‘तुकाराम’ पॅटर्नला नवे आयाम !
By Admin | Updated: July 11, 2016 04:05 IST2016-07-11T04:05:34+5:302016-07-11T04:05:34+5:30
आषाढी यात्रा कालावधीत पंढरीत सुमारे २० लाख भाविकांची यंदा वर्दळ राहणार आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांत आतापर्यंत बरा पाऊस झाल्याच्या वार्ता आहेत. सोलापूर जिल्हा मात्र आजही कोरडाच आहे

‘तुकाराम’ पॅटर्नला नवे आयाम !
राजा माने
(सोलापूर आवृत्तीचे संपादक )
आषाढी यात्रा कालावधीत पंढरीत सुमारे २० लाख भाविकांची यंदा वर्दळ राहणार आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांत आतापर्यंत बरा पाऊस झाल्याच्या वार्ता आहेत. सोलापूर जिल्हा मात्र आजही कोरडाच आहे. पाऊस नसल्याने थोडे चिंतेच्या वातावरणाचे ओझे वाहत वैष्णवांच्या मेळ्याची तयारी करण्यात पंढरपूरकर आणि सोलापूर जिल्हा सध्या गुंतलेला आहे. चंद्रभागा नदी हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘नमामि चंद्रभागा’विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्धाराच्या यशावरच निर्मल चंद्रभागेचे भवितव्य अवलंबून आहे. पुणे शहर, भीमा नदीकाठची शेकडो गावे आणि खुद्द पंढरपूर शहराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन जोवर होत नाही तोवर १०० टक्के निर्मल चंद्रभागा अस्तित्वात येणे शक्य नाही या वास्तवाचे भान सर्वांनाच आहे. जिल्हा प्रशासन, पंढरपूर विकास प्राधिकरण, नगरपालिका, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती त्या वास्तवामुळेच आषाढीपुरती मलमपट्टी करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. वारीच्या कालावधीत उजनी धरणातून पाणी सोडले जाते आणि चंद्रभागा नदी तुडुंब भरते. पण ती कोरडी असताना तिचे जे हाल सर्वांकडूनच होतात त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. ही पार्श्वभूमी घेऊन यावर्षी आषाढी यात्रा एकादशीदिवशी ६ ते ८ लाख विठूभक्तांना सामावून घेणार आहे.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोन पालख्यांसह बाराशेहून अधिक पालख्या आणि पाच हजार दिंड्यांमधून राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठूदर्शनाच्या ओढीने निघाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना पावसाने गाठले. भक्तिरसात दंग झालेला त्यांचा प्रवास मात्र श्रद्धेने सुरूच आहे. गतवर्षी त्यावेळचे जिल्हाधिकारी व सध्याचे नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयआरएस (इन्सिडंट रिस्पॉन्स सिस्टीम) पद्धत तयार केली व त्याद्वारे यात्रा व्यवस्थापन केले. ते व्यवस्थापन ईओसी (इमर्जन्सी आॅपरेटिव्ह सेंटर) या नावाने प्रशासनात लोकप्रिय झाले. वर्षानुवर्षे आषाढी यात्रा भरते. लाखो वारकरी स्वयंशिस्तीने ही यात्रा यशस्वी करतात. वारकऱ्यांच्या श्रद्धेला व स्वयंशिस्तीला सक्षम यात्रा व्यवस्थापनाची जोड देण्याचा प्रयोग त्यावेळी झाला. आषाढीकडे एकूणच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून तसे नियोजन मुंढेंनी केले आणि तो आषाढीचा ‘तुकाराम पॅटर्न’ बनला. चंद्रभागेच्या वाळवंटात गर्दीने उडणारा गोंधळ आणि त्यामुळे वारकऱ्यांना होणारा त्रास तसेच पंढरपुरात होणारी घाण यावर नियंत्रण आणण्यासाठी ६५ एकर क्षेत्रात एक नवा वारकरी तळ विकसित करण्यात आला. गतवर्षी त्याची सुरुवात झाली. यावर्षी जिल्हाधिकारी रणजित कुमार त्याच आषाढीच्या ‘तुकाराम पॅटर्न’ला नवे आयाम देण्यासाठी कल्पकतेने काम करीत असल्याचे दिसून येते. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांचा आषाढी व पंढरपूर विकासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, रणजित कुमार यांची कल्पकता, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांची लोकांना सोबत घेऊन पोलीस यंत्रणा गतिमान करण्याची कृती आणि त्याला अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे रवींद्र कुलकर्णी, तहसीलदार नागेश पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांनी दिलेल्या साथीची जोड यामुळे यावर्षीच्या आषाढी व्यवस्थापनाला नवे आयाम मिळत आहेत. ६५ एकर तळावर येणाऱ्या वारकऱ्यांना विसाव्यापासून स्वच्छतागृहापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्या तळांवर गतवर्षीच्या तुलनेत वीज, पाणी, रस्ते, शौचालये आणि स्वच्छ जागा अधिक प्रभावीपणे उपलब्ध केली जात आहे. वाखरी, पिराची कुरोली, भंडीशेगाव या पालखी तळांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरीत प्रवेश केल्यानंतर कोठून कोठे जावे याविषयी वारकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे वारकरी आणि गर्दी रेंगाळते. याच मुद्द्याचा विचार करून ठिकठिकाणी मंदिर मार्ग, स्वच्छतागृहे आदिंसंदर्भात ध्वनिक्षेपकांवरून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसे मार्गदर्शन करणारे मराठी व कन्नड भाषेतीलही
फलक अनेक ठिकाणी लावले जात आहेत. १२ जुलैपर्यंत उजनीचे पाणी पंढरपुरात चंद्रभागेत पोहोचेल. तोपर्यंत तिथे असलेल्या गलिच्छ पाण्यापासून वारकऱ्यांना सुरक्षित ठेवणे हे प्रशासनापुढचे मोठे आव्हान आहे. आज २२ हजार ५०० स्वच्छतागृहांची उभारणी होत आली आहे. ७६ वॉकीटॉकींद्वारे आणि जागतिक दर्जाच्या हॅम रेडिओ या कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे समन्वयाची यंत्रणाही उभी करण्यात आली आहे.
पूर्वी शासनाचे सर्व विभाग स्वतंत्रपणे आपापली भूमिका बजावत असत. गेल्या वर्षीपासून आषाढी वारीचे नियोजन एका छताखाली आणले गेले. तीच पद्धत यावर्षीही सुरू आहे. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला नवा दृष्टिकोन देताना आषाढीतील दर्शनरांग, दर्शन मंडप, पंढरपूर शहरातील अनेक गल्ल्यांवरून जाणारा ‘स्कायवॉक’ या विषयांना नवी दिशा द्यावी लागणार आहे. ६५ एकर तळाप्रमाणे सांगोला मार्गावर तसाच ७० एकर क्षेत्रात आणखी एक वारकरी तळ उभारण्याबरोबरच कृत्रिम वाळूचा वापर करून वाळवंटात आषाढी वारी कालावधीत स्वच्छता व सौंदर्य बहाल करण्याचा रणजित कुमार यांचा मानस आहे. दर्शन मंडप व दर्शनरांग व्यवस्थेत क्रांतिकारी बदल झाल्यास वैष्णव नगरी आनंदी होईल.