आसामचा चमत्कार यंदा कोणाच्या दिशेने?

By Admin | Updated: April 9, 2016 01:23 IST2016-04-09T01:23:56+5:302016-04-09T01:23:56+5:30

ईशान्य भारताचे प्रवेशव्दार असलेल्या आसाम राज्याच्या सत्तेसाठी यंदा प्रचंड अटीतटीची झुंज आहे. सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष एकीकडे तर लोकसभा निवडणुकीत १४ पैकी विक्रमी सात

The wonders of Assam this year? | आसामचा चमत्कार यंदा कोणाच्या दिशेने?

आसामचा चमत्कार यंदा कोणाच्या दिशेने?

सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत) - ईशान्य भारताचे प्रवेशव्दार असलेल्या आसाम राज्याच्या सत्तेसाठी यंदा प्रचंड अटीतटीची झुंज आहे. सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष एकीकडे तर लोकसभा निवडणुकीत १४ पैकी विक्रमी सात जागा जिंकणारी भाजपा दुसरीकडे. काँग्रेसच्या राजसत्तेला प्रथमच भाजपाने इथे मोठे आव्हान उभे केले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाची सारी आशा फक्त आसामवरच केंद्रीत आहे.
लोकसभेच्या यशानंतर येथील विधानसभेच्या एकूण १२६ जागांपैकी ८४ जागा जिंकण्याचे भाजपाचे स्वप्नांकित मिशन आहे. काँग्रेसच्या तरूण गोगोर्इंना आव्हान देण्यासाठी वयाने तरूण असलेले केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार बनवले असून प्रचार मोहिमेत काँग्रेस राजवटीच्या अँटी इन्कम्बन्सीला जोरदार लक्ष्य बनवले आहे. आसामच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजनांच्या घोषणांची खैरात उधळली गेली आहे तर काही योजनांचे धुमधडाक्यात भूमीपूजनही झाले आहे. मेहनतीने उभे केलेले हे सारे चित्र दूर अंतरावरून आकर्षक दिसत असले तरी आसाममधे प्रत्यक्ष हिंडताना भाजपासाठी ही निवडणूक सोपी नाही, हे पदोपदी जाणवते.
ईशान्य भारतातल्या या प्रमुख राज्यात सांस्कृतिक, प्रादेशिक व भाषिक विविधता आहे. उत्तर आसामचे बराक आणि दक्षिण आसामचे ब्रम्हपुत्र खोरे या दोघांची प्रकृती आणि भाषाच नव्हे तर विचार करण्याची पध्दतही भिन्न आहे. मुस्लीम मतदारांचे प्रमाण दोन्ही भागात अर्थातच मोठे (३0 ते ४0 टक्के)
असून यातले बहुतांश लोक बंगाली भाषा बोलतात. भाजपाने नेहमीप्रमाणे यंदाही बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा निवडणूक प्रचारात अधोरेखित केला असला आणि इथे तो भावनिकही असला तरी राज्यात ८४ जागा जिंकण्याची हमी देणारा नक्कीच नाही. त्यामुळे हा मुद्दा किती प्रभावी ठरेल याला मर्यादा आहेत. कट्टर हिंदुत्ववाद्यांनी, दिल्लीत आणि देशाच्या विविध भागात मुस्लीम समुदायाच्या विरोधात विव्देषाची जी बीजे पेरली, त्याचे भावनिक पडसाद आसामच्या मुस्लीम मतदारांवर थेटपणे उमटलेले दिसतात. राज्यात काँग्रेस आणि बदरूद्दिन अजमल यांचा आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययुडीएफ) असे दोन प्रमुख पक्ष मुस्लीम मतदारांना आकर्षित करणारे आहेत. तथापि भाजपा, रा.स्व.संघ आणि कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांच्या आक्रमक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर, आसामच्या बऱ्याच मतदारसंघात बहुतांश मुस्लीम समुदाय यंदा काँग्रेसच्या दिशेने एकतर्फी झुकल्याचे चित्र जाणवते आहे. ब्रम्हपुत्र खोऱ्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अजमल यांच्या एआययुडीएफचे ठळक अस्तित्व कायम आहे.
राज्याच्या विकासाची आश्वासने आणि धार्मिक ध्रुवीकरण अशा दोन्ही थडींवर हात ठेवून, निवडणूक जिंकण्याचे समीकरण भाजपाने बनवले आहे. मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचे हे बूमरँग भाजपावर उलटूही शकते. ध्रुवीकरणाच्या प्रयोगात विकासाच्या आश्वासनांचा प्रभाव मात्र क्षीण झाला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे १२६ पैकी निम्म्या मतदारसंघात भाजपाचे अस्तित्व अतिशय नगण्य आहे. तरूण गोगोर्इंना आव्हान देऊ शकेल असा तुल्यबळ नेता भाजपाकडे नाही. पक्षाची सारी भिस्त काँग्रेसच्या १५ वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीवर आहे. दिल्ली आणि बिहारच्या दारूण पराभवानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दृष्टीने आसामची लढाई प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कोणत्याही स्थितीत आसाम जिंकायचाच, यासाठी भाजपाने आसाम गण परिषद व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)शी निवडणूकपूर्व युती केली आहे. