सुर-असुरांचा निर्माता
By Admin | Updated: June 21, 2014 11:11 IST2014-06-21T11:11:55+5:302014-06-21T11:11:55+5:30
आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच.

सुर-असुरांचा निर्माता
अध्यात्म
वेणुगोपाल धूत, चेअरमन व्हिडिओकॉन गु्रप
आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच. त्याशिवाय त्या कथेची रंगतच वाढत नाही. आपल्या मुलांना गोष्टी सांगतानाही एखाद्या परीला एखादी चेटकीण त्रास देत असल्याचे आपण सांगतोच. सिंंड्रेलाला तिची सावत्र आई छळते, तेव्हा मुलांना त्या सावत्र आईच्या रूपात राक्षसच दिसत असतो. नायिका रूपा-गुणांची खाण असते आणि मग सावत्र आई, सासू, नणंद अशा रूपात एखादे दुष्ट पात्र कथेत शिरते तेव्हाच कथेला रंगत चढते. हल्लीच्या टीव्ही मालिकांमध्ये, म्हणूनच पावलोपावली खलनायकी थाटाची पात्रे वावरत असतात.
अगदी देवादिकांच्या पौराणिक कथा घेतल्या, तरी त्यांना त्रास देणारी दुष्ट पात्रे असतातच. ही पात्रे कधी असुराच्या रूपात असतात, तर कधी संतापी ऋषी बनून येतात. शकुंतलेच्या प्रेमकथेत कोपिष्ट विश्वामित्र येतात, तेव्हाच त्या प्रेमकथेला रंगत येते. रामायणात कैकेयीच नसती तर पुढचे रामायण घडलेच नसते. हे देव-दानवांचे युद्ध ऐकताना, देवांचा विजय होणार, हे माहीत असूनही आपला श्वास अखेरपर्यंत रोखला जातो. असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनाही कपटाची, युक्त्यांची, हिकमतींची मदत घ्यावी लागते. संघर्षात थरार असतो आणि हा संघर्ष सुष्ट-दुष्टांचा, देव-दानवांचा, नायक-खलनायकांचा असेल, तर तो पाहण्याची मजा काही वेगळीच असते.
मनुष्यप्राण्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष अटळ होता. निसर्ग रौद्र होता, अफाट होता, उग्रही होता आणि माणूस त्या मानाने अगदीच क्षुल्लक जीव होता. त्या काळी माणूस क्षुद्र आणि परावलंबी असला, तरी आपली बुद्धी आणि अनुभवाच्या जोरावर तो जीवसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान सिद्ध करण्याच्या तयारीत होता. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करीत होता आणि भीतीवर विजय मिळवू इच्छित होता.
पंचमहाभूतांशी असा सामना करीत असतानाच तो त्यांनाही वश करू पाहत होता. वेळप्रसंगी त्यांची नक्कलही करीत होता. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करताना तो याच पंचमहाभूतांच्या खेळातून नवी ऊर्जा मिळवत होता.
त्याला निसर्गाचे भयही वाटत होते आणि या भयातून मुक्त होण्यासाठी पुन्हा तो निसर्गाचीच मदत घेत होता. निसर्गातच त्याला देवत्वही सापडत होते आणि दानवत्वही सापडत होते. माणसाने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर निसर्गातल्या लौकिक गोष्टींमधूनच अलौकिक गोष्टींचे चित्र रंगवले. त्यातूनच त्याने देव आणि दानव या संकल्पना निर्माण केल्या. त्यांच्या संघर्षाची वर्णने केली आणि देवांचा विजयही रंगवला. नृत्य, नाट्य, साहित्य यासारख्या कलांमधून त्याने देवदानवांचा संघर्ष रंगवला. यातूनच संस्कृतीचा विकास झाला आणि सर्व कलाही विकसित झाल्या. माणूसच देवांचाही निर्माता आहे आणि दानवांचाही आहे. देव-दानव या संकल्पनाच मानवी आहेत.