टोकियोमध्ये ‘हाती लागले’ एक नवे स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:40 AM2021-08-10T05:40:57+5:302021-08-10T05:41:17+5:30

क्रीडांगणावरल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताची गणना होण्यासाठी आणखी थोडा वेग वाढवावा लागेल, स्तर उंचवावा लागेल, भक्कम व्हावे लागेल!

new dream found in Tokyo Olympics | टोकियोमध्ये ‘हाती लागले’ एक नवे स्वप्न!

टोकियोमध्ये ‘हाती लागले’ एक नवे स्वप्न!

Next

- व्यंकय्या नायडू, भारताचे उपराष्ट्रपती

टोकियो ऑलिम्पिकचा शेवट भारतासाठी गोड झाला. प्रत्येक भारतीयाचा अभिमान असलेला तिरंगा तेथे फडकला, तोही तब्बल १३ वर्षांनंतर. भालाफेकीत नीरज चोप्राने मौल्यवान सुवर्णपदक मिळवल्याने हे शक्य झाले. स्वतंत्र भारताचे हे ॲथलेटिक्समधले पहिले सुवर्णपदक, ते तितक्याच सोनेरी रीतीने मिळाले. अभिनव बिंद्राला २००८ साली व्यक्तिगत सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर हे दुसरे व्यक्तिगत सुवर्ण! 



टोकियो ऑलिम्पिकचे भारतासाठी असलेले महत्त्व योग्य दृष्टीने पाहावे लागेल. मागच्या २४ ऑलिम्पिक्समध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आणि भविष्यही काही फारसे चांगले दिसत नव्हते. या पार्श्वभूमीवर भारताने ‘आम्हीही करू शकतो’ हे या वेळी दाखवून दिले आहे. प्रत्येक वेळी भारतीय संघ अधिक पदके मिळवायचे स्वप्न घेऊन ऑलिम्पिकला जाणार, आणि निराशा पदरी घेऊन परतणार... हा विसरावा असाच भूतकाळ! तो विसरण्याची संधी टोकियोने दिली. केवळ पदकांची संख्याच नव्हे, तर खेळाडूंनी दाखवलेला निर्धार, स्पर्धेत मारलेली खोलवर मुसंडी या वेळी प्रथमच दिसली.



ब्रिटिश वसाहतीच्या काळात भारताने १९०० साली प्रथम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तेव्हा दोन पदके  मिळाली. तीन मिळवायला १०८ वर्षे उलटावी लागली. आणखी ४ वर्षांनी  लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या ६ झाली. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ २ पदके मिळाली... म्हणजे एकूण २४ ऑलिम्पिक्समध्ये भारताने अवघी २८ पदके मिळवली. दर चार वर्षांनी भारताचा आत्मविश्वास ढासळत गेला नसता तरच नवल होते.  बाकी बाबतीत भारतासारखे असलेले इतर देश पदकांच्या बेरजेत पुढे जात असताना भारताच्या नशिबी मात्र घसरगुंडीच लिहिलेली होती.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ११८ खेळाडूंनी भाग घेतला, त्यातले २०  उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. या वेळी १२० खेळाडूंपैकी ५५ उपांत्य फेरीत लढले. पदकांच्या दिशेने त्यांची मुसंडी जोरात दिसली. १८ खेळांत भारत सहभागी झाला. त्यात १० हून अधिक खेळांत आपले खेळाडू उपांत्यपूर्व किंवा पुढच्या फेरीत गेले. ५ खेळांत सुवर्णपदकासाठी लढत दिली. हॉकीसह ४ सामन्यांतले ४३ उपांत्य फेरीत गेले. ३ खेळांतले ७ खेळाडू उपांत्यपूर्व लढले.



