विशेष लेखः खजिन्यातला पैसा लेकराबाळांच्या दुधासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 08:32 IST2025-05-31T08:30:08+5:302025-05-31T08:32:02+5:30

जनतेशी बांधिलकी हे राजकारण्यांनी आपले सर्वोच्च ध्येय मानायला हवे. अहिल्यादेवी होळकरांची स्मृती अखंड, अभंग राखण्याचा तोच खरा मार्ग आहे !

Vinaya Khadpekar on importance of Ahilyadevi Holkar as a stateswoman at that time her contributions and policies | विशेष लेखः खजिन्यातला पैसा लेकराबाळांच्या दुधासाठी

विशेष लेखः खजिन्यातला पैसा लेकराबाळांच्या दुधासाठी

विनया खडपेकर 

'ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर' या चरित्राच्या लेखिका

राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे त्या काळातील महत्त्व, त्यांचे योगदान आणि ध्येयधोरणे यांची वैशिष्ट्ये काय सांगाल?

१८व्या शतकात तेव्हाच्या बुंदेलखंडात मोगल, मराठे, जाट आणि राजपूत, अशी अनेक लहान-मोठी राज्ये होती. लहान राज्ये मोठ्या राज्यांची मांडलिक असत. मराठे बलाढ्य राज्यकर्ते होते. साध्या कर वसुलीसारख्या नियमित कामकाजातही मराठ्यांमध्ये आपापसात लढाया होत. जीव जात. अशा काळात अहिल्यादेवी होळकरांचे राज्य मात्र तिथल्या शांतता सुव्यवस्थेसाठी आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते.

लढायांचे प्रमाण अत्यल्प. शेती, वस्त्रोद्योग आणि इतर बारा बलुतेदारांचे उद्योग व्यवसाय भरभराटीला आलेले. जनता सुखी समाधानी होती. अहिल्यादेवींचा आर्थिक व्यवहार आणि कारभार अत्यंत चोख होता. उदाहरण द्यायचे, तर गया येथे एका मंदिराची उभारणी करायचे काम सुरू होते. तर, मूर्तीचे सर्व बाजूंनी नकाशे मागवून घेणे, त्या मूर्तीच्या वाहतुकीसाठी छकड्यांच्या गाडीची व्यवस्था करणे हे तर आलेच, पण छकड्यांच्या चारापाण्याची तजवीज कोणी, कुठे, कशी करायची याबाबतची व्यवस्थाही त्यांनी लावलेली असे.

उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून मोलाची भूमिका अहिल्यादेवींनी त्या काळात पार पाडली. कारणपरत्वे प्रवास करणारे लोक खूप होते, व्यापारी, तीर्थयात्री, प्रवासी... त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी अन्नछत्रे, मंदिरे, विश्रांतिस्थाने उभारली. देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसे अहिल्यादेवींकडे मदत मागायला येत. कोणी देवळात अन्नछत्र उभे करण्यासाठी, तर कोणी विहीर बांधण्यासाठी मदत हवी म्हणत. अशावेळी अहिल्यादेवी त्या व्यक्तीच्या खरेपणाची शहानिशा करून, चार दिवस आपल्या आश्रयास ठेवून पुरेशी खात्री वाटली की, मग त्यांना मदत करत.

सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यकारभाराचे चोख धडे गिरवले आणि त्या उत्कृष्ट राज्यकर्त्या म्हणून तयार झाल्या! एखादा मोठा सरदार असो की, सर्वसामान्य गरीब माणूस, सर्वांना अहिल्यादेवींच्या दरबारात सारखाच न्याय होता !

त्या काळात स्त्री राज्यकर्ती असणे हे आव्हान त्यांनी नेमके कसे पेलले? 

त्या काळात किमान मराठेशाहीत तरी स्त्री राज्यकर्ती असणे किंवा राज्यकारभारात स्त्रीचा सहभाग असणे हे फारसे दुर्मीळ नव्हते. संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई, घोड्यावर बसून तलवार चालवत.

