‘मेकिंग आॅफ पंढरीची वारी’
By Admin | Updated: January 31, 2015 04:45 IST2015-01-31T04:45:53+5:302015-01-31T04:45:53+5:30
गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो

‘मेकिंग आॅफ पंढरीची वारी’
रघुनाथ पांडे -
तुला साद आली, तुझ्या लेकराची,
अलंकापुरी आज भारावली..
वसा वारीचा घेतला पावलांनी,
आम्हा वाळवंटी तुझी सावली..
गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो दर्शकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. देहू ते पंढरपूर हा २०५ किलोमीटरचा प्रवास ५० फूट लांब, १४ फूट रुंद व १६ फूट उंच अशा मोजक्या जागेत चित्ररथातून मांडणे नक्कीच आव्हान होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हे आव्हान लीलया पेलले आणि विठ्ठलाच्या पदस्पर्शाने राजपथच नव्हे, तर अवघा देश भारावला. सहा गोल रिंगणांपैकी एक रिंगण, डोईवर तुळस घेतलेली वारकरी महिला, कोरलेल्या डोंगरावर वारकऱ्यांच्या ३०० प्रतिमा, ज्ञानेश्वर- तुकोबारायांची लोभस मूर्ती, माउली व सेवकाचे दोन अश्व, इंद्रायणीकाठचे मंदिी.. सारेच मंत्रमुग्ध! माती, फायबर ग्लास व प्लास्टर आॅफ पॅरीसने या कलाकृती अवतरल्या होत्या. ही कलाकृती कोठली, त्यामागील कारणे आणि वारी म्हणजे काय हे वर्णन निवेदक करत होते, तेव्हा उपस्थित लाखो भारतीयांची टाळ्यांची साथ होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रासह गुजरातेतील केंद्रीय मंत्र्यांनी आसनावरून उठून या चित्ररथाला दाद दिली.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वारीची माहिती दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही बारकावे सांगितले.. तेव्हाच ही कलाकृती देश डोक्यावर घेईल याचा अदमास आला होता. झालेही तसेच.! पांडुरंगाच्या पंढरीच्या वारीने देशात पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा गौरव आहे.
हा विषय धार्मिक असल्याचा समज होता, त्यामुळे संरक्षण विभागाच्या संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासल्यावर या संकल्पनेत जीव ओतायला चार महिने लागले. दिल्लीत येऊन कलाकृती निर्मितीसाठी कष्ट पडतात, ते कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे, सांस्कृतिक कला संचालक अजय अंबेकर, सहसंचालक मनोज सानप या साऱ्यांनी घेतले आणि मुत्सद्देगिरीच्या राजकीय कंगोऱ्यांनी जगाचे लक्ष वेधलेल्या प्रजासत्ताकाच्या यंदाच्या सोहळ्यावर ‘वारी’च्या यशाने मराठी मुद्रा कोरली गेली. दहा वर्षांची तीन मुले या वारीत होती. दिल्लीतील थंडी मी-मी म्हणत असताना हे सारेच सराव अनवाणी पायाने करायचे. एक-दोन नव्हे तब्बल १५ दिवस सकाळी सात वाजतापासून त्यांनी सराव केला. कडाक्याच्या थंडीची सवय पायाला व्हावी व वारकऱ्यांच्या भावनेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ नये म्हणून तंतोतत परिणाम साधणारे कष्ट त्यांनी उपसले. त्याचे चीज झाले!!
गडकरींची झणझणीत दही मिसळ!
नितीन गडकरींचे आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. बिल व मिलिंडा गेट्स यांनाही त्यांनी दही मिसळ, पोहे, मक्याचे वडे खाऊ घातले. गडकरींच्या पत्नी कांचन यांनी तयार केलेले हे पदार्थ गेट्स दांपत्यानी हाश हुश करीत खाल्लेही!! जगाच्या पाठीवर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या दांपत्यासंदर्भातील हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे यंदा बिल दांपत्याला भारत सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला. हे दांपत्य भारतात अनेकदा आले. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भेटीही घेतल्या. सरकारी योजनांसाठी अब्जावधींची मदत केली. पण त्यांच्या दातृत्वाची कदर गडकरींनी केली. पंतप्रधानांनी जेव्हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जागतिक पातळीवरील नावांची चर्चा केली, तेव्हा गडकरींनी गेट्स दांपत्याचे नाव सुचविले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथे गेट्स फाउंडेशनने महाराष्ट्रात पुणे येथे काही उपक्रम सुरू करण्यासाठी पाऊल उचलले.. आणि विकासाची नवी खिडकी किलकिली झाली. पण सुरुवात होती नागपुरी झणझणीत दही मिसळपासून.