खड्ड्यांनी वाट लागली
By Admin | Updated: October 17, 2016 05:03 IST2016-10-17T05:03:54+5:302016-10-17T05:03:54+5:30
शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे.

खड्ड्यांनी वाट लागली
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. पण या शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे. गडगंज महापालिका शहरातील रस्ते चांगले का ठेवू शकत नाही, हे न सुटलेले कोडे बनले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. पण या शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे. मुंबई आजही आर्थिक राजधानी आहे. पण विकासाचे आदर्श रूप अशी या शहराची जडणघडण झाली आहे का, नागरी व्यवस्थांच्या बाबतीत इतर शहरांनी वस्तुपाठ मानून नक्कल करावी अशी स्थिती आजमितीस आहे का, या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी मिळू शकत नाहीत.
देशभरातील महामार्गांचा कायापालट करून पाश्चात्त्य जगाच्या बरोबरीने उभे राहण्याची स्वप्ने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी दाखवत आहेत. महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, गुजरातसह आणखी काही राज्यांमध्ये प्रवासात पोटातील पाणी हलणार नाही, असे रस्ते दिसू लागले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना गडकरींच्या धडाक्यातून मुंबईत कित्येक उड्डाणपूल मार्गी लागले. या पार्श्वभूमीवर एक गडगंज महापालिका शहरातील रस्ते चांगले का ठेवू शकत नाही, हे न सुटलेले कोडे बनले आहे.
चारशे चौरस किलोमीटरपेक्षा कांकणभर जास्त क्षेत्रफळ असलेल्या मुंबईतील मोठा भूभाग ठाणे-मुंबई मिळून १०५ चौरस कि.मी. व्यापलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच समाविष्ट आहे. राहिलेल्या भागातील रस्त्यांची देखभाल करणेही महापालिकेला जमेनासे झाले आहे. विजेच्या दरडोई वापरासारखेच रस्त्यांची स्थिती हे संपन्नता आणि विकासाच्या मोजमापाचे एकक झाले आहे. या मापदंडावर मुंबईला तोलायचे ठरविले, तर इतर अनेक शहरांच्या तुलनेत मुंबई दरिद्री ठरेल. या शहरातील रस्ते व त्यांची देखभाल हा तीन दशकांपासून भ्रष्टाचाराचा आणि राजकारणाचाही विषय होऊन गेला आहे.
महापालिकेतील सत्तेच्या चाव्या अनेक वर्षे शिवसेनेच्या हातात आहेत. सत्ताधारी शिवसेनेशी संघर्षाची भूमिका घेणारे सदाशिवराव तिनईकरांसारखे काही मोजके आयुक्तही महाराष्ट्राच्या राजधानीने पाहिले. कंत्राटदारांची तळी उचलण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र आलेल्या महापालिका सदस्यांचे सिंडिकेट मुंबईतील माध्यमांनी जवळून पाहिले. काळाच्या ओघात यात फारसा बदल झाला नाही. अर्थात रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार डांबराहून काळा झाला. तिनईकरांनी त्यांच्या काळात भ्रष्टाचाराचा आवाका कमी करण्यासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणालाच वेसण घातली होती. तो मार्ग योग्य होता की अयोग्य, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
मुद्दा इतकाच, की पैसा पाण्यासारखा खर्च होऊनही मुंबईतील रस्ते खड्ड्यात का गेले आहेत? या बाबतीत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा सूर एकसारखा राहिला आहे. मुंबईतील रस्त्यांवरचे खड्ड्यांचे प्रमाण झाकण्याजोगा युक्तिवाद आता शिल्लक नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी अनेक वर्षे भरमसाठ पाऊस पडण्याचे कारण दिले जात असे. पण जागतिक पर्यटनाचा विस्तार झाल्यावर चीन, श्रीलंका आणि इतरही काही देशांमधील आपल्यापेक्षा जास्त पर्जन्यमानाचा पट्टा आणि त्यातील उत्तम रस्ते पाहिल्यावर त्यातील फोलपणा लपून राहिला नाही. मग कधी वाहनांच्या वाढत्या संख्येचे, तर कधी वीज, गॅस आदि सुविधांसाठी भूमिगत पाइप वा केबल टाकण्यासाठी रस्ते खोदून नंतर ते नीट न बुजविणाऱ्या एजन्सीजच्या नाकर्तेपणावर खापर फोडण्याचा उद्योग सुरू झाला. आताशा रस्त्यांवरील अतोनात खड्डे हे वाहतूक कोंडीचे कारण झाले आहे. याच खड्ड्यांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या पालिकेतील गटप्रमुखाने तीव्र विरोधाचे रोप लावले आहे.
पालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत रस्त्यांच्या स्थितीच्या राजकारणाचा खड्डा आणखी मोठा झाला असेल. मुंबईकरांना एकच कळते, जसे पोलिसांनी ठरविले तर देवळाबाहेरची चप्पलही चोरीला जाऊ शकत नाही, तसेच भ्रष्टाचार म्यान झाला तर रस्त्यावर खड्डा पडू शकत नाही. पण तसे झाले तर राजकारणाचा हेतूच खड्ड्यात जाईल ना!
- चंद्रशेखर कुलकर्णी