Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:34 AM2021-08-07T06:34:46+5:302021-08-07T06:36:06+5:30

Tokyo Olympics Update: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली.

Tokyo Olympics: Today's Editorial: Celebrate India's success in the Tokyo Olympics | Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे

Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे

Next

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने भारोत्तोलनमधील रौप्यपदकाचा पाया घातला. कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्या रौप्यपदकाने गुरुवारी देशाची मान पुन्हा उंचावली. बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधू, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेन यांनी कांस्यपदक जिंकले. हॉकीतल्या पदकाने पदकांचे पंचक पूर्ण झाले. लंडनची कमाई सहा पदकांची होती. टोकिओचे दोन दिवस बाकी आहेत. कदाचित आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची बरोबरीही होऊ शकेल. सुवर्णपदकाचा दु्ष्काळ मात्र कायम राहिला. बीजिंग ऑलिम्पिकनंतर बारा वर्षांमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. तथापि, गुरुवारी पुरुषांनी हॉकीतल्या पदकांचा ४१ वर्षांचा दुष्काळ संपवला. दोन गोलची पिछाडी भरून काढून बलाढ्य जर्मनीला हरवले. शुक्रवारी मुलीही असाच चमत्कार करतील, अशी आशा होती. परंतु तगड्या इंग्लंडला जबरदस्त टक्कर देऊनही एका गोलच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. हा चौथा क्रमांकही ऐतिहासिक आहे. मुलींनी पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली.  

दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा नुसतीच मानाची व जागतिक आहे असे नाही. तिच्या भव्यदिव्यतेचा मानसिक दबावही खेळाडूंवर खूप असतो. एखाद्या खेळाच्या जागतिक स्पर्धेत कितीही मोठी कामगिरी केली तरी यशाची खरी खुमारी असते ती ऑलिम्पिकमध्येच. दोन स्पर्धांमधील चार वर्षे खेळाडूंसाठी तपश्चर्येपेक्षा कमी नसतात. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे, मानाच्या पोडियमवर उभे राहता यावे, भारताचे राष्ट्रगीत वाजावे आणि तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, हे स्वप्न त्या तपश्चर्येचा अविभाज्य भाग असतो. हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्यांच्याच नशिबी हे येते, याची पुरेशी जाणीव असूनही खेळाडू प्रयत्न सोडत नाहीत. देदीप्यमान यश मिळवून देणारे खेळही या चार वर्षांमध्ये खालीवर होतात. मागची आठ-बारा वर्षे नेमबाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती व झालेच तर बॅडमिंटनची होती. यंदा कुस्ती व बॅडमिंटनने ती परंपरा कायम राखली. पुरुष मुष्टियोद्धे माघारले जात असताना लवलीनाच्या रूपाने महिलांनी त्यांची जागा भरून काढली, तर मीराबाईने भारोत्तोलन हा नवा खेळ यशाच्या साखळीत जोडला. हॉकीतल्या कांस्यपदकाने जुन्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. जणू नव्या सोनेरी दिवसांचे झुंजुमुंजु झाले. म्हणूनच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरुष व महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी लगेच बोलले, पाठीवर कौतुकाची थाप टाकली. क्रिकेट हाच धर्म व क्रिकेटपटू देव बनलेल्या देशात हे दृश्य दुर्मीळ आहे. हे चॅम्पियन्स एरवी दखलपात्र नसलेल्या सामान्य वर्गातून पुढे आले, हे विशेष. महिला हॉकीची कर्णधार राणी रामपाल हिच्या वडिलांची परिस्थिती मुलीसाठी स्टिक खरेदी करण्याचीही नव्हती. हॅट‌्ट्रिकसह विजयाचा मार्ग प्रशस्त करणारी वंदना कटारिया, पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारा रवीकुमार दहिया, पदक जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेली मीराबाई, आधीच थोर खेळाडूंच्या मांदियाळीत असलेली मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि हॉकीच्या पदकांचे दरवाजे पुन्हा उघडणाऱ्या संघातील बहुतेक सगळे खेळाडू हे सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या जिद्दीला दाद देतानाच व्यवस्थेतील वैगुण्यांवरही चर्चा व्हायला हवी.

चॅम्पियन्स आकाशातून पडत नाहीत. ते घडविण्याची व्यवस्था लागते. अगदी लहान वयात त्या गुणवत्तेचे, क्षमतेचे खेळाडू हेरून त्यांच्यावर परिश्रम घ्यावे लागतात. उगवते जगज्जेते, त्यांच्या कुटुंबांना रोजीरोटीची काळजी घ्यावी लागते. दुर्दैवाने भारतात हे घडत नाही. आपण याबाबत खूपच भाबडे आहोत. गेल्यावेळच्या विजेत्यांकडूनच आशा बाळगतो. उगवत्यांची गुणवत्ता आपल्या नावीगावी नसते. पदक जिंकले किंवा जिंकता जिंकता हरले की तोंडदेखले कौतुक होते. नंतर खेळाडूंकडे ढुंकून पाहिले जात नाही. म्हणूनच एकशेचाळीस कोटींच्या देशातल्या ऑलिम्पिक विजेत्यांची संख्या एका किंवा फारतर दुसऱ्या हाताच्या बोटांवर मोजावी लागते. केंद्र सरकारने क्रीडा खात्याची तरतूद कमी केली होती. हॉकीमधील यशाचे गोडवे गाण्याची संधी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या पुढाकारामुळे ओडिशा सरकारने हॉकीचे संघ दत्तक घेतल्यामुळे लाभली, हे विसरता कामा नये. भारतात आर्थिक स्थैर्य, सुबत्ता क्रीडा कौशल्य व गुणवत्तेत परावर्तित होताना दिसत नाही. जिथे हे घडले तो पंजाब किंवा हरियाणा खेळाडू घडवतो. महाराष्ट्र, गुजरातसारख्या प्रगत राज्यांना मात्र ते जमत नाही. अर्थात टोकियोत सुवर्णपदक मिळाले नसले तरी जे मिळाले ते सोन्याहून कमी नाही.

Web Title: Tokyo Olympics: Today's Editorial: Celebrate India's success in the Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.