असे चर्चेकरी आणि अतिरेकी यात फरक काय
By Admin | Updated: May 24, 2014 18:16 IST2014-05-24T18:16:18+5:302014-05-24T18:16:18+5:30
क्या हिन्दुस्थान की १.२३ बिलीयन्सवाली आबादी को एक नरेन्द्र मोदी ही मिला चुनने के लिये?’ ‘हिन्दुस्थान मे रहनेवाले मुसलमानों की हमे बडी चिंता लगी रहती है’

असे चर्चेकरी आणि अतिरेकी यात फरक काय
- हेमंत कुलकर्णी
क्या हिन्दुस्थान की १.२३ बिलीयन्सवाली आबादी को एक नरेन्द्र मोदी ही मिला चुनने के लिये?’
‘हिन्दुस्थान मे रहनेवाले मुसलमानों की हमे बडी चिंता लगी रहती है’
‘हिन्दुस्थान यह कतई ना भूले की, हमारे पास न्यूक्लिअर बंब है’
केंद्रात भाजपाप्रणित रालोआचे सरकार स्थापन होण्याचे नक्की झाल्यापासून खासगी चित्रवाहिन्यांवर रोज ज्या चर्चा झडत आहेत, त्या चर्चेच्या दरम्यान पाकिस्तानातील लोकांनी तिथून बोलताना तोडलेले हे काही तारे!
देशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उथळपणावर आजपावेतो बरेच बोलून आणि लिहून झाले आहे. त्यात आता भर टाकायची गरज नाही. पण, तरीही त्यांचा एकूणच जनमानसावर पडणारा प्रभाव दुर्लक्षिता येत नाही, हेही खरे. त्यामुळेच त्यांनी चर्चेसाठी एखादा विषय घेताना आणि त्यातील संभाव्य सहभाग्यांची निवड करताना, काही भान बाळगणे किती गरजेचे आहे, हेच सध्या पाकसंबंधातील होणार्या चर्चांवरून दिसून येते आहे.
चर्चेत पाकच्या बाजूने बोलायला म्हणून जो कोणी आमंत्रित केला जातो, तो कुणी पीरजादा नावाचा ‘रक्षा वैग्यानिक’ अथवा ब्रिगेडिअर अस्लम वा कर्नल इस्फाक नावाचा ‘सामरिकतज्ज्ञ’ असल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे कोण जाणे! पण, मुळात त्यांना बोलावलेच कशासाठी जाते, हाच एक मोठा प्रश्न आहे. भारतातील एखाद्या पिटुकल्या सोनुशीकोनुशीचा सरपंच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर किंवा भाजपाचा एखादा छटाक कार्यकर्ता पक्षाच्या रणनीतीवर थेट मतप्रदर्शन करू शकतो वा प्रच्छन्न टीकाही करू शकतो. तशी मोकळीक मुळात पाकिस्तानात नाही, हे सारे जग जाणते. अशा परिस्थितीत हे असले उपटसुंभ चर्चेसाठी बोलावले जातातच कशासाठी?
सार्कचे एक सदस्य राष्ट्र म्हणून पाकिस्तानच्या शासनप्रमुखांना मोदी यांच्या शपथविधीसाठी हजर राहण्याचे निमंत्रण धाडले गेल्यानंतर, त्यावरील चर्चेत पाकच्या बाजूने जे कोणी बोलायला बोलावले गेले होते, त्यांच्या देहबोलीपासून वक्तव्यांपर्यंत सारे काही भारताची टवाळी करणारे होते.
जे राष्ट्र मुळात लोकशाहीची फारशी बूज राखत नाही, काही काळ ज्याला आपल्या गळ्यातला ताईत बनविले, त्या झुल्फीकार अली भुट्टो यांना फासावर लटकवायला मागे-पुढे पाहत नाही आणि त्यानंतरच्या काळात ताईत बनविलेल्या परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोही ठरवून भुट्टोंच्याच मार्गावर पाठविण्याची कोशीश जारी ठेवते, त्या राष्ट्रातील कोणीही थेट भारतातल्या खासगी दूरचित्रवाणीवर येऊन काय बोलू शकेल वा बोलेल, याचा अंदाज बांधण्याचीही गरज नाही. पण, तरीही त्यांना बोलावले जाऊन त्यांचे वाह्यात बरळणे भारतातील दर्शकांच्या कानावर ओतले जाते.
