शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !

By श्रीनिवास नागे | Updated: August 21, 2025 08:03 IST

पुणे, पिंपरी-चिंचवडमधल्या आयटी पार्क परिसरात गेल्या तीन वर्षांत घरांच्या किमती ३७ ते ४० टक्क्यांनी वाढल्या, घरभाडे  ६० ते ७० टक्के वाढले, असे का?

श्रीनिवास नागे, वरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड

पोटापाण्याची व्यवस्था शोधणाऱ्या खेड्यापाड्यातील लोकांना शहरांचं खुणावणं, हे काही नवं नाही. रोजगाराच्या आणि विकासाच्या संधी, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचं जाळं, मनोरंजनाच्या सोयी आणि चांगलं जीवनमान या कारणांमुळं शहरांचं आकर्षण वाटणं स्वाभाविकच; म्हणूनच महानगरांकडं होणाऱ्या स्थलांतराचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यातून  घरांची मागणी वाढत असताना, पुरवठा कमी असल्यानं असमतोल निर्माण होतो. परिणामी घरांच्या किमतीपेक्षा घरांच्या भाडेवाढीचा वेग जास्त दिसू लागला आहे. 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या २०२०-२१ च्या अहवालानुसार, देशातील एकूण स्थलांतराचा दर २८.९ टक्के आहे, म्हणजे सुमारे ४० कोटी लोक स्थलांतरित आहेत. यांपैकी शहरी भागातील स्थलांतराचा दर ३४.९ टक्के आहे, म्हणजे शहरी लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक स्थलांतरित आहेत. राज्य सरकारनं नुकतंच महाराष्ट्राचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय. त्यात मुंबईतील ५२ टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांत राहत असल्याचं म्हटलं आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांचाच हा भरणा. ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि शेतीतलं कमी उत्पन्न, उत्पन्नाच्या साधनांची वानवा, दुष्काळ यामुळं पुरुष मंडळी रोजगार शोधण्यासाठी, चांगल्या नोकरीसाठी स्थलांतर करतात, त्यांच्यासोबत बायका-पोरंही ढकलली जातात. या लोंढ्यांनी शहरीकरण झपाट्यानं वाढतं आहे. देशातील शहरीकरणाचा दर २०२३ मध्ये ३५ टक्के असून, २०३० पर्यंत तो ४० टक्क्यांवर पोहोचेल! त्यातही जिथं रोजगारात वाढ आणि मेट्रो वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार वेगानं होतो आहे, अशा महानगरांतील गृहनिर्माण बाजारपेठ तेजीत दिसते. तिथं घरांच्या किमती तर वाढतच आहेत; पण त्यापेक्षाही घरांच्या भाड्यात जास्त वाढ नोंदवली जाते आहे. मुंबई, दिल्ली, बंगलोर, पुणे या शहरांतला भाडेवाढीचा वेग घरांच्या किमतीच्या वाढीपेक्षा जास्त आहे. २०२४-२०२५ मधील राष्ट्रीय  आकडेवारीनुसार, घरांच्या किमती सरासरी वर्षाला सहा ते सात टक्के दराने वाढतात, तर भाडं सात ते १० टक्क्यांपेक्षा वेगानं वाढतं आहे. मात्र महानगरांतली वाढ चक्रावून टाकणारी!

आयटी सेक्टर आणि मेट्रो विकासामुळं बेंगळुरूत २०२४ मध्ये घरांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढल्या, तर भाडं २३.२ टक्क्यांनी वाढलं. घरांचा पुरवठा ४६ टक्के कमी असल्यामुळं चेन्नईतली भाडेवाढ ४४.७ टक्के, तर घरांच्या किमतीतील वाढ १६ टक्के होती. पुणे, पिंपरी-चिंचवडमधल्या आयटी पार्क असलेल्या हिंजवडी-वाकड आणि वाघोलीत तीन वर्षांत घरांच्या किमतीत ३७ ते ४० टक्के वाढ नोंदवली गेली, तर घरांच्या भाड्याने मात्र ६० ते ७० टक्के वाढीचा पल्ला गाठला! मुंबईत घरांच्या किमतीत तीन वर्षांत १८ ते ४० टक्के वाढ झाली, तर घरभाडं मात्र १४ ते ६० टक्क्यांनी वाढलं. घरांच्या मागणी-पुरवठ्यातील असमतोल, आर्थिक गणितं, भाडेबाजारातील सुधारणा ही भाडेवाढ जास्त असण्यामागची प्रमुख कारणं. महानगरांमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी येणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्यानं भाड्याच्या घरांची मागणी वाढते; पण नवीन घरांचा पुरवठा मर्यादित आहे. उच्च उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या वाढत असल्यानं लक्झरी घरांची मागणी वाढते; पण मध्यमवर्गीयांना घर खरेदी परवडत नसल्यानं ते भाड्यानं राहणं पसंत करतात. महागाई, बांधकाम खर्च आणि व्याजदरासारखे मॅक्रोइकॉनॉमिक घटक घरखरेदीपेक्षा भाड्याच्या घरांकडे कल वाढवतात.

गेल्या पाच वर्षांत मेट्रो, फ्लायओव्हर आणि टेक हब्स अशा पायाभूत सुविधांचा विकास झपाट्यानं होणाऱ्या भागात घरांची मागणी जास्त दिसते. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड इथल्या मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळं त्या-त्या भागांत हे प्रकर्षानं दिसतं. काही वर्षांपूर्वी देशभरातील १०० शहरांत स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली. तिचा फायदा मोजक्याच शहरांनी करून घेतला. त्यात पुणे, पिंपरी-चिंवडसारख्या शहरांचा समावेश आहे. त्यांनी नवनवीन प्रकल्प राबवले. वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा यांचं एकत्रित नियंत्रण, डिजिटल सिग्नलिंग, स्मार्ट रस्ते, सायकल ट्रॅक्स, बसथांबे, उद्यानं आणि मोकळ्या जागांचा विकास यांवर लक्ष केंद्रित केलं. भरपूर उजेड असलेली हवेशीर घरं, मोकळी उद्यानं, फूटपाथ, रुंद रस्ते हे शहरी नागरिकांचे मूलभूत अधिकार देण्यासाठी प्रयत्नपूर्वक योजना आखल्या. त्यांनी स्थलांतरितांना आकर्षित केलं; पण परवडणाऱ्या घरांसाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळं भाड्याच्या घरांना पसंती मिळत गेली. मॉडेल टेनन्सी ॲक्ट (२०१९) सारख्या सुधारणांमुळं भाडेबाजार अधिक संघटित झाला. तोही आता भाडेवाढीस चालना देतो आहे.

shrinivas.nage@lokmat.com

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन