शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जगावे की मरावे? मानवी अस्तित्वच पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:46 IST

देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे.

मानवी प्रगती आणि समृद्धी याला केवळ तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत नसतो. पर्यावरण आणि या पर्यावरणाला माणूस कशा पद्धतीने जपतो, पर्यावरणाची समृद्धी कशा पद्धतीने करतो, यावर खरा विकास अवलंबून असतो. मानवी समुदायाची गोष्ट पाहिली म्हणजे याची खात्रीच पटते! विकासाची व्याख्या बदलत असताना, आज मानवी हस्तक्षेपाने निसर्गाची जी वाताहत सुरू आहे, त्यावरून, येणारा काळ सर्वांसाठी संकटाचा असणार आहे! अवकाळी पाऊस, वाढणारे उष्ण दिवस, बदलते तापमान याचीच तर साक्ष देत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेचे जास्त दिवस यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये एल-निनो आणि ला-निना हे आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांना खरे तर याची जाणीव असायला हवी. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा.

दक्षिण अमेरिकेतील एका मच्छीमाराने समुद्राच्या वरच्या थराचे तापमान कमी-जास्त होत असल्याचे प्रथम पाहिले. ही घटना सोळाव्या शतकामधील. डिसेंबरमध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव सर्वाधिक असतो. ‘ला निना’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगी. ‘एल-निनो’च्या अगदी उलट परिणाम ‘ला-निना’मुळे होतो. पाऊस जास्त पडण्यास ‘ला-निना’ कारण ठरतो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी किंवा जास्त झाले, तर वाऱ्याची दिशा बदलते. एरव्ही आशिया खंडाकडे वाहणारे वारे दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि हवामानाचा पूर्ण पॅटर्नच बदलतो. याचा परिणाम आपल्याकडे भारतात पाऊस कमी होण्यावर होतो. याउलट ‘ला-निना’मध्ये अधिकाधिक वारे आशिया खंडाकडे वाहतात. एल-निनोच्या टप्प्यानंतर सर्वसाधारणपणे ‘एनसो’चा (एल-निनो सदर्न ऑसिलेशन) टप्पा येतो आणि बहुतांश वेळा एल-निनोनंतर ला-निनाची स्थिती येते. या तांत्रिक बाबी सांगण्याचे कारण म्हणजे देशात सध्या एल-निनो उतरणीच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे.

अर्थात यामुळे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात एल-निनोचा प्रभाव अद्याप असल्यामुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे जूनपर्यंत एल-निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने येणारा पावसाळा सुखद असणार आहे. पावसाच्या दृष्टीने आणखी अचूक अंदाज एप्रिल महिन्याच्या मध्यातच समजेल. त्यामुळे तूर्तास उन्हाळा सर्वांसाठी कठीण राहणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. उन्हाळ्यात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करीत असतात. पण, हा उन्हाळा आणखी एका कारणासाठी वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील दोन महिने देशभरात होणार असलेल्या मध्यावधी निवडणुका आणि त्यासाठीचा जोरदार प्रचार. उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही या काळात घरोघरी प्रचार करणार. हवामानाच्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत हवामानाच्या या अंदाजाची दखल किती जणांनी घेतली असेल? एखाद्या सभेच्या ठिकाणी हवामानाचा हा अंदाज पाहून कुठला उमेदवार लोकांच्या बसण्याची आणि आवश्यक त्या इतर सुविधांची सोय करील? एखादा अपघात झाल्यानंतरच जाग येऊ नये, ही अपेक्षा.

प्रचाराबरोबरच मतदानही ऐन उन्हाळ्यात होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांसह सर्व ठिकाणी उन्हाळ्याची दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा जागोजागी उभारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित इतक्या मोठ्या घटकाबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, त्याबद्दल ते जागरूकही नसतात... पर्यावरण, ई-कचऱ्याचे संकलन, तापमानबदल, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांची होणारी कत्तल, पर्यावरणाचा विनाश करून होणाऱ्या विकासाच्या व्याख्या यांसारखे मुद्देही निवडणुकीत दिसत नाहीत. लोकशाहीत लोक जेवढे जागरूक, तेवढी तिथली प्रशासन व्यवस्था सुनियोजित आणि कार्यक्षम. एल-निनो आणि ला-निनाबाबत जागरूक राहून त्यानुसार शेतकरी पीक घेत असतील, अशी स्थिती नाही. हवामानाबरोबरच पर्यावरणाच्या बाबतीत अधिक साक्षर होणे अपरिहार्य आहे. मानवी अस्तित्वच पणाला लागले आहे. जगावे की मरावे, असा हा सवाल आहे. पण, निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्यांना त्याचे भान तरी आहे का?

टॅग्स :Temperatureतापमान