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (बीटीसी)च्या अधीन राज्यातले चार जिल्हे आहेत. त्यावर बीपीएफची पकड आहे. तथापि आसाम गण परिषदेच्या ओसरलेल्या लोकप्रियतेचा कितपत फायदा भाजपाला मिळेल, याविषयी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाच शंका आहे. काँग्रेस व एआययुडीएफमध्ये मुस्लीम मतदारांचे व्यापक विभाजन होईल व त्याचा लाभ आपल्याला मिळेल, या आशेवर भाजपाचे बहुतांश उमेदवार आहेत.
आसाममध्ये काँग्रेसचे उमेदवार अँटी इन्कम्बन्सीचा सामना करीत असले तरी मुख्यमंत्री तरूण गोगोर्इंची लोकप्रियता आजही राज्यात कायम आहे. बोडोलँड विभागातल्या चार जिल्ह्यांसाठी काँग्रेसने युनायटेड पीपल्स पार्टी (युपीपी)बरोबर समझोता केला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारामुळे हिंदु मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ नये, यासाठी अजमल बद्रुद्दिन यांच्या (एआययुडीएफ) बरोबर निवडणूकपूर्व युती करण्याचे गोगोई यांनी जाणीवपूर्वक टाळले. निकालानंतर त्रिशंकू विधानसभेची स्थिती निर्माण झाली तर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. तसे संकेत दोन्ही पक्षाचे नेते देताना दिसतात. ब्रम्हपुत्र नदीच्या उत्तर तटावरील बराक खोऱ्यात पहिल्या टप्प्यात ६५ मतदारसंघांचे मतदान चार एप्रिलला संपन्न झाले. दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला आहे. या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या तीन प्रचारसभा प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. गडकरींच्या भाषणाचा सारा भर आसामचे रस्ते, राज्याच्या विकास योजना व रोजगार निर्मितीवर होता. लोकाना विकासाची स्वप्ने ऐकायला आवडतात. त्यातही केंद्र सरकारमध्ये सर्वाधिक काम करणारा मंत्री अशी ख्याती गडकरींनी मिळवली असल्याने, त्यांच्या सभांना तरूण मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती. काँग्रेसवर हल्ला चढवताना वादग्रस्त विषयांवर बोलणे गडकरींनी कटाक्षाने टाळले. जागोजागी त्यांचे स्वागत मात्र ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनीच होत होते. ओवेसींच्या वादग्रस्त विधानामुळे ही नवी घोषणा भाजपाला जणू आंदण मिळाली आहे. गडकरींखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अमित शाह, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नक्वी, आदींच्या सभा भाजपासाठी झाल्या तर काँग्रेसतर्फे सोनिया गांधी, राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शिद, जयराम रमेश, आनंद शर्मा आदींच्या तोफा भाजपाच्या आक्रमक प्रचाराच्या विरोधात गरजल्या. दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानापूर्वी ६१ मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आसामच्या निवडणूक निकालाबाबत राजकीय विश्लेषक व जनमत चाचण्यांनी परस्पर विरोधी भाकिते वर्तवली आहेत. काहींच्या मते राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवे असल्याने त्याचा मोठा लाभ भाजपाला होईल. तर दुसरीकडे भाजपाच्या अतिउत्साही आक्रमक राजकारणामुळे मुस्लीम मतदारांचा कल यंदा काँग्रेसच्या दिशेने एकतर्फी वळल्याचे मतही व्यक्त होते आहे.
थोडक्यात आसामची लढाई यंदा अत्यंत अटीतटीची आहे. अशा वातावरणात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे. परस्पर विरोधी अंदाजांचा केंद्रबिंदूही तोच आहे. काँग्रेसचे गोगोई अथवा भाजपाचे सोनोवाल यांच्यापैकी कोणीही यंदाची लढाई जिंकली तरी राज्याच्या दृष्टीने तो चमत्कारच ठरणार आहे.

 

Web Title: The wonders of Assam this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.