शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मिकीचा वाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:28 IST

या जिल्ह्यात दुसरा वाल्मीक कराड तयार होणार नाही, याची जबाबदारी स्थानिक राजकारणी आणि पर्यायाने सरकारने घ्यायची आहे.

ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहिल्यानंतर गँगवॉरवर आधारित मारधाड चित्रपट अथवा वेबसिरीजदेखील फिके वाटू लागतील. एका सरपंचाच्या निर्घृण हत्येच्या निमित्ताने समोर आलेल्या प्रकरणातील अर्थकारण, राजकारण आणि जातीय कंगोरे लक्षात घेता अलीकडच्या काळात ग्रामीण भागात निर्माण झालेल्या या नवमाफियांनी किती धुडगूस घातला आहे, याचा अंदाज येईल. अवैध वाळू, गुटखा, दारू आणि आता पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या सौदेबाजीतून नवे गँगवॉर सुरू झाले आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे याच गँगवॉरचे बळी आहेत. देशमुख यांची हत्या एक भयावह घटना तर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील विकासाच्या मार्गातील गुंडांचा हस्तक्षेप आणि त्याला मिळणारा राजकीय वरदहस्त तितकाच चिंताजनक आहे. राष्ट्रीय अथवा राज्य महामार्गाची घोषणा होताच त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मातीमोल किमतीत बळकावून कोट्यवधी रुपयांची माया कोणीकोणी कमावली, याची चौकशी केली तर अनेकांचा भांडाफोड होईल. बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अनुकूल वातावरण असल्याने मागील तीन-चार वर्षांपासून नामांकित अशा रिन्युएबल एनर्जी, विंडमिल आणि सोलार पॉवर कंपन्या करोडो रुपयांची गुंतवणूक करून मोठमोठे प्रकल्प सुरू करीत आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून आपल्या परिसरात सुबत्ता येईल, नोकऱ्या निर्माण होतील म्हणून या भागातील शेतकरी आपल्या जमिनी देत आहेत. मात्र राजकीय हस्तक्षेप, खंडणी बहाद्दर आणि गुंड प्रवृत्तीच्या मंडळींनी या कंपन्यांना सळो की पळो करून सोडले आहे. काही समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकऱ्यांना फितवून या कंपन्यांविरोधात उभे केले आहे. कोट्यवधी रुपये गुंतविलेले प्रकल्प बंद पडू नयेत म्हणून काही कंपन्यांनी सुरुवातीला अशा उपद्रवी मंडळींच्या काही मागण्या पूर्ण केल्या; परंतु तिथूनच ते सोकावत गेले. या खंडणीबहाद्दरांचा उपद्रव इतका टोकाला गेला की, रिन्यू पॉवरसारख्या कंपनीने आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या राज्यात प्रकल्प उभे केले. 

गुंतवणुकीसाठी राज्या-राज्यांमध्ये चढाओढ लागलेली असताना आलेले प्रकल्प परत जाणे, ही महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब आहे. सरकारने याच्या खोलात जाऊन चाैकशी केली पाहिजे. सध्या चर्चेत असलेल्या वाल्मीक कराड याच्यावर अशाच एका पवनऊर्जा कंपनीने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सरपंच देशमुख यांची हत्या आणि खंडणीचा गुन्हा याचे धागेदोरे एकच आहेत. या कराडवर यापूर्वीदेखील अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई झाली नाही. राजकीय नेत्यांना अपेक्षित असलेल्या सर्व प्रकारच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये हा वाल्मीक पारंगत आहे. त्यामुळे त्याच्या केसालादेखील धक्का लावण्याची कोणामध्ये हिंमत नाही. 

वाल्याचा वाल्मिकी झाल्याची कथा आपण पुराणात वाचली असेल; परंतु या वाल्मीक कराड नावाच्या इसमाचा प्रवास नेमका  उलट आहे. परळी आणि परिसरात याची प्रचंड दहशत आहे. परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कोट्यवधी रुपयांच्या राखेची कोण फुकटात विल्हेवाट लावत आहे, परळी ते अंबाजोगाई रस्त्याचा एक कंत्राटदार का पळून गेला, याची  चौकशी होणे गरजेचे आहे. बीड हा तसा सांप्रदायिक परंपरा पाळणारा जिल्हा. या जिल्ह्यातील बहुसंख्य लोक सोशीक, सात्त्विक आणि सांप्रदायिक आहेत. याचाच गैरफायदा वाल्मीकसारख्या गावगुंडांनी घेतला. 

आजवर स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब परांजपे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या विविध पक्षांच्या, विचारधारेच्या आणि जातीच्या नेत्यांनी या जिल्ह्याचे नेतृत्व केले. मात्र, अलीकडच्या काळात इथले राजकारण जातीय वळणावर गेल्याने त्याचे दुष्परिणाम अगदी गाव पातळीवरदेखील जाणवू लागले आहे. एकीकडे गावगुंड, खंडणीखोर, समाजकंटकांचा उपद्रव आणि दुसरीकडे जातीयवादातून उसवली गेलेली गावकीची वीण अशा दुष्टचक्रात हा जिल्हा सापडला आहे. लग्नाळू तरुणांना जोडीदार मिळणे मुश्कील झाले आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पाळेमुळे खणून यातील दोषींना कडक शिक्षा झाली तरच इथले समाजजीवन पूर्वपदावर येईल. अन्यथा, आणखी किती जणांचे बळी जातील, याच नेम नाही. या जिल्ह्यात दुसरा वाल्मीक कराड तयार होणार नाही, याची जबाबदारी स्थानिक राजकारणी आणि पर्यायाने सरकारने घ्यायची आहे. ग्रामीण भागात येऊ घातलेल्या गुंतवणुकीला संरक्षण देण्याचीदेखील काळजी घ्यावी लागेल. अन्यथा यापुढे कोणीच इथे प्रकल्प आणण्याचे धाडस करणार नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीsarpanchसरपंचDeathमृत्यू