राजन यांच्या मात्रेचा वळसा!
By Admin | Updated: April 25, 2016 03:37 IST2016-04-25T03:37:06+5:302016-04-25T03:37:06+5:30
भाजपा किती असहिष्णू आहे, यावर गेल्या वर्षभरात बरीच चर्चा झाली आहे. पण हेच वास्तव रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या नेहमीच्या अत्यंत संयमित वृत्तीने अगदी ठळकरीत्या अधोरेखित तर केले

राजन यांच्या मात्रेचा वळसा!
भाजपा किती असहिष्णू आहे, यावर गेल्या वर्षभरात बरीच चर्चा झाली आहे. पण हेच वास्तव रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या नेहमीच्या अत्यंत संयमित वृत्तीने अगदी ठळकरीत्या अधोरेखित तर केले आहेच, पण सत्ताधारी पक्षाला व त्याच्या भोवती जमलेल्या भक्तांना शालजोडीतील ठेवून दिली आहे. निमित्त घडले आहे, ते राजन यांनी वॉशिंग्टन येथे एका परदेशी चित्रवाणीला दिलेल्या मुलखतीत भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल केलेल्या विधानाचे. जगात मंदीचे वातावरण असताना भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग तुलनेने बरा आहे, हा मुद्दा मुलाखतीच्या दरम्यान निघाला. तेव्हा ‘अंधांच्या देशातील एकाक्ष राजा’ अशी उपमा देत राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन केले. त्यावरून टीकेचे मोहोळ उठले. खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वॉशिंग्टन येथेच बोलताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे रंगीबेरंगी चित्र उभे केले. व्यापार खात्याच्या मंत्री निर्मला सीतारामन यांनी तर ‘राजन यांनी योग्य शब्दांचा वापर करणे अपेक्षित होते’, असे सुनावले. भारतात परत आल्यावर दुसऱ्या एका समारंभात बोलताना राजन यांनी या टीकेचा समाचार घेताना बजावले की, ‘कोणत्याही मुद्द्याचा आशय समजून न घेता, त्याबबत चर्चा न करता, तो आपल्या विरोधात आहे असे मानून प्रतिक्रिया देण्याची पद्धत योग्य नाही. तुम्हाला जे पटत नाही, ते तुमच्या विरोधातील असतेच असे नाही’. त्याचबरोबर ‘अंधांच्या देशातील एकाक्ष राजा’ या उपमेची फोडही राजन यांनी केली आणि ग्रीक तत्त्वज्ञ इरॅस्मसपासून गांधीजींपर्यंत ही उपमा कशी वापरली गेली आहे, तेही सांगितले. जाता जाता ‘मी अंधांची माफी मागतो’, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. मात्र याच भाषणात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे जे वास्तव चित्र उभे केले, ते ‘अच्छे दिन’च्या घोषणेने हुरळून गेलेल्यांच्या स्वप्नाला तडा देणारे होते. राजन यांनी सांगितले की, ‘रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून काम करीत असताना मी प्रगतीच्या आकडेवारीने हुरळून जाऊ शकत नाही. आपण खूप आर्थिक सुधारणा केल्या आहेत, यात वादच नाही. आपण प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, हेही खरे आहे. पण पुढील २० वर्षे आपण सातत्य व जिद्द दाखवली, तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधू शकू. पण भविष्यात निर्माण होऊ शकणारी संपत्ती जणू काही आजच आपल्या हाती पडली आहे अशा रीतीने आपण वागू लागलो, तर पूर्वी जे घडत आलं आहे, त्याचीच पुनरावृत्ती होणे अटळ आहे’. चीनचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या चौपट आहे आणि जगातील जे मोठे देश आहेत, त्यात भारत अजूनही गरीब म्हणूनच गणला जातो, असे प्रतिपादन राजन यांनी ठामपणे केले. अर्थात वास्तवाच्या मात्रेचा हा राजन यांनी दिलेला वळसा किती उपयोगी ठरेल, हा मुद्दा आहेच; कारण अशा रीतीने वास्तवाकडे देशाला बघायला लावण्याची राजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. टीकेचा सूर अजिबात ऐकू येणार नाही, इतक्या संयतपणे राजन सतत आर्थिक वास्तवाची जाणीव करून देत आले आहेत. पण निवडणुकीच्या राजकारणाला चटावलेल्या आपल्या राजकारण्यांना हे रुचत तर नाहीच, पण पचवून घेण्याची त्यांची बौद्धिक क्षमताही नाही, हे खरे दुर्दैव आहे. सध्या ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे, त्यापैकी तामिळनाडूसंबंधीची ही आकडेवारी दर्शवते की, त्या राज्याचे महसुली उत्पन्न एक लाख सात हजार कोटींचे आहे. त्यातील जवळ जवळ ३५ ते ३७ हजार कोटी दारूच्या विक्रीतून येते. पण तामिळनाडूतील अण्णा द्रमुकचे जयललिता सरकार ‘अम्मा’ या ब्रँडखाली इडल्या, दहीभात वगैरे खाण्याच्या पदार्थांपासून ते चित्रवाणी संच, साड्या, घरातील भाडीकुंडी इत्यादिंपर्यंत अनेक वस्तू व पदार्थ बाजारापेक्षा एक तृतियांश किमतीला गेली काही वर्षे देत आले आहे. त्यामुळे एकेकाळी खर्चापेक्षा जादा महसूल जमवणारे तामिळनाडू हे राज्य आज कर्जबाजारी बनत आहे. त्यातच आता टप्प्याटप्प्याने दारूबंदी करण्याचा निर्णय जयलललिता यांनी जाहीर केला आहे. म्हणजे दारूच्या विक्र ीतून मिळणारे उत्पन्न काही वर्षांत मिळेनासे होणार आहे. मग नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलती कमी करणार काय? उघडच नाही. म्हणजे राज्य जास्तीत जास्त कर्जबाजारी बनत जाण्याचा धोका आहे. नेमक्या याच पद्धतीच्या आर्थिक बेशिस्तीच्या विरोधात राजन बोलत आले आहेत. म्हणूनच त्यांनी ‘अंधांच्या राज्यात एकाक्ष राजा’ ही उपमा दिली. जयललिता अशी उधळमाधळ करीत आहेत आणि मतदार त्यांना पाठबळ देण्याच्या मन:स्थितीत आहेत; कारण ती लोकांची गरज आहे. लोकांच्या हाताला काम मिळवून देऊन त्याआधारे खरे तर ही गरज त्यांना स्वत:ला भागवता येईल, असे धोरण आखले जायला हवे. पण तसे करायचे झाल्यास अनेक हितसंबंधांवर घाव घालावे लागतील. पण सध्याचे राजकारण याच हितसंबंधांवर आधारलेले आहे. त्यामुळे हे होणे कठीणच आहे. म्हणूनच राजन यांनी दिलेला मात्रेचा वळसा निरुपयोगी ठरण्याचीच शक्यता जास्त.