- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
राजकारणात कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. पण, आता दिवस असे आले आहेत की, पुन्हा सत्तेत यायला मिळणार असेल, तर शरद पवार तडजोडी करायला तयार होतील असे दिसते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे एनडीएमध्ये आता रमले असून, कुटुंबातल्या मनोमीलनासाठी फारसे उत्साही नाहीत. मोठे पवार हळूच रालोआच्या दारावर टकटक करत आहेत. लोकसभेत त्यांच्या पक्षाचे आठ खासदार आहेत. मोठ्या पवारांनी भाजपच्या विरोधात आयुष्य काढले; पण ज्या पक्षाला विरोध करण्यात एकेकाळी ते आनंद मानायचे, त्याच पक्षाशी जुळवून घ्यायला आता ते तयार झाले आहेत.
अजित शाखा संपूर्णपणे बाजूला ठेवून एनडीएत थेट प्रवेश मिळावा, यासाठी भाजपकडे त्यांचे दूत पोहचले असल्याची बातमी आहे. अर्थातच जाहीरपणे बोलताना ‘हा निर्णय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर सोडला आहे’, असे सांगितले जाते. ऑपरेशन सिंदूरसंबंधात विदेशात गेलेल्या शिष्टमंडळात पंतप्रधान मोदी यांनी सुळे यांची निवड केली होती.
अजित पवार जर सत्तेची मधुर फळे चाखत असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाने विरोधी पक्षाच्या तुकड्यांवर समाधान का मानायचे? अर्थात, या बोलवेबद्दल राजकीय वर्तुळात बराच गोंधळ आहे. तूर्त तरी रालोआ पवारांचे स्वागत करायला फारशी उत्सुक नाही, असे दिसते. परंतु, मोठे पवार राजकारणात खूप मोठी इनिंग खेळलेले आहेत. अनेक फुटी, वादळे, काठ बदलणे या सगळ्यातून टिकून राहिलेले आहेत. त्यांचे हे नवे प्रयत्न त्यांना पुन्हा चांगले दिवस आणून देतात की, राजकीय वनवासात पाठवतात, हे आता पाहायचे. एक मात्र नक्की : एवढी प्रदीर्घ इनिंग खेळूनही शरद पवार दमलेले मात्र नाहीत.
चिराग पासवान ‘तारेवर’२०२० सालच्या विधानसभा निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कडवे टीकाकार असलेले चिराग पासवान आता अगदी नव्या राजकीय वाटेने निघाले आहेत. लोकजन शक्ती पार्टी (रामविलास)चे नेते आणि मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री असलेले चिराग एकाच वेळी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत आहेत; त्याचवेळी ते अधूनमधून भाजपवरही तोंडसुख घेत असतात. एकेकाळी चिराग यांनी नितीश यांना बिहारच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा, असे म्हटले होते. पण, अलीकडेच उभयतात झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून, वावड्यांना खतपाणी मिळाले आहे.
एकेकाळी मोदी यांचा ‘हनुमान’ असलेला हा नेता बिहारमध्ये आता स्वतःच हातपाय मारत आहे. प्रादेशिक हितसंबंध असतील, तेव्हा ते जपण्यासाठी भाजपवर टीका करायला चिराग तयार असतात. विशेषत: बिहारच्या भावना दुखावतील, अशा केंद्रीय धोरणांना ते विरोध करतात; तरीही ते एनडीएच्या छावणीत पक्के राहतात. त्यांच्या मंत्रिपदाला धोका पोहोचत नाही. स्वतःसाठी एक वेगळी राजकीय जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात ते आहेत, असे त्यांच्या दुहेरी चालीतून दिसते.
प्रदेशाचे स्वातंत्र्य आणि केंद्राची निष्ठा यात चिराग यांची कसरत चालली आहे. बिहारमध्ये व्यापक स्वरूपाचे नेतृत्व करता यावे, यासाठी त्यांची ही धडपड असू शकते. ‘आपल्या पक्षाच्या बळकटीसाठी बिहार विधानसभा निवडणूक आपण लढवू’, हा इरादा त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केला आहे. भविष्यातील राजकीय शक्ती केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण करण्याचा त्यांचा मनसुबा दिसतो. विरोधक आणि मित्र अशा दोघांनाही जो खेळवू शकतो तो नवे घरोबे करू शकतो. हा संधीसाधूपणा आहे की, वास्तवातील राजकारण हे येणारा काळ सांगेल. परंतु, एक गोष्ट स्पष्ट आहे, सध्याच्या राजकीय चढ-उतारावर चिराग पासवान केवळ टिकलेले नाहीत, तर ते या राजकारणाला आकार द्यायला शिकत आहेत.
बिहार निवडणुकीच्या किल्ल्या बिहारमध्ये २०२० साली २४३ पैकी १२५ जागा मिळवून रालोआने भले सरकार स्थापन केले असेल, परंतु रालोआ आणि महागठबंधन यांच्यातील या निवडणुकीतला मतांचा फरक केवळ ११,१५० इतका होता. रालोआला १,५७,०२,६५०, तर महागठबंधनला १,५६,९१,५०० मते मिळाली. (३७.२६ टक्के, ३७.२० टक्के) नितीश कुमार यांचा करिश्मा आता उतरत असल्यामुळे रालोआची बाजू कमकुवत झालेली आहे. यादव, मुस्लीम समाज किंवा इतर मागासवर्गीय, तसेच उच्च जाती यांच्यापैकी कोणाकडे निवडणुकीची किल्ली नाही. १८ टक्के मते असलेल्या ‘डी’ फॅक्टर म्हणजे दलित समाजाच्या हाती ती आहे. बिहारमध्ये मुस्लिमांची मते अंदाजे ३२ टक्के आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक इंडिया आघाडीबरोबर दिसतात. उच्च जाती आणि इतर मागासवर्गीयांपैकी मोठा वर्ग इंडिया बरोबर आहे, म्हणून दलितांच्या मतासाठी मोठी लढाई होईल आणि भाजप, संयुक्त जनता दल किंवा इंडिया आघाडी यापैकी कुणाकडेच ठळक असा दलित चेहरा नाही, हेही वास्तव आहे. harish.gupta@lokmat.com