटी पतंग, हाथी मेरे साथी, अमर प्रेम यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमा त्यांनी दिली. त्याकाळी तरुणींमध्येही त्यांची क्रेझ होती. यशाच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्ना यांनी प्रसिद्धीसह वाईट काळही पाहिला आहे. एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्यांचे सगळे सिनेमा लागोपाठ फ्लॉप होत होते. तर,दुसरीकडे अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर पोहोचत होते.
अलिकडेच प्रसिद्ध अभिनेता प्रेम चोपडा यांनी विक्की लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलत असतांना अमिताभ बच्चन यांचं यश पाहून राजेश खन्ना प्रचंड अस्वस्थ झाले होते, असं ते म्हणाले.
''राजेश खन्ना यांनी कधीच त्यांच्या त्रासाविषयी उघडपणे भाष्य केलं नाही. पण, त्यांचा त्रास सगळ्या इंडस्ट्रीला दिसत होता. त्यावेळी तो टॉपचा अभिनेता होता आणि अचानक येत असलेलं अपयश पचवणं त्याला झेप नव्हतं. बदलत्या परिस्थितीसोबत ताळमेळ बसवण्यासाठी त्याने अधिकाधिक दारु प्यायला सुरुवात केली होती'', असं प्रेम चोपडा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''अमिताभ बच्चन त्यावेळी लोकप्रिय अभिनेता का झाला?, तर, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याने कधीच स्वत:ला लीड अॅक्टर मानलं नव्हतं. मी सिनेमाचा हिरो नाही आणि कोणताही सिनेमा हिट होण्यामागचं कारण सुद्धा मी नाही, ही भावना ठेऊनच तो इंडस्ट्रीत आला होता. त्यामुळे तो प्रामाणिकपणे त्याचं काम करत राहिला. त्याचा हाच प्रामाणिकपणा लोकांना भावला आणि प्रेक्षकांमध्ये तो लोकप्रिय झाला.''
दरम्यान, राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन लेकीदेखील आहेत. इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतल्यानंतर राजेश खन्ना यांचं कर्करोगाने निधन झालं.