विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 22, 2025 07:46 IST2025-06-22T07:46:10+5:302025-06-22T07:46:50+5:30

दगडाला शेंदूर फासला आणि तो एखाद्या चौकात ठेवला की त्याचे मंदिर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का आपण निवडून आलो की आपण देव झालाे म्हणून समजा. मग आपल्या निर्णयाचे राजे..!

Special Article: Let Eknath Shinde and Uddhav Thackeray fight, see how you get elected! | विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!

विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!

-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

कार्यकर्त्यांनो,
नमस्कार.
काल आपल्या दोन नेत्यांच्या दोन सभा मुंबईत पार पडल्या. एकाने ‘कम ऑन, किल मी’ असे सांगितले. दुसऱ्याने ‘मरे हुए को क्या मारना’ असे प्रत्युत्तर दिले. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची ही नांदी आहे. दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत. तुम्हीही एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहा. हीच ती वेळ, हाच तो क्षण हे पक्के मनात बिंबवून घ्या. आमचे मित्र कवी, अरविंद जगताप यांना त्यांनीच लिहिलेल्या गाण्यात पडलेले प्रश्न तुम्हाला पडू देऊ नका.

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…
साचले मोहाचे धुके घनदाट हो …
आपली माणसं, आपलीच नाती 
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती..!

असले प्रश्न तुम्हाला पडण्याचे कारण नाही. आपल्यापुढे दोन शिवसेना आहेत. जो आपल्या विकासासाठी म्हणजेच वॉर्डाच्या विकासासाठी विकास निधी देईल त्याचा झेंडा बिनधास्त खांद्यावर घ्या. एकाने दिलेल्या विकास निधीपेक्षा दुसरा जास्त निधी देत असेल तर तोही पर्याय स्वीकारायला मागे पुढे बघू नका. शेवटी ‘स्व-विकास’ महत्त्वाचा. यांनी केला काय आणि त्यांनी केला काय..? भाजपच्या कार्यालयात ठळकपणे एक पाटी लावलेली असायची. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या वाक्याचे भाजपमध्ये काय झाले हे त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्याकडेही हल्ली, आधी इतरांना निवडून आणण्याची क्षमता, नंतर पक्ष सांगेल ते ऐकण्याची १००% तयारी आणि शेवटी पक्ष देईल त्यात समाधान मानण्याची वृत्ती... हे गुण आत्मसात करणाऱ्यांना पक्षप्रवेश दिले जात आहेत. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने तुम्हाला याची खात्री पटली असेलच. पण तो भाजपचा प्रश्न आहे. आपला प्रश्न सध्या कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा हा आहे...!

आजवर ज्यांची वाहिली पालखी 
भलताच त्याचा देव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी 
दगडात माझा जीव होता…
असं लिहायला अरविंद जगताप यांना काय जाते? मतदारसंघ टिकवणे, पक्ष चालवणे, स्वतःचे दुकान नीटनेटके करणे, यासाठी किती कष्ट करावे लागतात हे त्यांना कळणार नाही? ज्यांच्या पालख्या वाहिल्या ते देवासह पालखी सुद्धा घेऊन गेले. तेव्हा आता माथेफोडी करण्यात काहीही अर्थ नाही. 

२०१७ नंतर कधी नव्हे ते महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. तेव्हा ही सुवर्णसंधी भलते सलते विचार डोक्यात आणून घालवू नका. जो आपल्याला तिकीट देईल, जो आपल्या निवडणुकीचे ‘मॅनेजमेंट’ नीट हाताळेल, गांधी विचारांवर श्रद्धा ठेवून आपल्याला ज्याच्याकडून जास्तीत जास्त ‘गांधीजींचे फोटो’ मिळतील... तो आपला नेता..! त्याच्यात आपला देव बघावा. उगाच ‘दगडात माझा जीव होता’ म्हणण्याचे दिवस कधीच संपले आहेत. 

दगडाला शेंदूर फासला आणि तो एखाद्या चौकात ठेवला की त्याचे मंदिर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का आपण निवडून आलो की आपण देव झालाे म्हणून समजा. मग आपल्या निर्णयाचे राजे..! निवडून आल्यानंतर आपण कोणत्या पक्षाकडून निवडून आलो आणि कोणत्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालो याचे लोकांना काहीही घेणेदेणे नसते. तसे असले तरीही ते, ‘तुम्ही असे का केले?’ असे विचारू शकत नाहीत. त्यांना तो अधिकार नाही. त्यांनी त्यांचे ‘मत’ देताना त्याचे योग्य ते ‘दान’ आपल्याकडून घेतले आहे हे पक्के लक्षात ठेवा.

अरविंद जगताप यांनी एक मात्र खरे लिहून ठेवले आहे. त्याबद्दल त्यांचे थाेडे काैतुक करु. 
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं 
उभ्या उभ्या संपून जाई…
अळ रीत रीत माझं बघुनी 
उमगलं कुंपण इथ शेत खायी…
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती 
तरी झेंडे एगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती..?

जर आता आपण काही हालचाल केली नाही आणि कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक पदाची माळ गळ्यात घालून घेतली नाही तर आपले जगणे बुजगावण्यासारखे होईल. वाया जाईल. आपल्याला जर पद मिळाले नाही तर आपली अवस्था ‘घर का, ना घाट का’ होईल. घरचेदेखील आपल्याला विचारणार नाहीत. सत्तेचीच भक्ती आणि सत्तेचीच प्रीती हे शंभर नंबरी सत्य सांगितल्याबद्दल, आपण निवडून आल्यावर लगेचच या कवीचा शिवाजी पार्कवर सत्कार करू. म्हणजे त्यांनाही भविष्यात अशी गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळेल.

त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण कोणाला मारणार आणि कोण कोणाला सोडून देणार याचा फैसला होईल तेव्हा होईल. आपण मात्र विजयी व्हायला हवे. शिवसेना संपवण्यासाठी केलेली खेळी दोन्ही शिवसेनेला बळकट करेल की दोन्हीपैकी एक शिवसेना संपून जाईल? याचे उत्तर शाेधण्याच्या भानगडीत पडू नका. ते काम विचारवंत करतील. महाराष्ट्राची संस्कृती एकदम भारी आहे. मरण्या मारण्याची भाषा आपल्याला इतिहासकालीन भेट आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत प्रत्येकाने असेच एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहा. पुन्हा सांगतो, ही अखेरची संधी आहे. एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप करा. एकमेकांचे कपडे फाडा. काय करायचे ते करा. जो पक्ष तिकीट देईल त्याचे तिकीट घ्या. पण निवडून या. नंतरचे नंतर बघू... 

जाता जाता : शक्य झाले तर निवडणुकीला उभे राहणाऱ्या प्रत्येकाने दोन - पाच ॲम्बुलन्सचे बुकिंग आत्ताच करून ठेवा. कधी, कुठे, कशी गरज पडेल सांगता येणार नाही. तुम्हाला शुभेच्छा.
- तुमचाच, बाबूराव

Web Title: Special Article: Let Eknath Shinde and Uddhav Thackeray fight, see how you get elected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.