मोबाईल कंपनीने केले ग्राहकाला चक्क १ रुपया ५२ पैसे परत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 15:40 IST2017-05-21T10:10:23+5:302017-05-21T15:40:23+5:30
वोडाफोन कंपनीने व्यवहारात ठेवली पारदर्शकता. ग्राहकाच्या रकमेपेक्षा टपालाचा खर्च जास्त.

मोबाईल कंपनीने केले ग्राहकाला चक्क १ रुपया ५२ पैसे परत !
मोबाईल कंपन्या ग्राहकांची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार अनेकदा होत असते. त्यातून एखादा सुज्ञ ग्राहक कंपनीला ग्राहक मंचात देखील खेचत असतो. मात्र ग्राहकाकडून बिल स्वरुपात भरलेल्या एक रुपया ५२ पैशांची रक्कम स्वतंत्र धनादेश पाठवून कंपनीच्या पारदर्शक कारभाराचा प्रत्यय वोडाफोन या मोबाईल कंपनीने अमळनेर येथील ग्राहकाला दिला.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवारी रवींद्र मोरे यांच्याकडे वोडाफोन कंपनीचे पोस्टपेड सिमकार्ड होते. एप्रिल २०१७ मध्ये रितसर बिलाचा भरणा केला. मात्र बिल भरताना त्यांनी राऊंड फिगर बिल भरले. त्यानंतर त्यांनी सिमकार्ड पोस्टपेडमधून प्रिपेडमध्ये रुपांतरीत केले. बिल भरताना त्यांच्याकडून १ रुपये ५२ पैशांचा जादा भरणा झाला. ही बाब त्यांच्या लक्षात आली नसली तरी हे जास्तीचे पैसे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या कंपनीने त्यांच्या नावे १ रुपये ५२ पैशांचा धनादेश पाठविला आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मोबाईल कंपनीने अगदी छोट्या रक्कमेचा धनादेश पाठवून कामकाजातील पारदर्शकता दाखविली आहे. ग्राहकाला रिफंड देण्यात आलेल्या रकमेपेक्षा कंपनीचा टपालाने पाठविताना जादाचा खर्च झाला आहे हे विशेष.