राज्याचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांच्या पत्नी ताराबाई यांचे नेतृत्व सर्वमान्य होते. राधाबाई, आनंदीबाई या पेशवाईतल्या कणखर स्त्रिया. चिमाजी आप्पा आणि बाजीराव पेशवे हे राज्यकारभारात वेळप्रसंगी आपल्या आईचा सल्ला घेत. राधाबाई तीर्थयात्रेच्या नावाखाली देशभर भ्रमंती करतात आणि आमचे राजकारण समजून घेतात, असा रोष त्यांच्यावर होताच.

हे सगळे मल्हारराव होळकरांच्या नजरेसमोर असल्यामुळेच आपली सून राज्यकर्ती म्हणून योग्य असल्याचे त्यांनी हेरले असावे.

महादजी शिंदे, तुकोजी होळकर हे अहिल्यादेवींकडे लढायांसाठी पैसे मागत. त्यावेळी 'लढाई करून तुम्ही लूट आणा आणि त्यातूनच लढाईसाठी पैसा उभा करा, आमचे सासरेही असेच करत असत,' अशी भूमिका अहिल्यादेवी घेत. 'होळकरांच्या खजिन्यातील पैसा हा जनकल्याणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लेकराबाळांच्या दूध-पाण्यासाठी आहे' असे त्या म्हणत. त्यावरून त्यांच्यावर टीकाही होई. मराठेशाहीच्या राजकारणातील इतर स्त्रियांना पती किंवा पुत्राच्या गादीसाठी वेळप्रसंगी वाईटपणाही पत्करावा लागला. अहिल्यादेवींना मात्र त्यांच्या सासऱ्यांनी हाताला धरून राजकारणात आणले. आपल्या कर्तबगार सासऱ्यांचा त्या उजवा हात होत्या. 'विश्वस्त' या भूमिकेमुळे त्या इतर स्त्री-पुरुष राज्यकर्त्यांमध्ये वेगळ्या उठून दिसतात. आपल्या जनकल्याणाच्या शपथेपासून त्या कधीही ढळल्या नाहीत.

प्राप्त परिस्थितीत उपयोगाचे ठरतील असे कोणते धडे अहिल्यादेवींच्या जीवनप्रवासातून मिळतात? 

अठराव्या शतकाचा शेवट आणि आताची परिस्थिती यात मला पुष्कळ साम्य दिसते. मराठ्यांचा धाक होता, पण आपापसात सतत तेढ, फंदफितूरी चालू असे. आताही हेवेदावे प्रचंड आहेत, पण तरी महाराष्ट्र हे देशातले एक प्रमुख आणि प्रगत राज्य आहे. अहिल्यादेवी होळकरांनी पेशव्यांच्या गादीचा कायम मान राखला, पण तो राखताना त्या आपला स्वतःचा आबमान राखणे विसरल्या नाहीत. राज्यकर्ता म्हणून जनकल्याणाचा विचार त्यांनी कधीही नजरेआड होऊ दिला नाही. हे सगळेच आजच्या राजकीय नेत्यांनी अहिल्यादेवींकडून शिकायला, समजून घ्यायला हवे. आपण अण्वस्त्रसज्ज आहोत, गरज पडलीच तर युद्धासाठी आपण तत्पर असायलाच हवे, मात्र आपले प्राधान्य नेहमी जनतेच्या हिताच्या कामाला असायला हवे आणि जनतेशी बांधिलकी हे राजकारण्यांनी आपले सर्वोच्च ध्येय मानायला हवे. अहिल्यादेवींना खरी आदरांजली तीच असेल 

- मुलाखत : भक्ती विसुरे
 

Web Title: Vinaya Khadpekar on importance of Ahilyadevi Holkar as a stateswoman at that time her contributions and policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.