प्रभू चावला,जेष्ठ पत्रकार
जगात केवळ सात कहाण्या आहेत, असे म्हटले जाते. त्याच थोड्या फार बदलून पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. याच धर्तीवर बोलायचे तर बॉलिवूडमध्ये वापरून वापरून गुळगुळीत झालेली सात नावे आहेत.. अक्षय कुमार, तीन खान, दीपिका पदुकोण, दी कपूर्स आणि करण जोहर. हे लोक एकच कहाणी आलटून पालटून सांगत असतात.
‘हाऊसफुल ५’ या अक्षय कुमारच्या सिनेमाचे उदाहरण घ्या. या सिनेमाने ६ जूनला पहिल्या दिवशी केवळ २४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या आठवड्यात १०० कोटी रुपयांचा आकडा काही ओलांडता आला नाही. सिनेमा फसला आहे, वाह्यात आहे, अशा शेलक्या विशेषणांचा समाजमाध्यमांवर पूर आलाय. यूट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरलाही २१ तासात फक्त ८० लाख व्ह्यूज मिळाले. अक्षयच्या बाबतीत ते सर्वांत कमी आहेत. रिकामे प्रेक्षागृह लपवण्यासाठी निर्मात्यांनी खोटी तिकीट विक्री दाखवल्याची बोलवा कानावर पडत असतानाच सिनेमा आपटला.
एकुणातच ख्यातनाम अभिनेत्यांची प्रेक्षकांना खेचण्याची ताकद घटली आहे. १२ हजार कोटीच्या या मनोरंजन उद्योगावर त्याचे सावट पडले आहे. एकीकडे हिंदी सिनेमा गडगडत असताना दक्षिण भारतीय सिनेमे तुफान चालत आहेत. बॉलिवूडमध्ये सर्जनशीलतेचा दुष्काळ पडल्याचेच हे द्योतक होय. अक्षय हा बॉलिवूडचा खंदा ‘खिलाडी’. त्याचा अलीकडचा ‘स्काय फोर्स’ ‘केसरी दोन’ आणि आताचा ‘हाऊसफुल ५’ हे सिनेमे १०० कोटी रुपयांचा गल्लाही जमवू शकले नाहीत. मात्र, ‘कल्की २८९८ एचडी’सारख्या सिनेमाने हिंदीत ५५० कोटी जमवले. दक्षिण भारतीय निर्मात्यांच्या ताकदीची झलक त्यातून दिसली. २०० कोटी रुपये खर्चून निर्माण केलेल्या सलमान खानच्या ‘सिकंदर’नेही २६ कोटीच मिळवून दिले. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने २०२३ साली १,०५५ कोटीचा आकडा गाठला. मात्र, यावर्षी त्यालाही ओहोटी लागली. दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची बॉक्स ऑफिस क्वीन. तिला ‘कल्की २८९८ एडी’ या दक्षिणी सिनेमाचा आधार घ्यावा लागला. बड्या तारे-तारकांच्या या अपयशाने भारताच्या मनोरंजन उद्योगाचा गळा चांगलाच आवळला आहे. त्यातच मोठ्या पडद्यांची संख्याही हळूहळू घटते आहे.
२०२४ मध्ये १.२ अब्ज तिकिटे विकली गेली. परंतु, २०२३ सालापासून प्रेक्षकांची संख्या १० टक्क्यानी घटली. स्त्री २, भूलभुलैया ३, सिंघम अगेन यांच्यासह केवळ सहा मूळ हिंदी सिनेमांनी २०२४ साली १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. २०२३ साली १६ सिनेमांनी हे करून दाखवले होते. अक्षय, अमिताभ, सलमान, कंगना, अनुपम, शाहरुख, रणबीर आणि दीपिका यांचा अभिनय असलेले सुमारे २० ते २५ सिनेमे गेल्या ५-७ वर्षात आपटले आहेत. दक्षिणेकडच्या सिनेमात मात्र अद्याप प्रेक्षकांना खेचून घेण्याची ताकद आहे. प्रभास, एनटीआर ज्युनियर यांच्यासारख्या अभिनेत्यांची चलती आहे. ‘पुष्पा दोन’च्या हिंदी आवृत्तीने ८८९ कोटी जमवले. ‘कल्की २८९८ एडी’ने ५५० कोटी, तर ‘देवरा’ने ३०० कोटी.
बॉलिवूड अजून संपलेले नाही, हे ५६७ कोटी जमा करणाऱ्या ‘छावा’ने दाखवून दिले. परंतु, त्याच्यातील मराठा अस्मितेचा भाग हा सांस्कृतिक मुळांना घट्ट धरून ठेवण्याच्या दक्षिणी सिनेमांशी मिळताजुळता आहे. जावेद अख्तर म्हणतात ‘अल्लू अर्जुनसारखे दक्षिणेतील मातीशी नाते सांगणारे अभिनेते बॉलिवूडच्या शहरी नायकांपेक्षा भारतीय प्रेक्षकांना अधिक पसंत पडतात’... ते शब्दश: खरे आहे.
बॉलिवूड नायकांची झळाळी ओसरते आहे, कहाण्यांमध्ये दम राहिलेला नाही. संगीतही ओढूनताणून आणलेले वाटते. शहरी अभिजन आणि ग्रामीण भारतातील चैतन्यपूर्ण नवी पिढी यांच्यातील वाढती दरी या सगळ्या परिस्थितीत भर घालते आहे.
भविष्यात बॉलिवूड फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नवी भरारी घेईलही. मात्र, ‘दबंग सात’सारख्या श्रुंखलांचे दळण निर्मात्यांनी चालू ठेवले तर ते अशक्य आहे. हिंदी सिनेमांची भावनिक खोली आणि दक्षिणी सिनेमांची लोकप्रियता एकत्र करून संपूर्ण भारताला पसंत पडतील, अशी कथानके आणण्याची गरज आहे. टॉलिवूड, कॉलिवूडमधले दिग्दर्शक एकत्र आले, तर सर्जनाची पहाट होऊ शकेल. ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे सध्या १५ कोटी वर्गणीदार आहेत. धाडसी कथानके आणि नव्या कलाकारांसह ओटीटी आता बॉलिवूडची प्रयोगशाळा झाली आहे.
संगीत हा हिंदी सिनेमाचा आत्मा होता. आता मुंबई ते मदुराई चालू शकतील, असे सूर या संगीताला शोधावे लागतील. ही वेगाने होणारी घसरण आवरता आली नाही, तर येत्या दहा वर्षात २०३५पर्यंत मुंबईच्या मानेवर बॉलिवूडचे भूत तेवढे शिल्लक राहील. एकल पडदे अंतर्धान पावतील. डब केलेले दक्षिण भारतीय सिनेमे मल्टिप्लेक्सवर दाखवले जातील; आणि हिंदी सिनेमातले एकेकाळचे बडे नायक यूट्यूबवर सरलेल्या दिवसांच्या आठवणी रील्सवर टाकत राहतील. बॉलिवूडला एकतर बदलावे लागेल किंवा गाशा गुंडाळावा लागेल, हेच सत्य आहे!