अर्थात, यात येथील स्टुडिओत बसून चर्चेचे संचलन करणार्या (अँकर्स) लोकांचीही जबाबदारी मोठी असते. मागील सप्ताहात अशाच एका चर्चेच्या वेळी संबंधित संचालक, नितीन गडकरी यांना एकच प्रश्न वारंवार विचारीत होता, की पाकिस्तानने पुन्हा भारताची खोडी काढलीच, तर तुमची भूमिका काय असणार? गडकरींनीही लगेच जणू आपण एखाद्या सायंशाखेत बोलत असल्याच्या थाटात आणि मनमोहनसिंग सरकारवर दुगाण्या झाडत अणुबॉम्ब वगैरे बोलायला सुरुवात केली. मग तिकडच्यानेही त्यांचा अणुबॉम्ब दाखवला.
नेमकी येथे प्रमोद महाजन यांची आठवण होते. ते मंत्री असताना, त्यांनाही बीबीसीच्या एका चर्चेत संचालकाने असेच अडचणीत आणणारे वा उचकवून देणारे प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा महाजन ताडकन बोलले, कोणत्याही राष्ट्राची संरक्षण सज्जता, लष्करी तयारी आणि परराष्ट्र धोरणविषयक बाबी हा काय टेलिव्हिजनच्या स्टुडिओत बसून चर्चा करायचा विषय असतो काय? आणि कोणतेही सरकार असा वाचाळपणा करीत असते काय?
पाकिस्तानात कोणीही स्वतंत्र नाही, ही बाब सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट आहे. पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीलादेखील शेजारी राष्ट्राकडून आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करावा की नाही, हे स्वत:चे स्वत: ठरविता येत नाही. त्यासाठी लष्कर, आयएसआय (पाकी गुप्तहेर संघटना), स्वत:चा पक्ष, इतर पक्ष आणि प्रशासन अशा सार्यांकडे आशेने बघावे लागते. त्यामुळेच तेथील एखाद्या कथित संरक्षणविषयक सल्लागाराला व्यक्तिगतरीत्या भारताची एखादी बाजू (चुकून का होईना) पटत असली, तरी ती मनमोकळेपणे स्वीकारण्याची मुभा, मोकळीक आणि स्वातंत्र्य मुळातच नाही. मग असला काथ्याकूट काय कामाचा?
पण, या काथ्याकुटात एक धोका नक्कीच संभवतो. भाजपाला यंदाच्या निवडणुकीत जे घसघशीत मतदान झाले, ते लक्षात घेता,
मुस्लिम मतदारांनीही भाजपाला मत देण्याबाबत आढेवेढे घेतलेले नाहीत, हे उघड होते. उत्तर प्रदेशातील मुसलमानांचे स्वयंघोषित एकमात्र
नेते आझमखान यांनीही याची कबुली दिली आहे. मोदी सेक्युलर झाले म्हणून नव्हे, तर मुसलमान सेक्युलर आहेत म्हणून त्यांनी मोदींच्या पक्षाला मतदान केले, असा आझममियाँचा निष्कर्ष आहे. त्यालाही काही हरकत नाही. ‘महंमद पर्वताकडे गेला काय किंवा पर्वत महंमदाकडे आला काय, एकूण एकच.’ परंतु, खासगी चित्रवाहिन्यांवर झडणार्या अशा निर्थक आणि अनुत्पादक चर्चांच्या दरम्यान पाकिस्तानातील तथाकथित तज्ज्ञ जेव्हा भारतातील मुसलमानांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करून गळे काढतात, तेव्हा येथील मुसलमानांचा हमखास बुद्धिभेद होऊ शकतो आणि अंतत: तो गंभीर वळणही घेऊ शकतो.
भारतावर आजपर्यंत जे जे म्हणून अतिरेकी हल्ले झाले, त्या हल्ल्यांमागील हेतू इथल्या बहुसंख्याकांमध्ये आणि अल्पसंख्याकांमध्ये दुही पसरवून व त्यांच्यात संशयाचे बीज पेरून जातीय दंगे सुरू होण्यास पोषक वातावरण तयार करणे आणि भारतात अशांतता पसरविणे हाच असल्याचे पुन:पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच असे हल्ले करणारे अतिरेकी आणि वाह्यात चर्चा करणारे चर्चेकरी यांच्यात मग काही फरकच उरत नाही.
(लेखक नाशिक लोकमतचे संपादक आहेत)