टोकियोत एका सुवर्णासह ७ पदके मिळवून भारतीय ॲथलीटनी पक्का निर्धार दाखवला. तीनपैकी पहिल्याच फेकीत नीरज चोप्राने भालाफेकीत प्रभुत्व दाखवले. गोळाफेकीत कमलप्रीत कौर चमकली. ३९ वर्षीय ज्येष्ठ टेबल टेनिसपटू अचंता सरत कमलने उपांत्य फेरीत अंतिम सुवर्ण विजेत्या खेळाडूच्या नाकीनऊ आणले होते. उपांत्यपूर्व फेरीत मोनिका बात्राने लक्षणीय धमक दाखवली. बजरंग पुनिया आणि दीपक दहिया यांनीही उत्तम खेळ करून पदकांवर नाव कोरले. भारताने तलवारबाजीत प्रथमच भाग घेतला. त्यात भवानी देवीने पहिली फेरी जिंकली.

गोल्फर अदिती अशोकचे कांस्यपदक निसटते हुकले. ४ X ४०० मीटर रिलेत नवा आशियाई विक्रम प्रस्थापित झाला. लांब उडी आणि पुरुषांच्या ८०० मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम सुधारले. या लढतींनी पदकांची आस बाळगणाऱ्या भारतीयांना नक्कीच हायसे वाटले असेल. तिरंदाजी आणि नेमबाजीत अधिक चांगली कामगिरी झाली असती तर पदकांची संख्या वाढली असती. ऑलिम्पिक खेळात दबाव खूप असतो. त्याच्याशी सामना करता आला तर आपण अधिक पदके पदरात पाडून घेऊ शकतो.

हॉकीत भारताचे नीतिधैर्य उंचावणारा ‘चक दे’ क्षण टोकियोत आला. मागची ८ ऑलिम्पिक सुवर्णपदके, खेळाबद्दल देशवासीयांचे प्रेम, हा खेळ राष्ट्रीय अस्मितेचा भाग होणे या पार्श्वभूमीवर गेली ४१ वर्षे आपण सतत हारच पाहिल्याने आत्मविश्वास आणि स्वाभिमानाला तडा जाऊ लागला होता. आत्मविश्वास आणि स्वाभिमान नसलेला देश कशातच चमक दाखवू शकत नाही. महिला आणि पुरुषांच्या हॉकीत या वेळी चमकदार खेळ झाला. भारतीय क्रीडा विश्वात त्याने प्राण फुंकले. देशाभिमान उंचावला. देशाच्या क्रीडाविश्वाला या मनोधैर्याची अत्यंत गरज असताना हे झाले, हे महत्त्वाचे. क्रिकेट आपल्या मनात आहे तर हॉकी हृदयस्थ आहे. हॉकीत हा ‘चक दे’ क्षण आल्याने टोकियो भारतासाठी महत्त्वाचे ठरले.



पुढे काय करावे लागेल, याचे धडेही टोकियोने भारताला दिले आहेत. या वेळी चार सुवर्णपदके मिळाली असती तर भारत पहिल्या २० देशांत सरकला असता. आणखी चार मिळाली तर पहिल्या दहांत. टोकियोतला खेळ पाहिला तर हे काही फार अशक्य नाही. खेळाडूंचे नैपुण्य शोधून ते वाढवण्याचा कार्यक्रम सरकारने २०१५ साली हाती घेतला त्याला टोकियोत ही फळे आली आहेत. यापुढे देशभर खेळ संस्कृती रुजवावी लागेल. भविष्यात चमकू शकतील अशा खेळाडूंना व्यावसायिक आणि तंत्रज्ञानाची मदत करावी लागेल. केंद्र सरकारने या दिशेने योग्य पावले टाकली आहेत. टोकियोतील खेळाने १२१ वर्षांत प्रथमच ‘हे आपण नक्कीच करू शकतो’ हे दाखवून दिले आहे. 

खेळात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताची गणना होण्यासाठी आणखी थोडा वेग वाढवावा लागेल, स्तर उंचवावा लागेल, भक्कम व्हावे लागेल. आधी पॅरिस किंवा खरेतर त्यानंतरचे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक हे ‘लक्ष्य’ ठरवण्याची ही वेळ आहे. १४० कोटी भारतीयांच्या इच्छा, आकांक्षा फलद्रूप व्हाव्यात, हीच सदिच्छा.

Web Title: new dream found in Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.