आराध्या केव्हा?
By Admin | Updated: February 2, 2015 00:49 IST2015-02-02T00:49:23+5:302015-02-02T00:49:23+5:30
संपूर्ण राष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे पद्म पुरस्कार हा कोणे एकेकाळी मोठा गौरवाचा भाग मानला जात होता,

आराध्या केव्हा?
संपूर्ण राष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे पद्म पुरस्कार हा कोणे एकेकाळी मोठा गौरवाचा भाग मानला जात होता, असे म्हणतात. त्यात नंतर काही हिरमुसल्यांनी न्यायालयीन झगड्याला आमंत्रित केले आणि एके वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वाटपच न्यायालयाने रोखून धरले. परिणामी एका ज्येष्ठ मराठी संपादकाला जाहीर झालेला ‘पद्मभूषण’ जो अडकून पडला, तो कायमचाच. दरम्यान, पुरस्कार ‘वाटपात’ घुसखोरी आणि वशिलेबाजी होत असल्याचे आरोप सुरू झाले. पुढे पुरस्कार तुला की मला, असा अत्यंत ‘खिलाडू वृत्तीचा’ सामना खेळला जाऊ लागला. अधूनमधून जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचे प्रकार होऊ लागले. स्वीकारलेले पुरस्कार परत करण्याची भाषा सुरू झाली. सरकारच्या मनीध्यानी ज्यांची नावे नाहीत, त्यांनी केवळ चॅनेलीय बातम्यांच्या आधारे, आपल्याला पुरस्कार मिळणार असे गृहीत धरून, देऊ (न) केलेले पुरस्कार सविनय परत करण्याची भाषा सुरू केली. दोघांच्या भांडणात कुणालाच पुरस्कार नाही, हेही मग घडून येऊ लागले. शिष्याला अगोदर आणि मला नंतर काय, असा रोकडा सवाल उपस्थित करून गुरूकरवी पुरस्कार ठोकरून देण्याचे प्रकारही घडून आले. पण त्याचवेळी एका बच्चन कुटुंबात एक-दोन नव्हे, तर चक्क सात पद्म पुरस्कार गेल्याची गौरव गाथा गायिली जाऊ लागली. या कुटुंबातील आता केवळ आराध्या तेव्हढी पद्म-वंचित राहिली. न जाणो पुढच्या वर्षी ती कसरही भरून निघेल. त्याबद्दल आनंदच राहील. पण इतके पुरस्कार मिळूनदेखील आराध्याची आजी, जयाबाई बच्चन यांनी त्यांचे भ्रतार अमिताभ यांना ‘भारतरत्न’ दिले गेले नाही, म्हणून शिर्डीच्या साईबाबांना साक्षी ठेवून खंतवजा फणकारा व्यक्त करावा आणि ‘माझे ते भारतरत्नच आहेत’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करावी, यावरून पद्म पुरस्कारांचा प्रवास किती रमणीय आहे याची कल्पना करता येते. पद्म पुरस्कारांच्या बाबतीतही प्राथमिक शाळेसारखे काही नियम असावेत असे अलीकडेच निदर्शनास आले. म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी, केजी (वन अॅण्ड टू) आणि मग पहिली!आधी पद्मश्री व त्यानंतर बाकीचे. अमिताभ यांना आत्ताशी कुठे पद्मविभूषण जाहीर झाला. भारतरत्नची पाळी त्यानंतरची. तो मिळेलच की जातो कुठे? पण सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाल्यापासून भारतरत्नाची वयोमर्यादा अंमळ कमी केली असावी, या समजुतीतूनच बहुधा जयाबेन कासावीस झाल्या असाव्यात.