Shaheed Diwas : भगतसिंग...पण दोन दिवसांपुरतेच...बाकी ट्रेंडिंग नसतात यार !  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 02:59 PM2018-03-23T14:59:13+5:302018-03-23T14:59:13+5:30

दोन दिवस भगतसिंगांच्या विचारांना भरपूर लाइक मिळवण्याचा सिझन असतो. भगतसिंग, शहीद दिन, हॉट ट्रेंडिंग असतात म्हणून केवळ त्यांच्या पोस्ट व्हायरल करायच्या आणि उरलेले दिवस आपल्या वागण्यात काहीच आणायचं नाही, कारण ते प्रत्यक्ष वागण्याच्या बाबतीत समाजात कधीच हॉट ट्रेंडिंग नसतं. हा भंपकपणाच! कोणत्याही क्रांतिकारकाला जराही मान्य नसणारा ! भगतसिंगांना तर नाहीच नाही !

Shaheed Diwas: Bhagat Singh ... but for two days ... the rest are not trending! | Shaheed Diwas : भगतसिंग...पण दोन दिवसांपुरतेच...बाकी ट्रेंडिंग नसतात यार !  

Shaheed Diwas : भगतसिंग...पण दोन दिवसांपुरतेच...बाकी ट्रेंडिंग नसतात यार !  

googlenewsNext

- तुळशीदास भोईटे
व्हॅलेंटाइन डेला एका कार्यक्रमात प्रमुख वक्ता होतो. त्यावेळी एक स्थानिक कार्यकर्ता सूत्रसंचालनही जोशात करत होता. दिवसाची महती सांगताना आपण कसे राष्ट्रीय महापुरुषांना विसरलेलो नाही, सामाजिक भान कसं आहे ते दाखवताना अनेक महापुरुषांची नावं घेत होता. तेवढ्यात त्या कार्यकर्त्याने उल्लेख केला तो आज भगतसिंगांचा शहीद दिन असल्याचा.

आणि आपण सारेच फक्त व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात एवढे मग्न आहोत की आपल्याला या दिनविशेषाच्या राष्ट्रीय जबाबदारीचं भानच नसतं. मी दुसऱ्या वक्त्यांचं भाषण सुरू असताना त्या कार्यकर्त्याला बोलावले. 14 फेब्रुवारी हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिवस नसून तो 23 मार्चला असल्याची जाणीव करून दिली. तो कार्यकर्ता नरमला. अर्थात त्याची चूक माहिती नसणे ही होती. पण सध्याच्या व्हायरल ज्ञानाच्या काळात अनेकदा चुकीची माहिती बेधडकपणे व्हायरल केली जाते. भलेभले ती खरी मानू लागतात. तो कार्यकर्ता अशा व्हायरल पोस्टमुळेच फसला असावा.

अर्थात कितीही सांगितलं तरीही 14 फेब्रुवारी हा शहीद दिवस असल्याच्या पोस्ट व्हायरल होतंच असतात. त्या पोस्ट तयार करणारे, पाठवणारे जे व्हॅलेंटाइन डेला विरोध करून त्याच्या उत्साहावर पाणी ओतण्यासाठी जाणीवपूर्वकच अशा पोस्ट पाठवतात. त्यांची तर मला कीवच येते. मुळात अशांना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याविषयी काहीच घेणे-देणे नसते. केवळ त्यांना व्हॅलेंटाइन डेला विरोध करायचा असतो म्हणून ते तसं करतात. भगतसिंगांना फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी गैरहेतूने वापरूनच घेतात.

दुसरीकडे अशा चुकीच्या पोस्टना बळी पडून जे त्या व्हायरल करतात. ज्यांचा व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याचा हेतू नसतो. पण शहिदांप्रति आदर व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी ते त्या करत असावेत. असाच एक मोठा वर्ग 23 मार्चलाही सक्रिय असतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषयी ऐकलेलं असतं. ते हिरो असतात. त्यामुळेच शहीद दिन आला की 23 मार्चला स्वयंस्फूर्तपणे शहीद दिनाच्या पोस्ट व्हायरल करू लागतो. काही जण तर भगतसिंगांचे खूप प्रेरणादायी विचारही मांडतात. लोकांपर्यंत ते पोहोचवतात, हेही चांगलंच.

मात्र हे सारं जे काही घडतं ते फक्त दोन दिवसांपुरतेच. चुकीनं व्हॅलेंटाइन डेला. दुसऱ्यांदा शहीद दिनी. तेवढ्यापुरते भगतसिंग, त्यांचे विचार चर्चेत येतात. व्हायरल केले जातात. पुढे कुणीच काहीच लक्षात ठेवत नाही. अमलात आणलेही जात नाहीत.
भगतसिंग जे बोलले तसेच ते जगले. त्यांचा एक विचार तर कसं जगायचं ते सांगणारा. “जिंदगी अपने दम पर जी जाती है, दुसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है” आता प्रत्येकाने आठवावे. किती स्वावलंबी असतो आपण ? दरवेळी आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू पाहतो. त्यातही आपलं वैयक्तिक काही नसेल सामूहिक असेल तर जरा जास्तच जोशात येतो. पण ते जबाबदारी ढकलण्यासाठी, घेण्यासाठी नाही.

त्यामुळेच मग काही प्रश्न पडतात. भगतसिंगांच्या पोस्ट व्हायरल करणारे, राजगुरु-सुखदेव यांची आठवण काढणारे अनेक व्हायरल वीर अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणात मात्र कुठे तरी गायब असतात. व्हायरल तर सोडाच पण साधी एक पोस्ट करून नापसंती व्यक्त करतानाही दिसत नाहीत. क्रांती म्हणजे काही फक्त हिंसाचार नसतोच. तो तर एक विचारपूर्वक केलेला प्रस्थापित व्यवस्थेतील बदलाचा सक्रिय प्रयत्न असतो. अन्याय-अत्याचाराविरोधातील हुंकार असतो. मात्र महिलांवर...अगदी चिमुरड्यांवर नराधम अत्याचार करतानाही हे व्हायरलवीर अगदी लढताना दिसत नाहीत. किमान मैदानात नको, शक्य नसतं. मात्र सायबर विश्वात तरी. तेथेही नसतात. शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी संप होतो. शेतकरी मोर्चा काढतात. कुठेच दिसत नाहीत हे व्हायरल वीर, नाव घेतात भगतसिंगांचं!

काय कारण असेल? शिवाजी महाराज दुसऱ्याच्याच घरी जन्माला आले पाहिजे, तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या बाबतीतही. समजू शकतो. भगतसिंगांचं एक विधान खूप महत्त्वाचं. “सर्वसाधारणपणे लोक प्रस्थापित व्यवस्थेला, गोष्टींना सरावतात. ते बदलाच्या कल्पनेनेच थरथरू लागतात. निष्क्रियतेच्या या भावनेलाच क्रांतिकारी भावनेने बदलण्याची आवश्यकता आहे,” आजही ते लागू आहे.

Web Title: Shaheed Diwas: Bhagat Singh ... but for two days ... the rest are not trending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.