दृष्टिकोन- महाराजा सयाजीराव गायकवाड : एक चौमुखी दातृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:38 AM2020-03-11T04:38:43+5:302020-03-11T04:38:55+5:30

धारा भांड मालुंजकर । साहित्यिका नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणा गावातील गोपाळ काशिराव गायकवाड एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. बडोद्याच्या राजघराण्यात ...

Viewpoint- Maharaja Sayajirao Gaikwad: A wide-ranging donor | दृष्टिकोन- महाराजा सयाजीराव गायकवाड : एक चौमुखी दातृत्व

दृष्टिकोन- महाराजा सयाजीराव गायकवाड : एक चौमुखी दातृत्व

googlenewsNext

धारा भांड मालुंजकर । साहित्यिका

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणा गावातील गोपाळ काशिराव गायकवाड एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक घेतला जातो. अक्षर ओळख नसलेला कवळाण्याचा बारा वर्षांचा गोपाळ दैवयोगाने बडोद्याचा राजा बनतो. गोपाळचा दत्तकविधी होऊन ‘सयाजीराव तिसरे’ असे नामकरण होते. आपल्या अथांग महान कार्यांनी, दूरदृष्टीने महाराजा सयाजीराव गायकवाडांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

११ मार्च, १८६३ हा महाराजांचा जन्मदिवस. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र गुण्यागोविंदाने नांदणे ही गोष्ट महाराजा सयाजीराव गायकवाड या विद्याव्यासंगी राजांच्या बाबतीत घडली. वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. शिक्षणामुळे परकाया प्रवेश होतो याचा अनुभव घेत, शिक्षणाचे महत्त्व जाणत महाराज मोठे झाले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना खूप लहान वयातच कळून चुकले होते. याच तळमळीतून महाराजांनी बडोदा संस्थानात केलेल्या सुधारणांमुळे संस्थान नावारूपास आले. या सुधारणांबरोबर संस्थानाबाहेरच्याही लोकांच्या उत्कर्षासाठी प्रचंड आर्थिक मदत केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजांचे योगदान अद्वैत आहे.

सयाजीराव प्रज्ञावंत, विचारवंत आणि सुशासक होते. दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद शिकागो, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संमेलनांचे ते अध्यक्ष होते. शिकागो अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ‘धर्म हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. ते निर्दोष आणि सत्यमय असावे.’ ईश्वराची नेमकी व्याख्या काय करावी, परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान काय, याविषयी शिकागो धर्म परिषदेतील त्यांचे चिंतन आजची गरज आहे. धर्मसंस्था व राजसत्ता यातील भेदरेषा ओळखून सयाजीरावांनी विवेकाने बडोद्यात धर्मखाते सुरू केले. यातून धर्ममूल्ये व नागरी मूल्यांची सांगड घातली.

ज्ञानासारखे पवित्र शक्तिमान दुसरे काही नाही. राजाचा मोक्ष जनकल्याणात असतो, तसेच धर्माने गरिबांचा कैवारी बनावे. हेच परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान आहे. हे सयाजीरावांचे धर्मविचार. त्यांना उत्तम माणसांची पारख होती. यामुळे देशभरातील उत्तम
प्रशासक, शिक्षण तज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, गायक, नाटककार, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारक बडोद्यात जमा झाले होते. यातून बालगंधर्व, चिंतामणराव वैद्य, कांटावाला, पितामह दादाभाई नैरोजी, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, कवी चंद्रशेखर यांना वर्षासन अर्थात पेन्शन स्वरूपात मदत करण्याचे कामही सयाजीरावांनी दूरदृष्टी ठेवून केले.

महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लाला लजपतराय, श्यामजी कृष्ण वर्मा, जमशेटजी टाटा, राजा रवि वर्मा, कर्मवीर भाऊराव, अब्दुल करीम खाँ, पं. मालवीय, न्यायमूर्ती रानडे, पंडित शिवकर तळपदे, योगी अरविंद घोष, बॅ. केशवराव देशपांडे, खासेराव जाधव, शिल्पकार कोल्हटकर या व अनेक युगपुरुष आणि क्रांतिकारकांना मदत करणाºया सयाजीरावांचा हा वैचारिक अनमोल वारसा आजच्या वातावरणात सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारा आहे.
शिक्षण ही काळाची गरज ओळखून महाराजांनी बडोद्यात राज्यकारभाराच्या पूर्वकाळातच बडोदा संस्थानातील सर्वात दुर्लक्षित आणि शिक्षणापासून कोसो दूर असणाºया समाजातील घटकांना मोफत शिक्षणाची सोय केली. ज्या काळात सरकारी खर्चाने शिक्षण देण्याची हिंदुस्थानात नव्हे, तर जगात सोय नव्हती, त्या काळात महाराजांनी सोनगड भागातील अस्पृश्य आणि आदिवासींच्या मुलांसाठी सर्वप्रथम मोफत शिक्षणाची सोय केली. त्यानंतर, त्यांनी इ.स. १८९२ साली अमरेली प्रांतात सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुरू केले, तर पूर्ण संस्थानात त्यांनी इ.स.१९0६ला सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

महाराज फक्त आर्थिक मदत करत नव्हते, तर स्वत: प्रगल्भ विचारांचे, दूरदृष्टी असणारे असल्याने संभाव्य धोक्याची आणि समस्यांची त्यांना कल्पना येत असे. त्यावर समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींना तर मदत केलीच, त्याचबरोबर जे नातेवाईक परदेशात शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी पाठवले होते, त्यांनाही पत्रांतून वडिलकीच्या नात्याने शिक्षणातील राजमार्ग दाखविला. म्हणूनच लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ‘बडोदे हे भारतातील महान व्यक्ती तयार करण्याचे ट्रेनिंग स्कूल व भावी स्वतंत्र भारताची प्रयोगशाळाच आहे. स्वतंत्र भारताची शासनव्यवस्था कशी असावी, याचे प्रयोग सयाजीराव महाराज करत आहेत.’ यामुळे ते आधुनिक भारताचे युगदृष्टे शिल्पकार ठरतात.

Web Title: Viewpoint- Maharaja Sayajirao Gaikwad: A wide-ranging donor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.