शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पुढे जाण्यासाठी मागे येण्याची शर्यत

By यदू जोशी | Updated: October 13, 2023 10:58 IST

सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -‘गडे मुर्दे उखाडना’ असा हिंदीत एक शब्दप्रयोग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तेच चालले आहे. बंद खोलीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द, पहाटेच्या शपथविधीमागे नेमके कोण होते, बाळासाहेबांचा विचार मातोश्रीवर संपत असल्याने बंड केल्याचे समर्थन, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा शब्द चारवेळा दिला अन् ऐनवेळी तो कसा फिरवला, आता शरद पवारांसोबत असलेले जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडच भाजपसोबत चला म्हणत कसे होते ही त्याची काही उदाहरणे आहेत. आताच्या किंवा भविष्याच्या राजकारणावर फारसे कोणी बोलताना दिसत नाही. असे का होत आहे? कारण सगळ्यांना पुढे जायचे आहे आणि त्यासाठी आधीचे डाग पुसायचे आहेत. कुछ दाग अच्छे होते है... हे जाहिरातीत ठीक आहे; पण राजकारणात कोणालाही कोणताच डाग नको आहे. त्यामुळेच स्वत:ला शुद्ध करवून घेण्याची शर्यत लागली आहे. सगळ्यांनी सगळेच केले. ते काय लपून राहिले? उद्धव ठकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले, काँग्रेसने शिवसेनेला मिठी मारली. मैद्याचं पोतं म्हणून हिणवणाऱ्यांसोबत शरद पवार गेले, राजकीयदृष्ट्या तोवर अस्पृश्य असलेल्या अजित पवारांबरोबर फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला. निष्ठेला पाठ दाखवत एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या फौजेवर गोमूत्र शिंपडून भाजपने त्यांना पवित्र करवून घेतले. कालपर्यंत बाळगलेल्या विचारांना तिलांजली देणारे निर्णय सगळ्याच प्रमुख पक्षांनी घेतले; त्यातून तत्कालिक फायदेही झाले; पण आता जनतेच्या न्यायालयात जायचे असल्याने त्या निर्णयांमागे असलेल्या सत्तातूर अशुद्ध हेतूंना शुद्धतेचा मुलामा लावण्याचे काम जोरात चालले आहे. त्यासाठीच एकमेकांना कटघऱ्यात उभे करणे सुरू आहे. दोन चुकीच्या गोष्टी बरोबर एक योग्य गोष्ट असे होत नसते. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने बैल मारण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही; पण महाराष्ट्रात सध्या तेच होत आहे. मित्रांमध्येच परस्परांबद्दलचा अविश्वास हादेखील कळीचा मुद्दा आहे. शरद पवार इंडिया आघाडीसोबत राहतील की नाही, अशी साशंकता विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांना आहे. या आघाडीसोबत राहून शरद पवार काही आमदार, खासदार निवडून आणतील, अजित पवार भाजपसोबत राहून काही आमदार, खासदार जिंकवतील आणि मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या साक्षीने काका- पुतण्यांचे मनोमिलन तर होणार नाही ना, अशी शंका अधूनमधून घेतली जाते. अदानींशी अधेमधे होणाऱ्या भेटींमुळे मग ही शंका अधिक गडद होत जाते. परतीचे दोर कापले गेले आहेत, असे जयंत पाटील म्हणतात. दुसरीकडे भाजपसोबत चला म्हणून सह्या करणाऱ्यांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडही होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल करतात. एकनाथ शिंदे बाहेर पडले ते परतीचे दोर कापून आणि ते त्यांच्या प्रत्येक कृतीतही दिसले. राष्ट्रवादीत तसे नाही. तुझे माझे पटेना अन् तुझ्यावाचून करमेना, असे सुरू असते. लोकसभेला धक्के बसतीलभाजपने मध्य प्रदेशात विधानसभेची उमेदवारी देताना अनेक धक्के दिले. केंद्रीय मंत्री, खासदारांना मैदानात उतरविले. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असेच धक्के दिले जातील. राज्याच्या राजकारणातील आठ-दहा नेत्यांना दिल्लीचे तिकीट दिले जाईल. त्यात अत्यंत आश्चर्यकारक नावे असू शकतात. विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. राहुल नार्वेकर, डॉ. संजय कुटे, रवींद्र चव्हाण, महेश लांडगे यांची नावे त्या दृष्टीने चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते. कसेही करून लोकसभा जिंकणे यालाच प्रमुख पक्षांचे सर्वोच्च प्राधान्य असेल आणि राज्यातील नेत्यांसमोर दिल्लीचे ऐकल्याशिवाय पर्याय नसेल.काँग्रेसमधील हाणामाऱ्याकाँग्रेससाठी वातावरण गेल्यावेळपेक्षा चांगले आहे; पण काँग्रेसवाले सुधारत नाहीत. नागपुरात एकमेकांना भिडले. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्या समक्ष हे घडले. एकमेकांचे कपडे फाडण्याची नागपूर काँग्रेसला जुनी परंपरा आहे. तिडके- तिरपुडेंपासून तेच चालले आहे. संघवाले नागपुरात भाजपला आणता आणता थकले; काँग्रेसने संघाची इच्छा पूर्ण केली. एकत्र राहिले असते तर शुक्रवारी तलाव, अंबाझरी तलाव, सक्करदरा तलावात कमळ फुलले नसते. पक्षातले बरेच नेते काँग्रेसपेक्षा मोठे झाले अन् काँग्रेस लहान होत गेली. ही एकट्या नागपूरचीच व्यथा नाही. मुंबई काँग्रेसमध्येही उद्या हीच वेळ येऊ शकते. तिथे पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू आहे. राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वयाचा आजही अभाव आहे. धानपट्ट्यातल्या पटोलेंचे बाजूच्या संत्रा पट्ट्यात चालत नाही तर दूरच्या ऊस पट्ट्यात काय चालेल? जाता जाता : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली ४० दिवसांची मुदत दोन दिवसांवर आली आहे. पाठोपाठ धनगर समाजाने दिलेली डेडलाइनही संपत आली आहे. ओबीसी आंदोलकही पुन्हा आक्रमक होऊ पाहत आहेत. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना शिंदे सरकारची पुन्हा कसोटी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात दोन वेळा मुंबईत येत आहेत. एकूणच वातावरण ढवळून निघेल, असे दिसते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे