मालकाच्याच हातून साप मारायचा?
By Admin | Updated: March 20, 2015 23:13 IST2015-03-20T23:13:40+5:302015-03-20T23:13:40+5:30
भाजपा आणि सेना यांच्यात तसे फारसे सख्य कधीच नव्हते आणि आजही नाही. पण सांगायला मात्र ते हिन्दुत्वाच्या रक्षणार्थ एकत्र येत असतात.
मालकाच्याच हातून साप मारायचा?
पाहुण्याच्या हातून साप मारणे’, ही म्हण तर सारेच जाणतात. पण आज महाराष्ट्राच्या सत्ताकारणात जे काही चित्र दिसून येते आहे, ते बघता या म्हणीत बदल करून ‘मालकाच्या हातून साप मारून घेणे’ ही नवी म्हण रूढ होण्यास कोणाची हरकत नसावी. भाजपा आणि सेना यांच्यात तसे फारसे सख्य कधीच नव्हते आणि आजही नाही. पण सांगायला मात्र ते हिन्दुत्वाच्या रक्षणार्थ एकत्र येत असतात. तद्वतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दरम्यान सख्य असण्याचेही काही कारण नाही. उलट काँग्रेसवरील रागातूनच राष्ट्रवादीचा पाळणा हललेला. तरीही ते एकत्र येत असतात आणि सांगायला सांगत असतात की हिन्दुत्वनिष्ठांच्या आक्रमक टोळ्यांपासून देशाच्या सर्वधर्मसमभावाचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत असतो. पण खरे तर दोहोंना सत्तेचा गोंद एकत्र येण्यास भाग पाडत असतो आणि या गोंदाचा चिकटपणा नष्ट होऊ लागला आणि झाला की मग त्यांचे ‘तुम कौन, हम कौन’ सुरू होते. आज जे काही दिसून येते आहे ते हेच. तथाकथित जातीयवाद्यांना सत्तेपासून वंचित करण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगली दीड दशकभर सत्ता संपादन केली. ती आणखी मिळाली तर हवीच, या हेतुने त्यांनी निवडणुकाही लढविल्या. पण तसे काही होऊ शकले नाही. मतदारांनी इच्छेने वा अनिच्छेने भाकरी फिरवून टाकली. ती फिरताक्षणी काँग्रेसजनांना राष्ट्रवादीच्या डोळ्यातील कुसळदेखील मुसळागत दिसू लागले व त्याच न्यायाने राष्ट्रवादीकरांना काँग्रेसजनांच्या डोळ्यातील कुसळे मुसळांसारखी भासू लागली. तसे जर नसते तर आपण खांद्याला खांदा लावून ज्यांच्यासमवेत सत्ता राबविली आणि इतकेच नव्हे तर मनावर दगड ठेवून का होईना, ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारले, त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याशी संबंधिंत महानगर विकास प्राधिकरणातील कथित घोटाळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अचानक आत्ताच कसे दिसले असते बरे? ते जर तेव्हाच म्हणजे सत्तेत असतानाच दिसले असते तर तटकरे यांना शरद पवारांच्या मागे लागून चव्हाणांवर दिल्लीचे दडपण आणून श्वेतपत्रिका काढायला भाग पाडणे अवघड का होते? तेव्हा ते न करता आता भाजपा सरकारकडे श्वेतपत्रिकेसाठी आळवणी करणे म्हणजे आज ज्यांच्याकडे महाराष्ट्राची मालकी आहे त्यांच्याकरवीच साप मारून घेण्याचा प्रयत्न करणे नव्हे? अर्थात ठोशास ठोसा आणि गुद्यास गुद्दा हे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण बनलेले असल्याने राष्ट्रवादीवर पलटवार करताना, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, राधाकृष्ण विखे यांच्या डोळ्यासमोर ऊर्जा खात्याचा लख्ख प्रकाश पडला. हा प्रकाश इतका तेजस्वी ठरला की, विखे यांनी स्वत:च्या पापाची स्वत:च कबुली दिली आणि ऊर्जा खात्याच्या व विशेषत: या खात्याशी संबंधित निर्मिती, पारेषण आणि वितरण या तिन्ही कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी वेगळी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची त्यांनी गुजारीश केली. तीदेखील पुन्हा सरकारकडेच. म्हणजे तेदेखील मालकाकरवीच साप मारून घेण्याच्या मन:स्थितीत. ‘आम्ही जे केले, ते तुमच्या हातून होऊ नये’, असे मानभावी उद्गारदेखील विखे यांनी काढले. म्हणजे काय, आम्ही साप पाळले, तुम्ही मात्र ते मारा ! अरे, कसे मारा, पर्यावरणवाद्यांचा काही विचार आहे की नाही? तरीही ऊर्जा खात्याशी संबंधित वास्तवाचा आणि त्यातील घोटाळ्यांंचा विचार करता, महाराष्ट्रातील साऱ्यांची बोटे झर्रकन वळतील ती विखे पाटलांच्याच मुळा-प्रवरा वीज वापर सहकारी संस्थेच्या दिशेने. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या बलिष्ट थकबाकीदारांच्या यादीत कित्येक वर्षांपासून ही संस्था वरिष्ठ क्रमांक अबाधित राखून आहे. आता विखे म्हणतात, या संस्थेचीही सीबीआय चौकशी होऊन जाऊ द्या. म्हणजे अजित पवारांची कोंडी होत जावी आणि कधी ना कधी त्यांच्यावर आरोप करण्याची संधी मिळावी म्हणूनच विखे पाटील थकबाकी वृद्धिंगत ठेवण्याचे सत्कार्य करीत होते की काय? समस्त जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि मोठ्या गौरवाने संबोधल्या जाणाऱ्या ‘आॅगस्ट हाऊस’ म्हणजे विधानभवनात हे असे परस्परांचे वस्त्रहरण होत असताना, खरे तर सत्तेत बसलेल्यांना गुदगुल्याच व्हायच्या. पण तेदेखील बहुधा सत्ता गेल्यानंतर परस्परांच्या विरोधात फेकायच्या दारूगोळ्याच्या शोधात लागलेले असावेत. याचा खरा दोष मतदार जनतेकडेच जातो. कोणा एकाला तिने मनोमन वरले असते, तर चौघांपैकी कोणावरही असंगाशी संग करण्याची वेळ आली नसती. तसे होते तर अशा भांडाभांड्या आणि परस्परांना ओरबाडणे पाहण्याचे तिच्या कमनशिबी आलेच नसते. पण हे तरी आता खरे मानायचे का? सेना राज्याच्या सत्तेत आहे की विरोधात, असा संभ्रम केवळ जनतेच्याच नव्हे तर खुद्द सेनेच्या आमदारांच्या मनातही असावा असे दिसते. तद्वतच आपला नैसर्गिक मित्र नेमका कोण, सेना की राष्ट्रवादी हा संभ्रम भाजपाच्या मनातही निर्माण झालेला दिसतो. विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीच्या बैठकीत आपण ज्या नावाला अनुमोदन दिले ते नाव देवेन्द्र फडणवीस यांचेच होते की आपले स्वत:चेच होते, हा संभ्रम नाथाभाऊ खडसे यांच्या मनात दिसतो व तो तसाच कायम राहील असेही दिसते. तरीही हे सारे राज्याचे कल्याणकर्ते आहेत, हे जनतेने लक्षात घ्यावे.