शेतकरी बैलगाडीतून कविता ऐकायला आले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:09 IST2025-06-22T14:08:25+5:302025-06-22T14:09:33+5:30

प्रकाश होळकर यांचा नाशिकजवळ लासलगाव येथील कांदा शेतकरी म्हणून अनुभव फार वेगळा होता. लासलगाव कांदा व्यापाराचे केंद्र म्हणून देशभर प्रसिद्ध आहे.

When farmers came to listen to poetry in a bullock cart... | शेतकरी बैलगाडीतून कविता ऐकायला आले तेव्हा...

शेतकरी बैलगाडीतून कविता ऐकायला आले तेव्हा...

- रामदास भटकळ
प्रकाश होळकर हे ना. धों. महानोरांप्रमाणे साहित्यकर्मी असले, तरी प्रामुख्याने शेतकरी. फक्त त्या दोघांच्या शेतीच्या अनुभवात बरीच तफावत होती. महानोर यांनी पळसखेड्याला आपल्या कष्टाने, प्रयोगशीलतेने आणि आपल्या कवित्वाने निर्माण केलेल्या जनसंपर्काच्या आधाराने शिवाय भंवरलाल जैन यांच्यासारख्या यशस्वी शेतकी उद्योजकाच्या संगतीने शेती किफायतशीर करण्याचे मार्ग शोधून काढले होते. ते आपल्या कवितेतून ‘हिरव्या बोली’चे गुणगान करू शकले.

प्रकाश होळकर यांचा नाशिकजवळ लासलगाव येथील कांदा शेतकरी म्हणून अनुभव फार वेगळा होता. लासलगाव कांदा व्यापाराचे केंद्र म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. परंतु, त्यांची शेती ही कोरडवाहू असल्याने त्याचे शेतीवर होणारे परिणाम माझ्यासारख्या शहरी माणसाला कळणे कठीण. त्यांचे कवी म्हणून प्रतिबिंब पडले ते मात्र ‘कोरडे नक्षत्र’ या त्यांच्या कविता संग्रहात. 

माझ्या आठवणीप्रमाणे महानोरांनीच आम्हाला प्रकाश होळकर यांचे नाव सुचवले. शेतीचा अनुभव विपरित असला, तरी त्यांच्या काव्यप्रतिभेचा अंदाज महानोरांना जाणवत होता. कविता संग्रह हाती आला तेव्हा लक्षात आले की, होळकरांच्या बहुतेक कविता या पावसाच्या चमत्कारिक वागण्यामुळे होरपळून निघाल्या आहेत. तरी त्यामुळे मिळणाऱ्या अनुभवास शब्दरूप देताना अस्सलपणा जाणवत होता. वाचकांची सहानुभूती मिळवणे हा कवीचा हेतू नव्हता, तर तो काहीसा अप्रिय असला, तरी वेगळा अनुभव शब्दबद्ध करण्याचा होता.

हा वेगळा अनुभव वाचकाला महानोरांच्या उत्साही शेतीइतकाच सहज समजून घेता येऊ शकला, ही होळकरांच्या प्रतिभेची किमया होती. सर स्टॅनली अनविन यांनी ‘द टूथ अबाऊट पब्लिशिंग’ या ग्रंथात पुस्तक प्रकाशित करणे म्हणजे फक्त ते छापून घेणे नव्हे; किंबहुना पुस्तक छापून झाल्यावर प्रकाशनाचे खरे काम सुरू होते. 

पुस्तकांबद्दल वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करणे, रसिक वाचकाला ग्राहकाचे रूप देणे यासाठी अनेक मार्ग असतात. ते पुस्तक प्रकाशकाला का प्रसिद्ध करावेसे वाटले आणि ते वाचकांनी ग्राहक म्हणून का विकत घ्यावे हे उघड करणे हाही प्रकाशनाचा भाग आहे.

पॉप्युलरने ‘कबुतरे’, ‘कमळण’ या पहिल्यावहिल्या पुस्तकांपासून हे जाणीवपूर्वक सांभाळले आहे. इंग्रजीत असा मजकूर किंवा ‘ब्लर्ब’ प्रकाशन संस्थेतील संपादक लिहीत असतो. पॉप्युलरचे सुरुवातीचे ‘ब्लर्ब’ थोर समीक्षकांनी लिहिले असले तरी ते निनावी प्रसिद्ध होत असत. परंतु, काही विशेष कारण असल्यास त्या समीक्षकांच्या नावालाही महत्त्व असायचे. 

शेतीबद्दल महानोरांसारख्या कवीने निर्माण केलेले आकर्षण बाजूला ठेवून हे दुसरे तापदायक रूपही त्यांना पाहता यावे म्हणून प्रभा गणोरकर यांना मलपृष्ठावरील मजकूर सहीसकट लिहायची विनंती केली.

वाचकवर्गाची अभिरुची तयार करण्याचा दुसरा एक मार्ग अनेक प्रकाशक चोखाळतात. ते म्हणजे पुस्तकासाठी प्रकाशन समारंभ करून. एक काळ असा होता की, अनेक साहित्यसंस्था प्रकाशकांसोबत असे सांस्कृतिक महत्त्वाचे कार्यक्रम उत्साहाने करत असत. 

मुंबईत किंवा कुठेही कार्यक्रम झाला तरी वर्तमानपत्रांतून त्याचा अहवाल विस्तृत आणि उत्साहवर्धक येत असे. परंतु, हळूहळू ही परिस्थिती बदलली. साहित्यसंस्थाही असे कार्यक्रम हे द्रव्यार्जनाचे साधन म्हणून वापरू लागल्या आणि वर्तमानपत्रे शक्यतो जागा ही जाहिरातीसाठी राखीव ठेवू लागले.

प्रकाश होळकरांसारख्या खेड्यातून आलेल्या कवीच्या ह्या कविता संग्रहाबद्दल समारंभामार्फत प्रसिद्धी हवीच होती. स्वतः कवी त्यांचे श्रद्धास्थान कविवर्य कुसुमाग्रजांकडे नाशिकला गेले. पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. कविवर्यांनी त्यांना कार्यक्रम मुंबईसारख्या मोठ्या शहरात करावा, असा सल्ला दिला.

मी प्रकाशना मुंबईची परिस्थिती सांगितली. मुंबईतील रहदारी, कार्यबाहुल्यात अडकलेले रसिक, एकाचवेळी अनेक ठिकाणी होणारे कार्यक्रम यामुळे कार्यक्रमाला जेमतेम तीस ते पस्तीस लोक येतील आणि तेही त्यांना मी मुद्दाम फोन केला तर. 

कवीने अखेर लासलगावला कार्यक्रम ठरवला. प्रकाश यांच्याबद्दलचा प्रेमादर लक्षात घेऊन कार्यक्रमासाठी निरनिराळ्या गावांतून पन्नास कवी गोळा झाले आणि त्यांचे अभूतपूर्व कविसंमेलन या गावात प्रथमच गाजले. सयाजी शिंदे या थोर नाट्यकर्मी मित्राने ‘कोरडे नक्षत्र’मधील कवितेला नाट्यरूप देऊन स्वखर्चाने एक प्रयोग केला आणि आजूबाजूच्या शेतकरी मित्रांनी बैलगाडीवरून येऊन गर्दी केली. कार्यक्रमाला गेला बाजार तीन हजार मंडळी हजर होती.

Web Title: When farmers came to listen to poetry in a bullock cart...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.