नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

By Admin | Updated: July 3, 2014 08:58 IST2014-07-03T08:58:32+5:302014-07-03T08:58:32+5:30

सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत.

The way to celebrate while remembering the name | नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

अध्यात्म

मोहनबुवा रामदासी


सदा रामनामें वदा पूर्ण कामे।
कदा बाधिजेना पदा नित्यनेमे।
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।


श्लोकार्थ- सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून अहंकाराने आलेला आळस सोडून देऊन अशा त्या प्रभू रामचंद्रांचे रोज सुप्रभाती चिंतन करावे.
समर्थ म्हणतात, उत्कट वासनेने आणि तीव्र इच्छेने रामनामाचा सतत घोष ठेवावा. म्हणजे या घोषाने कोणतीही आपत्ती किंवा संकट बाधक होणार नाही. बाधिजेना हा शब्द मार्मिक आहे. श्रीराम हा भक्तकैवारी आहे. ‘‘आपदामपहर्तारं दाता सर्व संपदाम’’ असा तो आहे. समर्थ म्हणतात, ‘‘नामे संकटे नासती।नामे विघ्ने निवारती।नामस्मरणे पाविजेती।उत्तम पदो।’’ एवढेच काय, पण ‘‘काहीच न करून प्राणी। रामनाम जपे वाणी। तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तालांगी सांभाळी।।’’ पण समजा काही आपत्ती प्रारब्धामुळे सहन कराव्या लागल्या, तरी त्याही बाधक होणार नाहीत. कारण नामामुळे देवाबद्दलची इतकी दृढ निष्ठा उत्पन्न होते, की आपण संकटे सोसावे अशीच रामाची इच्छा आहे, असा मनात भाव उत्पन्न होतो. ‘‘देवाचे जे मनोगत। तेचि आपुले उचित। इच्छेसाठी भगवंत। अंतरू नये।।’’ संकटनिवारण झाले तरी किंवा नाही झाले, तरी त्याची फिकीर वाटत नाही; पण इतकी बेफिकीर वृत्ती होण्यासाठी एक पथ्य सांभाळावे लागते. ते पथ्य म्हणजे नित्यनेमाने नाम घेणे. ‘‘नित्य नेमे अंतर्शुद्ध। नित्य नेमे वाढे बोध। नित्य नेमे बहुखेद। प्रपंची तुटे।।’’ नेमाने भजन केल्यामुळे प्रथम चित्ताची शुद्धी होते. नंतर रूपाचे ज्ञान होते. ज्ञानाने तेच आपले रूप आहे, हे समजते आणि शरीर म्हणजे आपण नव्हे असे समजल्याने प्रापंचिक आघातांची पर्वा वाटत नाही. नित्यनेमाने पथ्यपालनात दोन मोठी विघ्ने येतात. एक मद म्हणजे ताठा किंवा गर्व, दुसरे आळस. मनुष्य संपत्तीने, रूपामुळे, गुणामुळे, ज्ञानामुळे गर्विष्ठ होतो. या अहंतागुणे ‘‘थोर आयुष्य मोलाचे।मदे व्यर्थचि नासिले।’’ असे होते. आपला अहंकार देवाच्या सत्तेवर चालत असून रूप, गुण, ऐश्वर्य व ज्ञान सर्वच बाबतींत तोच श्रेष्ठ, आपले भजनही त्याच्याच कृपेमुळे असा नम्र भाव ठेवून त्याला स्मरावे. मदाप्रमाणेच आळस सोडावा. अंगात शक्ती असूनही प्रतिकाराची वृत्ती उत्पन्न न होणे म्हणजे आळस.
 

Web Title: The way to celebrate while remembering the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.