काही वर्षांपूर्वी एका खासगी वाहिनीवर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका प्रसारित झाली होती. एका उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांमधील संघर्ष आणि त्यामधून उद्भवणारे विनोदी प्रसंग, असे त्या मालिकेचे स्वरूप होते. आज अचानक त्या मालिकेची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन राजकीय पक्षांनी गुरुवारी मुंबईत आयोजित केलेले दोन स्वतंत्र कार्यक्रम त्यासाठी निमित्त ठरले. यानिमित्ताने ठाकरे कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला. राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर थेट प्रहार केला नसला तरी, त्या पक्षाच्या मतपेढीवर डल्ला मारण्याचा इरादा नक्कीच उघड केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तर घरातीलच व्यक्तीने विश्वासघात केल्याचे सांगून, थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. ठाकरे कुटुंबातील या संघर्षाची पहिली ठिणगी बाळासाहेबांच्या हयातीतच पडली होती. पुढे त्या संघर्षातूनच राज ठाकरे यांनी मनसेला जन्म दिला. राजकीय पक्ष म्हणून मनसेला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यशही मिळाले होते; मात्र ते वृद्धिंगत करण्यात त्या पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले. ठोस दिशा व धोरणांचा अभाव, धरसोड वृत्ती आणि प्रतिक्रियात्मक राजकारण यामुळे मनसेची घसरण झाली, असा निष्कर्ष काढता येतो. राज ठाकरे यांच्या गुरुवारच्या मुंबईतील भाषणातूनही पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचाच परिचय घडला. मनसेचा प्रतिस्पर्धी क्रमांक एक शिवसेनाच आहे; पण तरीही मनसेची संपूर्ण वाटचाल शिवसेनेच्याच पावलांवर पाऊल ठेवून होत आहे. सातत्याने प्रतिक्रियात्मक राजकारण केल्याचा परिणाम समोर येऊनही, राज ठाकरे पुन्हा एकदा त्याच मार्गाने निघाले असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.
मराठी अस्मितेला हात घालूनच शिवसेनेची सुरुवात झाली होती. त्या मुद्द्यावर बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर १९८४ मध्ये देशातील इतर विरोधी पक्षांप्रमाणेच शिवसेनेचीही वाताहत झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे रामजन्मभूमी वादाच्या निमित्ताने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत, गांधीवादी समाजवाद बासनात गुंडाळून ठेवला, त्याप्रमाणेच शिवसेनेनेही मराठी अस्मिता बाजूला सारून हिंदुत्वाची वाट चोखाळली. त्यातूनच मग भाजप आणि शिवसेनेचे सूर जुळले. मनसेने स्थापनेनंतर शिवसेनेने बाजूला सारलेला मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेचे हिंदुत्व पातळ झाल्याचे बघून भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे.